Showing posts with label trekking in sahyadri. Show all posts
Showing posts with label trekking in sahyadri. Show all posts

Monday, 1 November 2010

भटकंतीची १० वर्षे ...

बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे.' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.




सह्याद्रीत पहिले पाऊल टाकल्यापासून ते आजतागायत सह्याद्रीने माझ्यावर प्रेमाचा अक्षरशः: वर्षाव केलाय. त्याने कधी पावसाळी अनुभवांनी मला चिंब भिजवलंय, कधी गडावर कडाक्याच्या थंडीत गारठवलय तर कधी उन्हातान्हात रानोमाळ फिरवलंय. तुम्ही म्हणाल हे का प्रेम?. तर मी म्हणीन होय. त्याचे प्रेम असेच असते. आपली रांगडी परीक्षा बघत, आपली झोळी अनुभवांनी भरत आपल्यावर तो स्वतःच्या प्रेमाचा वर्षाव कधी करतो हे आपल्याला देखील समजत नाही. कळत तेंव्हा आपण एखाद्या सह्यशिखरावर कुठेतरी हरवून सभोवतालचा नजारा बघत असतो. मग तो नानाचा अंगठा असो नाहीतर नागफणी, कोकणकडा असो नाहीतर टकमक टोक. राजगडावरचा सूर्योदय असो नाहीतर मग सूर्यास्त. त्याच्या रांगड्या सौंदर्याचे वर्णन करताना शब्दच तोकडे पडू लागतात.


जसा पाउस तप्त जमिन थंड करू लागतो तसा सह्याद्रीसुद्धा आपला रौद्रप्रतापी चेहरा लपवित एक नवे रूप घेऊन आपल्या समोर येतो. ह्या हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीची मजा काही औरच. मग आपण सुद्धा मनमुराद भिजण्यासाठी नवे ट्रेक आखत त्याच्या भेटीला निघतो. पण माथ्यावर त्याला गाठायचे तर आधी परीक्षा ही द्यावीच लागते. मग तो एखादा भरून वाहणारा ओढा असो, दुथडी भरून वाहणारी नदी असो नाहीतर एखादी वर चढणारी पाण्याची वाट असो. त्याला भेटायचे म्हणजे ते पार करणे आलेच. आपली मजा बघत असतो तो पण त्यालाही मनातून आपण तिथवर पोचावे हे मनात असतेच. दोघांमधली ही ओढ अनिवार होते आणि मग आपली पावले वेगाने शिखराकडे पडू लागतात. माथा जसा जवळ येतो तसे आपण 'आता माथ्यावर पोचूनच टेकायचे रे' हे उगाच नाही म्हणत. पावसाळी वातावरणात राना-रानातून गार वारे साद घालत फिरत असतात आणि मनावर एक वेगळीच धुंदी निर्माण करितात. वर्षोनुवर्षे ऑफिसच्या वातानुकीत यंत्राचा वारा घेणाऱ्या लोकांनो, हे गार वारे अंगावर घेतले आहेत कधी? ते वातानुकीत यंत्र झक मारेल ह्यापुढे. खळखळत वाहणारे ओढ्याचे पाणी ओंजळीत भरून प्यायला आहात कधी? एकदा हे करून बघाच. आयुष्यभराची तहान भागेल तुमची.




पाउस जरा परतीच्या मार्गाला लागतो तसा एक सुखद गारवा सह्याद्रीमध्ये पसरू लागतो. आता आपण खास रग जिरवणारे आणि उंची गाठणारे प्रचंडगड, रतनगड, अलंग-मंडण-कुलंग असे ट्रेक प्लान करू लागतो. पाऊस थांबलेला असला तरी धुक्याचे खास खेळ आपल्यासाठी सुरू असतात. सूर्यदेवाने आपली द्वाही चहूकडे फिरवण्याआधी पहाटे पहाटे दऱ्याखोऱ्यात पसरलेले हे धुके खूपच आल्हाददायक असते. अश्या धुक्यातून ट्रेक करायला तर काय अजूनच मजा!!! हवे तेंव्हा निघावे, हवे तिथे विश्रांतीसाठी बसावे. तो असतोच कधी झाड बनून तर कधी दगड बनून आपल्याला टेकायला द्यायला. आपल्याला तहान लागली आहे हे कळते त्याला मग मध्येच एखादा ओहोळ देतो सोडून आपल्या वाटेवर. काळजी घ्यावी ती त्यानेच. गडावर चूल बनवून जेवण बनवावे तर हा.... वारा. मग कधी थोड्यावेळासाठी वाऱ्याचा वेग जरा कमी करेल आणि आपल्याला जेवण बनवू देईल. आपण निवांतपणे जेवून गप्पा मारत टेकलो की हा परत आपला वेगाने सुरू... गडावर रात्र जागवून निवांतपणा अनुभवावा. भले १० जण सोबत असतील पण प्रत्येकाने शांत राहून फक्त आकाश बघावे. सर्व काही नि:शब्द. आवाज यावा तो फक्त वाऱ्याचा आणि झाडांच्या सळसळीचा. अजून काय हवे!!!


नवा ऋतू आणि सह्याद्रीचे नवे रूप न दिसले तरच नवल. पुन्हा एकदा तो आपले रौद्र रूप धारण करू लागतो. पुन्हा एकदा आपली रांगडी परीक्षा पाहण्यासाठी डोंगर-कडे तप्त होऊ लागतात. आपण देखील मग काही जिद्दी ट्रेक प्लान करू लागतो. स्वतःच्या अगणित हातांनी तो आपली झोळी भरत असतो आणि आपण अधाशासारखे फक्त घेत असतो. मला नाही वाटत तो कधी थांबेल आपल्यावर प्रेम करणे.. आणि मलाही नाही वाटत की मी कधी थांबीन त्याच्याकडे जाणे. कुठलेही संकट पेलण्याची संपूर्ण ताकद, आवश्यक आत्मविश्वास मला दिलाय तो ह्या सह्यकड्यांनी. मला नाही वाटत हे कुठल्या पुस्तकी शिक्षणातून कधी मिळेल. स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला डोंगरातच मिळालेत. आज जगण्याचा अर्थ जो मला कळतोय तो ह्या सह्याद्रीने दाखवलाय मला.




आज फक्त १० वर्षे झालीत. अजून खूप हिंडायचे आहे. रानोमाळ भटकायचे आहे. गड-किल्ल्यावर अभिमानाने शिवरायांचे स्मरण करायचे आहे. इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. ह्या सर्वांनी मी पावन झालो हे नक्की. खूप अनुभव मिळालेत पण अजून खूप घ्यायचे आहेत.


हे सह्याद्री... मी येतोय लवकरच पुन्हा एकदा असेच काही नवे अनुभवायला..तुझ्या भेटीला आसुसलेला... डोंगर यात्री... डोंगर वेडा...


... पक्का भटक्या...

Tuesday, 3 August 2010

नाणेघाट - नानाचा अंगठा ... !

सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्य स्थळांपैकी एक आहे कोकण आणि घाट यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट. आजपर्यंत अनेकदा जाऊन देखील इकडे जायची उर्मी कमी होत नाही. मात्र गेली २-३ वर्षे इकडे येणे न झाल्याने ह्यावर्षी मान्सून मधला पहिला ट्रेक ३ जुलै रोजी नाणेघाट हाच करायचा हे मी आधीच ठरवले होते. जोडीला ह्यावेळी शमिका सुद्धा होती. शिवाय अमृता, तिचा मित्र विकास आणि जाड्या हर्षद सुद्धा सोबतीला होते. ट्रेक झाल्यावर संध्याकाळी माळशेजघाटाच्या खाली असणाऱ्या  'दिघेफळ' या गावी जाऊन राहायचे असे ठरले होते. रविवारी तिकडच्या धबधब्यामध्ये मज्जा करायची होती. त्यासाठी अभी-मनाली, अमेय-शुभांगी आणि इतर काहीजण आम्हाला शनिवारी संध्याकाळी टोकावड्यात भेटणार होते.


गोरखगड आणि मच्छिंद्र सुळका ...


शनिवारी पहाटे-पहाटे माझ्या 'छोट्या भीम' (गल्लत करू नका... छोटा भीम हे आमच्या गाडीचे नाव आहे..) सोबत आम्ही ५ जण मुरबाडमार्गे नाणेघाटाच्या दिशेने निघालो. पहिला थांबा अर्थात मुरबाड मधले रामदेव हॉटेल होते. तिकडे भरगच्च नाश्ता झाला आणि आम्ही पुढे निघालो. सरळगाव वरून जरा पुढे जातो न जातो तोच उजव्या हाताला गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याने आम्हाला धुक्यातून बाहेर येऊन नमस्कार केला. आम्ही सुद्धा थांबून मग तो स्विकारला. समोर आता नाणेघाट दिसत होता. मध्येच धुक्यातून डोके वर काढत नानाचा अंगठा आपले उत्तुंग अस्तित्व दाखवून देत होता. आता जास्त क्षण आम्ही दूर राहणे शक्य नव्हते. फटाफट गाडी मारत पायथ्याला पोचलो आणि जिथे नाणेघाटचा रस्ता सुरु होतो तिकडून गाडी जरा आत टाकली. पार्किंगला एक मस्त जागा मिळाली. लगेच निघालो तिकडून. वर पहिले तर ढग दाटलेले होते. धुके पसरलेले होते पण पावसाचा मागमूस नव्हता. लालमातीच्या मळलेल्या वाटेने आता खरी चाल सुरु झाली होती. आजू बाजूला सर्वत्र सागाची झाडे होती. काही इतर झाडांवर ऑर्किड फुलले होते.

वाईल्ड ऑर्किड...


पहिला काही वेळ अगदीच रमत-गमत गेला. ओढ्याकाठाने गप्पा टाकत टाकत आणि फोटो काढत आम्ही पुढे जातच होतो. माहिती असलेली थोडीफार माहिती जाड्या बरोबर शेअर करत होतो.

अजूनही मला नाणेघाटला आलो की कधीतरी बैलांचे, लमाणांचे मैलभर लांब तांडे दिसतील असे वाटते. दूरदेशीच्या जहाजांमधून कोकणातील बंदरांवर उतरलेल्या विविध वस्तू वरघाटावर घेऊन जाणारे पुरातन काळातील व्यापारी तांडे. कसे असेल ते दृश्य??? किंवा मराठा फौज दौड मारत जुन्नर मारायला वरघाटी कूच करत आहे. फौजेच्या आघाडीला प्रतापराव, येसाजी कंक किंवा आपले थोरले राजे आहेत. हे दृश्य तर त्याहून भन्नाट... टाईम मशीन असे काही असते तर मी नक्कीच १७व्या शतकात गेलो असतो.
पण फार काळ इतिहासात गुंतून न जाता आम्ही २ वेळा ओहोळ पार करत आता पहिल्या टप्याच्या चढणीला लागलो. थोडेसेच पुढे जातो तोच उजव्या बाजूने खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज येऊ लागला. वाट सोडून मी लगेच पाय तिकडे वळवले. मगाशी पार केलेल्या ओढ्यांचाच हा वरचा भाग होता. पाउस काही पडत नव्हता मग ओढ्याच्या पाण्यानेच जरा फ्रेश झालो. इतक्यात पाण्यामध्ये एक सापाचे पिल्लू दिसले. आता हा कुठला साप आहे इतका काही माझा सापांवर बारीक अभ्यास नाही. पण बिन-विषारी होता हे मात्र नक्की. दर काहीवेळाने प्राणवायू घ्यायला तो फक्त आपले तोंड पाण्याबाहेर आणायचा. तेंव्हाच टिपलेला हा फोटो. अर्थात ह्या एका फोटोसाठी पठ्याने बराच वेळ घेतला माझा. त्याला टाटा करून आम्ही सर्व पुन्हा चढाला लागलो.


काय रे.. फोटो काढतो काय???


वाट अजूनही सरपटत चाललेल्या अजगरासारखी रुंद होती. हळू हळू वाट अरुंद होऊ लागली आणि अधिक चढणीला लागली. वाट चढणीला लागली तसे हृदयातील ठोके सुद्धा चढणीला लागले.. म्हणजे वाढायला लागले हो... ३० एक मिनिटात पहिल्या टप्याच्या शेवटाला पोहोचेपर्यंत आश्चर्यकारकरित्या शमिका सर्वात पुढे होती. तर मी शिरस्त्याप्रमाणे सर्वात मागे. अमृता आणि विकास मध्ये होते तर जाड्या फुसफुसत कसाबसा वर चढत होता. पाउस नाही, वारा नाही आणि त्यात ते चंदेरी मच्छर मध्येच येऊन त्रास  देत होते. कधी एकदा पहिला टप्पा पार करून वरच्या टापूवर पोचतोय असे वाटत होते. वरती मस्त वारा होता. धुक्याच्या जवळ अधिक गार देखील वाटत होते. तिकडे येऊन पोचतो न पोचतो तोच सर्व धुके गायब झाले आणि नाणेघाट - नानाचा अंगठा यांनी आम्हाला त्यांचे सर्वांग दर्शन घडवले.

नाणेघाट आणि नानाचा अंगठा ...


दुसऱ्या टप्याची चढण सुरु झाली तसा जाड्या अधिकच मागे पडू लागला. त्याला सोबत म्हणून मी जरा मागेच थांबलो होतो. शामिकाला मात्र ट्रेक करताना सारखे मध्ये-मध्ये थांबायला आवडत नाही. मग ती आपली पुढे जायची. तिच्या हि पुढे आता अमृता आणि विकास होते. ते सुद्धा इकडे बस, ते फोटो काढ असेच फुरसत मध्ये जात होते. जस-जसे वर जात होतो तसे धुके दाट होत गेले. आता आम्ही धुक्यात विलीन झालो होतो. इथून ज्या दगडी पारऱ्या सुरु होतात त्या आपल्याला वरपर्यंत घेऊन जातात. आज अजिबात पाउस नव्हता नाहीतर इथे पावसात पायऱ्या चढून जायला अफलातून धमाल येते. २००५ साली मी जेंव्हा नाणेघाट केला होता तेंव्हा अर्धा फुटभर पाणी वेड्यासारखे खाली धावत होते. आत्ता तिकडे धो-शो पाउस पडतोय ना... आत्ता खरेतर नाणेघाटला जायला अजून मज्जा येईल.


अस वाटतंय की हरवून जावे ...


कातळात खोदलेले पाण्याचे टाके ...


दुसऱ्या टप्यात बरोबर मध्ये पाण्याचे एक टाके खोदलेले आहे. किती प्राचीन असावे हे टाके? वरची गुहा जितकी जुनी तितकेच जुने असावे बहुदा.. मार्ग वापरणाऱ्या वाटसरूंना पाण्याची सोय म्हणून बांधले गेले असणार नक्की. अशीच अजून २-३ छोटी टाक उजव्या बाजूला कड्यात आहेत. चटकन लक्ष्यात येत नाहीत. टाक्यापासून निघालो कि अगदी काही वेळात आपण वरती पोचतो. आम्ही इकडे पोचलो तेंव्हा एक ग्रुप मागून येऊन इकडे पोचला. त्यातला एकजण मला विचारतो 'और कितना बाकी है.' त्या मुलाने हाफचड्डी घातलेली होती. त्याच्या बाजूचा तर अजून हाईट. त्याच्या पाठीवर तिरपी अडकवलेली सामानाने भरलेली चक्क लैपटॉप बैग होती. तिसऱ्याच्या हातात फुटबॉल होता. मला कळून चुकले कि कुठल्यातरी कंपनीमधली हौशी कलाकार मंडळी आहेत. त्याला बोललो,'अजून ४५ मिनिटे.' त्यांच्या चेहऱ्यावर 'गार' पडलेले भाव होते. एकजण 'Hmmm.. More 45 minits' असे बोलून खाली दगडावर बसला. त्यांना खरेतर थोडे प्रेमाचे डोंगरी नियम सांगावे असे मनात आले होते पण तितक्यात त्यांचा म्होरक्या मागून काठी टेकत आला आणि त्यांना 'चला..चला.. We are almost there. निकलते है' असे मराठी - इंग्रजी आणि हिंदी असे तिन्ही भाषां एकाच वाक्यात बोलला. त्याचे बोलणे ऐकून ते अजिबात हलले नाहीत. मी मात्र पुढे निघालो. अमृता, विकास आणि शमिका आधीच पुढे गेलेले होते. फक्त मी आणि हर्षद मागे राहिलो होतो. 

नाणेघाटाचा अतिप्राचीन व्यापारी मार्ग...


वळणा-वळणाच्या दगडी पायऱ्या चढत चढत अखेर आम्ही गुहेपाशी पोचलो. आता इथून वरच्या पठारावर जाणारा तो ऐतिहासिक मार्ग दिसू लागला होता. आता आम्ही थांबू शकणार नव्हतो. शिवाय गुहेमध्ये जेवणाऱ्या जत्रेचा एकाच गलका होता. तेंव्हा गुहा उतरताना बघू असे ठरले. खूप-खूप गच्च पाउस पडला कि ह्याठिकाणी इतके पाणी वाहते कि पायऱ्या सुद्धा दिसत नाहीत. गुहा धुक्याने भरून जाते आणि खालचा मार्ग तर स्वर्गतीत असतो. आज मात्र ती परिस्थिती नव्हती. थेट वर पोचलो. पाउस अजून हवा तितका झालेला नव्हता. धुके मात्र खूप होते. उजव्या हाताला जीवधन आणि खडापारशी त्यात लपून बसले होते. वर पोचल्यावर बाकीच्यांना डाव्या हाताचा दगडी रांजण दाखवला. जेंव्हा नाणेघाट हा व्यापारी मार्ग म्हणून अस्तित्वात होता तेंव्हा हा मार्ग वापरल्याचा कर ह्या रांजणात टाकावा लागायचा. ज्याची हुकुमत जीवधन किल्ल्यावर त्याची हुकुमत ह्या वाटेवर.


वरच्या पठारावरचे दृश्य .. डाव्याबाजूला तो दगडी रांजण दिसतोय ...

आधी मुघलांच्या ताब्यात असलेला हा मार्ग नंतर छत्रपती शिवरायांनी आपल्या ताब्यात आणला होता. कल्याण बंदरातून आणि उत्तर कोकणातून येणाऱ्या सर्व देशी -परदेशी मालावर मुघलांना मराठ्यांकडे कर भरावा लागायचा. शिवाय प्रत्येक खाजगी व्यापार करणाऱ्याला सुद्धा कर द्यावा लागायचा. एकदा का कर भरला की खालपासून वरपर्यंत संपूर्ण मार्गावर व्यापारी मालाला संरक्षण दिले जायचे. आता आम्ही रांजणासमोरच्या कातळात असलेल्या गणेशगुहेकडे पोचलो. दर्शन घेतले आणि तसेच डाव्याबाजूने नानाच्या अंगठ्याकडे निघालो. भुका लागल्या होत्या तेंव्हा आधी पोटोबा करावा असे मत पडले. पोटोबा म्हटल्यावर थोडीच कोणी विरोधात जाणार होते.नानाच्या अंगठ्याच्या दिशेने थोडे वर चढून जीवधनच्या दिशेच्या एका कड्यापाशी विसावलो. अमृताने आणलेली हल्दीराम भेळ, जाड्याने आणलेले फरसाण आणि असे काही-बाही सटर-फटर पदार्थ खाल्ले. पोट भरले नव्हते पण पर्याय नव्हता.

गुहेमधील गणेशमूर्ती ...



अमृता, विकास आणि हर्षद नानाचा अंगठ्याच्या टोकाला जाऊन आले. धुके इतके होते कि काहीच दिसणे शक्य नव्हते. मी आणि शमिका गणेशमूर्तीपाशी बसून होतो काहीवेळ. ३ वाजत आले होते. आता आम्हाला उतरणे भाग होते. शिवाय हर्षदचा चढतानाचा स्पीड बघता उतरायला अधिक वेळ लागणार हे साहजिक होते. अखेर तिकडून निघताना पुन्हा एकदा जीवधनच्या दिशेनं नजर टाकली. किमान एक झलक तरी दिसते का ते बघायला.. पण आज बहुदा तो काही दिसायचा नव्हताच.

नानाच्या अंगठ्यात असलेली नाणेघाटाची गुहा ...

तिघे आले तसे आम्ही खाली उतरून गुहेकडे पोचलो. ३ वाजून गेल्याने सर्व सामसूम झाले होते. होते-नव्हते तेवढे ग्रुप्स उतरून गेले होते. गावातली २ माणसे तेवढी बसली होती फक्त. आम्ही तिकडे काहीवेळ काढला. गुहेमधल्या भिंतीवरती उरलेल्या उरल्या-सुरल्या ब्राह्मी स्क्रिप्टचा फोटो घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र गुहेमधून बाहेरचे काढलेले Silhoutte फोटो मस्त आले.

धुक्यात ते ...


धुक्यात मी...

धुकेच-धुके सगळीकडे... पण पाउस गेला कुठे??? असे म्हणत ३:३० वाजता खाली उतरायला लागलो. अपेक्षेप्रमाणे पण वेळेत ६:३० वाजता आम्ही खाली पोचलो. 'छोटा भीम' सुखरूप होता. आमचीच वाट बघत होता. एक नजर पुन्हा नाणेघाट पाहून घेतला आणि 'टोकावडे'कडे निघालो. काही वेळात तिकडे अभी-मानली आणि इतर काहीजण येऊन पोचणार होते. मग आम्ही जाणार होतो 'दिघेफळ'ला. धमाल - मज्जा - मस्ती करायला..... त्याचे फोटो आणि त्यावर एक छोटीशी पोस्ट टाकतो नंतर...

Saturday, 31 July 2010

किल्ले विसापूर ...

किल्ले विसापूर... मावळ तालुक्यामधला एक भरभक्कम किल्ला. अगदी लोहगडच्या शेजारी वसलेला. लोहगडपेक्षा उंचीला आणि आकाराला सुद्धा तसा मोठा पण तितका प्रसिद्द नसलेला. का माहीत नाही पण जितके लोक लोहगडला जात असतील त्यातले १० टक्के सुद्धा विसापूरला जात नाहीत... अर्थात पक्के भटके ट्रेकर्स सोडून... :) अश्याच काही भटक्या ब्लोगर्सनी लोहगड सोडून किल्ले विसापूरचा ट्रेक ठरवला. म्हणता-म्हणता १७-१८ जण नक्की झाले आणि त्यानंतर काही दिवसात एक-एक करून रद्द सुद्धा झाले. शेवटी मोजून ६ शिलेदार उरले. अनुजा, सुहास, दिपक, सागर आणि मी मुंबईवरुन तर भारत पुण्याहून येणार होता.


लोहगडवाडी मधून दिसणारा विसापूर ...

१७ तारखेला सकाळी मी, अनुजा आणि सुहास ६:३०च्या आसपास ठाण्यावरुन निघालो. गाड़ी केली असल्याने वेळ ज़रा पुढे मागे झाल्याची इतकी चिंता नव्हती. सागरला मुलुंडवरुन उचलले आणि पनवेलच्या दिशेने निघालो. गाड़ीमध्ये गप्पा सुरूच होत्या. तासाभरात पनवेलला पोचलो आणि S.T. स्टैंड वरुन दिपकला उचलले. ८ वाजले होते तेंव्हा अजून पुढे जाण्याआधी गाड़ी 'दत्ता'कडे वळवली आणि एक-एक वडा खाल्ला. तिकडे भारत लोणावळ्याला येउन पोचला देखील होता. आता गाड़ी सुसाट वेगाने खोपोली मार्गे लोणावळ्याच्या दिशेने मारली. वाटेमध्ये डावीकडे माथेरान, इर्षाळगड़, प्रबळगड़- कलावंतीण सूळका तर उजव्या हाताला कर्नाळा आणि माणिकगड़ दिसत होता. पावसाचा कुठे मागमूस देखील नव्हता. धुके किंवा ढग सुद्धा दुरच राहिले. बहुदा ट्रेक सुक्का जाणार अशीच चिन्हे होती. तासाभरात पुरोहित चिक्कीच्या फाट्यावर येउन पोचलो. भारतला उचलले आणि तसेच पुढे निघालो. गाड़ी आता रेल-वे लाइन पार करून लोणावळ्याच्या शिवाजी चौकातून डावी मारत पौंडच्या दिशेने निघाली. लोणावळा मागे पडले तसा लोहगडाचा विंचूकाटा समोर दिसू लागला आणि आपण योग्य मार्गावर आहोत ह्याची खात्री पटली. ह्या रस्त्याने लोहगड़ला मी प्रथमच जात होतो. पुढे छोटासा घाट सारखा लागला. चढण एकदम भारी होती. अरुंद रास्ता आणि एकदम झिप-झाप वळणे. त्यात नेमके एके ठिकाणी कोणीतरी ट्रक उभा करून विटा उतरवायचे काम सुरू केले होते. फुकट १५-२० मिनिटे गेली. शेवटी तो ट्रक निघाला. ट्रकच्या ४०-५० मीटर पुढे जातो तोच डावीकडे लोहगड़वाडीला जाणारी वाट लागली. ज़रा पुढे असता ट्रक तर २० मिनिटे सहज वाचली असती... असो.. तिकडून १५-२० मिनिट्स मध्ये लोहगडवाडीला पोचलो.

१०:३० वाजून गेले होते तेंव्हा अजून १ मिनिट सुद्धा न दवडता विसापूरच्या मार्गाला लागलो. आमच्या सोबत अजून २ जण सोबत आले. २ कुत्रे. प्रत्येक ट्रेकला सोबत एक तरी कुत्रा असतोच. १५-२० मिनिटात मोठ्या लालमातीच्या मळलेल्या वाटेने विसापूरच्या चढणीच्या वाटेला लागलो. आता इथे चहाचे दुकान झाले आहे. शिवाय रस्त्यावर सर्व ठिकाणी दिशादर्शक बाण आहेत.. आधी मात्र असे नव्हते. विसापूरला डाव्या बाजूला ठेवत पुढे-पुढे जात राहिले कि जिथे तटबंदी आत जात-जात जिकडे मिळते त्याठिकाणाहून एक पाण्याचा मार्ग खाली येतो. हाच तो वर जायचा मार्ग. सर्वात वरती मिळालेली तटबंदी तुटलेली आहे. तिच्याकडे लक्ष्य ठेवत चढले म्हणजे रस्ता चुकायचा प्रश्नच नसतो. अर्थात खालच्या टप्यात बरीच झाडी असल्याने आपल्याला आपले डोंगरी कौशल्य वापरावे लागते पण पाण्याच्या वाटेवरून उलट वर जात राहिलो तर फारसा त्रास पडत नाही. आम्ही सुद्धा गप्पा टाकत टाकत वर चढत होतो. झाडीच्या शेवटच्या टप्यामधून वर जाता-जाता जरा वाट चुकलोच. इतक्यात खाली उतरणाऱ्या २ जणांनी डाव्या बाजूने चांगली वाट आहे असे सांगितले. ज्यावाटेने जात होतो तिकडून अजून पुढे गेलो असतो तर नक्कीच 'पोचलो असतो' किंवा किमान 'वाट तरी लागली' असतीच. इकडे अनुजाने एक गोल मारलाच. नशीब फारसे काही लागले नाही. थोडेसे खाली सरकलो आणि डाव्या बाजूने वर जायला लागलो. सागरचा हा पहिलाच ट्रेक होता पण पठ्या सर्वात पुढे होता. कधी एकदा वर पोचतोय असे झाले होते. त्या मागोमाग दीपक आणि अनुजा होते. मी, सुहास आणि भारत सर्वात मागे होतो. झाडी मधून वर पोचल्यावर जरा दम घेतला. मागे पवना धरणाच्या पार्श्वभूमीवर लोहगड साद घालत होता. सर्वत्र हिरवळ होती... पाऊस मात्र आज रुसला होता. एक टिपूर सुद्धा पडले नव्हते. आम्ही पावसाने नाही तर घामाने भिजलो होतो. वर पोचायला माझ्या अपेक्षेपेक्षा कमी वेळ लागला होता. अवघ्या तासाभरात आम्ही माथ्यावर होतो. समोरून झिरपणाऱ्या थंडगार पाण्याने ताजेतवाने झालो आणि ५ मिनिटे निवांत बसून गडफेरीला सज्ज झालो.
 
                                                चढणीच्या मधल्या टप्यामधून दिसणारा लोहगड...
 
तिकडून थेट डावीकडे निघालो आणि तटबंदीच्या फांजी वरून चालत-चालत लोहगडच्या दिशेने टोकाला निघालो. तटबंदी संपली तसे खाली मातीत उतरलो. वाटेत जमीन सर्वत्र मऊ-मऊ झाली होती. मध्येच खेकडे पळायचे तर मध्येच सोबत असलेले कुत्रे. जरा कुठे पाण्याचे डबके दिसले की जाऊन मस्त डुंबायचे. बाहेर येऊन गवताला अंग पुसत लोळायचे. आपल्याला सुद्धा असे करता येईल का असा मनात विचार यायच्या मध्येच. पण नंतर लक्ष्यात यायचे आपण आता तितके फ्लेक्सिबल राहिलेलो नाही... :) विसापूरच्या टोकाला पोचलो. लोहगड आणि त्याचा विंचूकाटा दिसत होता. त्यावरून चालणारी बारीक माणसे देखील दिसत होती. भाजे लेणी आणि त्याबाजूने वर येणारी जत्रा देखील दिसत होती. थोडीशी पेटपूजा केली आणि गडाच्या उत्तर दिशेला निघालो. ह्या ठिकाणी १००-२०० मीटर तटबंदी उत्कृष्ट स्थितीमध्ये आहे. बुरुज, जंग्या आणि फांजी सर्व एकदम अस्सल मराठी बांधकाम. बाकीची पूर्ण तटबंदी इंग्रजांनी १८१८ मध्ये पडून टाकली आहे. विसापूर पडला तसा २ दिवसात लोहगड सुद्धा इंग्रजांना विशेष प्रयास न करता मिळाला. बरोबर मध्यभागी एक मोठा चुन्याचा घाणा आहे. तटबंदी उभी करताना वापरला गेलेला...
 
                                                                   चुन्याचा घाणा  ...
 
तसेच तटबंदी वरून पुढे जात होतो इतक्यात एका माकडाने आम्हाला हूल दिली. हल्ला नव्हता पण नुसतीच हूल दिली. नशीब आमच्या सोबत कुत्रे होते. त्यांनी लगेच माकडावर प्रतिहल्ला करून त्याला तटबंदीवर रोखून धरले. इतक्या वेळात मी तटबंदी वरून खाली उडी मारून सुरक्षित जागी पोचलो होतो. माझ्या हातातले छायाचित्रण करण्याचे यंत्र न जाणो त्याने खाद्ययंत्र समजून खेचले असते तर... तिकडून सरळ तटबंदी सोडून गडाच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या पायथ्याकडे निघालो. या ठिकाणी मिशिवाल्या मारुतीची प्रस्तरामध्ये कोरलेली अखंड मूर्ती आहे. दोन्ही बाजूला पाण्याची टाक आहेत. नेमका शनिवार होता. दर्शन घेतले आणि मनोमन 'जय हनुमान' म्हणत पुढे निघालो.
 
 

मिशिवाल्या मारुतीची प्रस्तरामध्ये कोरलेली अखंड मूर्ती आणि पाण्यामध्ये मूर्तीचे प्रतिबिंब...   

गडाच्या उत्तर दिशेने मुंबई-पुणे हाय-वे दिसत राहतो. पुढे जात राहिलो की वाटेत अनेक पाण्याची टाक लागतात. त्यातले बरेच आता पिण्यायोग्य राहिलेले नाहीत. वाट आपल्याला गडाच्या मुख्य दरवाज्याकडे घेऊन जाते. डाव्या बाजूला पुन्हा जरा खाली उतरलो की प्रस्तरात खोदलेल्या पायऱ्या लागतात. इकडे पोचलो असता थोडा पाउस सुरु झाला आणि नेमक्या पायऱ्या निसरड्या झाल्या. पहिल्याच पायरी वरून माझा पाय सटकला आणि स्वतःला सावरायला वर नेलेला हात जोरात सुहासच्या डोळ्यावर जाऊन बसला. बसला म्हणजे.. बसला म्हणजे.. जोरदार बसला. बिचारा पुढचे १० मिनिटे डोळा चोळत बसला होता. तिकडून पायऱ्या उतरून (की सरकून.. सरकून..) एकदाचे खाली पोचलो. इकडे अजून एक मारुतीची मूर्ती आहे. वरती असणाऱ्या मारुती सारखीच. शिवाय बाजूला २ मोठ्या देवड्या आहेत. इकडे फार वेळ न थांबता पुन्हा वर आलो आणि गडाच्या पूर्व दिशेने निघालो. वाटेत एक तोफ पडलेली दिसली. इकडून पुढे गडाचा निशाण बुरुज आहे. विसापूरचा बहुतेक इतिहास हा लोहगड सोबत गुंफलेला आहे. पुरंदरच्या तहात ह्या किल्ल्याचे नाव 'इसागड' असे दिलेले आहे. विसापूरबद्दल सर्वात महत्वाची नोंद असेल तर ती कान्होजी अंग्रे यांचे पुत्र तुळाजी आंग्रे यांची. पेशव्यांनी १७३३ च्या आसपास 'तुळाजी आंग्रे'ला या किल्ल्यावर नजरकैदेत ठेवले होते.

पूर्व दिशेने पुन्हा दक्षिण दिशेकडे पोचत गड प्रदक्षिणा पूर्ण केली आणि जिकडून वर चढून आलो होतो तिकडे येऊन निवांत बसलो. छान वारा सुटला होता. आसपास गाई-गुरे चरत होती. सोबत आलेली २ कुत्री लोळत बागडत होती. कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते. जे काही भवताली आसमंतात होते ते सर्वकाही डोळ्यात साठवून घेत होते. समोर बुलंद लोहगड उभा होता. पलीकडे मागे पवनाच्या प्राश्वभूमीवर तुंग-तिकोना उभे होते. पुन्हा एकदा एक नजर ते दृश्य डोळ्यात साठवून घेतले. पुन्हा इकडे कधी येईन काय माहित!!!





२ वाजले होते. आल्या वाटेने उतरायला सुरवात केली. अवघ्या २० मिनिटात आम्ही खाली लालमातीच्या वाटेला लागलेलो होतो. आणि तिकडून काही मिनिटात पुन्हा वाडी मध्ये पोचलो. ट्रेकची सांगता झाली होती. एक छोटासा मात्र अतिशय आनंद देणारा ट्रेक पूर्ण करून आम्ही भरून पावलो होतो. असे अजून ट्रेक्स व्हायला हवेत असे सर्वांचेच मत होते. वाडीमध्ये बाळूकडे झुळका-भाकर आणि अंडाकरीची ऑर्डर दिली आणि पुन्हा एकदा गप्पा टाकत बसलो. जेवण झाले तसे परतीच्या वाटेला लागलो. लोणावळ्यामध्ये पुरोहित चिक्कीला थांबलो आणि सर्वांनी चिक्की घेतल्या. दिपकने मात्र घरी कोणीच नाही म्हणून चिक्की घेतली नाही. अनुजाच्या मते मात्र 'घरी नाहीत तरी गाडीत लोक आहेत तेंव्हा दीपकने सुद्धा चिक्की घ्यायला हवी होती' असे होते. त्यावरून त्याला थोडे पिडले. भारत लोणावळ्यावरूनच पुण्याला परत गेला आणि आम्ही मुंबईच्या दिशेने गाडी मारली. मावळातला पवनाकाठचा विसापूर हळूहळू मागे पडत गेला... राहिला आता फक्त आठवणीमध्ये... पुन्हा त्याला भेटायला जाईपर्यंत...

Saturday, 16 January 2010

परतीचा प्रवास 'तोलारखिंड' मार्गे ... !

पहाटे पहाटे सर्व उठले आणि परत निघायच्या तयारीला लागले. आज ट्रेकचा नक्की शेवटचा दिवस होता. वाढीव असला तरी... चहा नाश्ता झाला. ४ दिवस 'शंभो' झालेले नव्हते तेंव्हा फ़क्त घासून-पुसून स्वच्छ झालो आणि आम्ही तोलारखिंडीकडे निघालो. गुहेमधून बाहेर पडलात की उजव्या हाताची वाट तोलार खिंडीकडे जाते. गेल्या ३-४ दिवसाच्या ट्रेकवर गप्पा टाकत आम्ही चालत होतो. तशी घाई नव्हतीच कारण पुढे अख्खा दिवस पडला होता खिरेश्वरला पोचायला. दिवाळी पहाट तर हुकली होतीच मग आता उगाच धावाधाव करून काय उपयोग होता? हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून तोलारखिंड चांगली ५-६ किमी. लांब आहे. मध्ये अनेक ढोरवाटा येउन मिळतात. त्या पार करत मुख्य वाट न सोडता खिंड गाठायची होती. मध्ये अनेक छोट्या-छोट्या टेकड्या लागतात. वाट संपता संपत नाही. अक्षरश: अंत पाहते. तुम्ही कधी गेलात तर ह्या वाटेवर दुपार टाळा. घसा सुकून जीव जाईल पण वाट संपणार नाही. आम्ही मात्र सकाळी सकाळी निघालो असल्याने तितका त्रास जाणवत नव्हता. शिवाय खायचे सर्व सामान देखील संपले होते. जे उरले होते ते गडावर बाळूला देऊन आलो. आश्चर्य वाटेल पण त्याने ते फुकट घेतले नाही. योग्य ते पैसे आम्हाला देऊ केले.आम्ही त्याच्याकडून मात्र थोड़े कमी पैसे घेतले. उरलेले पार्ले-जी मात्र मी जवळच ठेवले. ते आजच्या दिवसात संपवायचे होते ना मला... ;)

आम्ही निवांत असलो तरी तिकडे आमच्या घरी मात्र पालकांची धावाधाव सुरू होती. का विचारताय? काल संध्याकाळी घरी आम्ही जे घरी पोचायला हवे होतो ते अजून सुद्धा पोचलेले नव्हतो. शिवाय कोणीच घरी संपर्क करू शकले नव्हते. आमच्यापैकी सर्वचजण पहिल्यांदाच असे ट्रेकला सह्याद्रीत आले होते तेंव्हा घरी काळजी वाटणे साहजिक होतेच. सत्याच्या आईने आमचे ट्रेकचे दुसरे सर म्हणजे 'चारूहास जोशी' यांना गाठून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी "अजून काहीही माहिती आलेली नाही. आपण १ दिवस थांबूया. नाहीच काही कळले तर ट्रेकरूटवर उलट्या बाजूने आपण सर्च टीम पाठवू" असे सांगितले. थोडक्यात काय हाच नियम आहे सह्याद्रीमधला. सह्याद्री मध्ये आपण कुठेही अडकले असू तरी १-२ दिवसात कुठल्या ना कुठल्या संपर्क साधनांपर्यंत जाउन पोचतोच. तेंव्हा तितकी वाट बघावीच लागते. मात्र सत्याच्या आईचे काही त्याने समाधान झाले नाही. त्यांनी इतर पालकांना संपर्क साधला. त्यांना माझ्या वडिलांकडून समजले की त्यांनी ह्या संदर्भात आधीच पोलिस कंप्लेंट केलेली आहे. झाले असे की आमच्या पिताश्रींनी कालचा दिवस आणि मग पूर्ण रात्र आमची वाट पाहिल्यावर सकाळी तड़क उठून ठाणे कोपरी पोलिस स्टेशनला जाउन ह्या संदर्भात माहिती पोलिसांना दिली. तिकडून मग सर्व चक्र फिरली आणि पोलिस वेगवेगळ्या कंट्रोल रूमवरुन माहिती मिळवण्याचे काम करू लागले. इगतपुरी, कसारा, कल्याण इकडून काहीच माहिती येत नव्हती. कुठे कुठल्या ट्रेकर ग्रुपला अपघात वगैरे अशी सुद्धा माहिती नव्हती. पोलिसांनी सुद्धा "थोड़े थांबूया. आजच्या दिवसात काही माहिती आली नाही तर सर्च टीम पाठवू" असेच सांगितले.

ह्या सर्व प्रकाराची काहीही माहिती नसलेले आम्ही २१ उड़ाणटप्पू तोलारखिंडीच्या मार्गाने आगेकूच करतच होतो. २ तासात खिंडित पोचलो. तशी छोटीशी आहे खिंड. उतरायला फारतर ५-७ मिनिट लागतात. पण मध्ये-मध्ये खोबण्या धरत-धरत खाली उतरावे लागते. फारसा त्रास जाणवला नाही आम्हाला. खिंड उतरून गेल्यावर पायथ्याला वाटेला २ फाटे फुटतात. डावीकड्ची वाट जाते 'कोथळे'मार्गे 'कोतूळ'कडे. तर उजव्या हाताची वाट खिरेश्वरमार्गे खूबीकडे जाते. ह्याच वाटेने आम्ही पुढे जाणार होतो. या ठिकाणी वाघजाईचे एक छोटेसे मंदिर देखील आहे. इकडून फारतर तासभर उतरून गेले की खिरेश्वर गाव आहे. तेंव्हा एक छोटासा ब्रेक झाला. त्या ट्रेकच्या दुर्मिळ असलेल्या फोटोंपैकी हा एक. बघा मी सापडतो का... :)



तिकडून निघालो आणि वेळेत खिरेश्वरला पोचलो. डाव्या बाजूला खाली गाव आणि उजव्या हाताला वरच्या बाजुला हरिश्चंद्रगडाचे नेढ दिसत होतं. नेढ म्हणजे आरपार असणारे भोक. सुईमध्ये असते ना तसेच पण हे डोंगरामधले. त्या पलीकडून गडावर जायला अजून एक मार्ग आहे. पण सध्या त्या वाटेने फारसे कोणी जात नाही. पूर्वी मात्र तो राजमार्ग होता असे म्हणतात. आम्ही गाव डाव्या हाताला ठेवत रस्त्याला असणाऱ्या एका विहिरीपाशी निवांत पहुडलो. ११ वाजून गेले होते आणि भूका लागायला लागल्या होत्या. तांदुळ - डाळ वगैरे सामान तर आता काही सोबत नव्हते पण 'रेडी टू इट' जे काही होते ते सर्वांनी बाहेर काढले. अक्षरश: खजाना निघाला. चिवडा, चकल्या, शेव, लिमलेटच्या गोळ्या, पॉपिंस, पार्ले-जी आणि मारी बिस्किटे, फरसाण, गाठे असे जे काही म्हणून असेल ते सर्व एका पेपरवर एकत्र केले. मग ते 'स्पेशल मिक्स्चर' विहिरीच्या थंड पाण्यासोबत खाल्ले. सर्व टेस्ट मिक्स झाल्या होत्या. पण एक वेगळीच टेस्ट तयार झाली होती. वा. मज्जा आली ते खायला. पुन्हा कधी तरी असे बनवून खायला हवे. खिरेश्वर वरुन निघालो आणि पुढच्या रस्त्याला लागलो. इकडे आता एक छोटेसे धरण झाले आहे. भिंत मात्र चांगली १०-१५ मीटर रुंद आहे. आम्ही मात्र त्या भिंतीवरुन 'खूबी'कडे न जाता आधी गावाबाहेर उजव्या हाताला नागेश्वर मंदिराकडे वळलो. तेथील कोरीवकाम बघून थक्कच झालो. हे मंदिर यादवकालीन असून सध्या पूर्णपणे दुरावस्थेत आहे. तिकडून थोडेच पुढे एक लेणं आणि बांधीव टाके सुद्धा आहे. हे सर्व बांधकाम पाहून आम्ही पुन्हा धरणाच्या भिंतीवर येउन पोचलो.

आता ऊन डोक्यावर आले होते आणि समोर धरणावरची नागमोडी वाट संपता संपत नव्हती. मी आणि शेफाली गप्पा मारत चाललो होतो.पाहिल्या दिवसापासून अतिउत्साही असणारी कार्टी अजून सुद्धा पुढेच पळत होती. तर आता 'ही चाल कधी संपणार' म्हणत रेंगाळलेली काही पावले मागे राहिली होती. आम्ही दोघ मात्र गप्पा मारत मारत कधी पलिकडे पोचलो कळले सुद्धा नाही. अखेर ५ दिवसांनी आम्ही डांबरी रास्ता बघत होतो. गाड्या दिसत होत्या. आता मात्र घरी जायची ओढ़ एकदम वाढली. आपल्या आई-बापाला काळजीमध्ये टाकुन आपण मात्र इकडे मस्त मज्जा करतोय हे मनाला सारखे लागून राहत होते. एका चहाच्या टापरी शेजारी आम्ही बस्तान मांडले आणि येणाऱ्या S.T. ची वाट बघू लागलो. तेवढ्या वेळात बाजुच्या दुसऱ्या एका टपरीमध्ये वडयाची ऑर्डर दिली. मुरबाडला पोचेपर्यंत काही पोटात नको का. गावातल्या एका पोराकडून विल्याने एक फटाका घेतला आणि स्वतःची दिवाळी मधला फटाका फोड़ण्याची हौस भागवून घेतली. ३ च्या आसपास बऱ्यापैकी रिकामी एक गाडी मिळाली. त्यात घुसलो सर्व आणि मग अखेर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. उजव्या हाताला दुरवर हरिश्चंद्रगड़ आणि विहंगम कोकणकडा दिसत होता. पुढे पुढे जात होतो तसे काका आणि राजेश आम्हाला अजून काही गड़ किल्ले दाखवत होते. "तो बघा तो भैरवगड. हा जीवधन - नाणेघाट. तिकडे दूर दिसतोय ना तो गोरखगड आणि सिद्धगड़." जसजसे एक एक नवीन गड़-किल्ले बघत होतो तशी तिकडे जायची इच्छा अधिक तीव्र होत होती. २ तासाच्या प्रवासानंतर आम्ही मुरबाडला येउन पोचलो. ती गाडी आम्ही तिकडे सोडली आणि सर्वजण 'फोनबूथ'कडे धावले. काही क्षणात सर्व फोनबूथ आम्ही ताब्यात घेतले होते. घरी कळवा-कळवी झाली तसे आम्ही सुद्धा निवांत झालो. थोड्याच वेळात तिकडून निघालो आणि कल्याणमार्गे आपापल्या घरांकडे कूच झालो. आमचा सह्याद्रीमधला ५ दिवसाचा पहिलच ट्रेक सफळ संपूर्ण यशस्वी झाल्याने आम्ही भलतेच खुश होतो... ट्रेक संपला असला तरी एक कधीही न संपणारी 'सह्यभ्रमंती' नुकतीच सुरू झाली होती...
.
.
पुढील भाग - कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - सारांश ... !
.
.

Thursday, 14 January 2010

हरिश्चंद्रगड आणि विहंगम कोकणकडा ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...


सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर आमच्यापैकीच काही जणांची 'किलबिल' सुरू होती. आळस देत-देत बाहेर आलो आणि समोर बघतो तर काय... सुंदर दृश्य होते समोर... एक सुंदर पुष्करणी आणि त्याच्या बाजुलाच असलेले एक अतिशय महादेवाचे सुरेख मंदिर. काल रात्री अंधारात हे सौंदर्य बघायचे हुकले होते. थोड़े पुढे जाउन बाहेर पाहिले आणि परत मागे आलो. ज्या ठिकाणी राहिलो होतो ती जागा सुद्धा अप्रतिम होती. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. त्यातल्या सर्वात मोठ्या आणि राहण्याजोग्या असलेल्या दुसऱ्या लेण्यात आम्ही राहिलो होतो. शेजारच्या म्हणजे तिसऱ्या लेण्यात प्रवेश करतानाच चांगली २ मीटर उंचीची एक कोरीव गणेशमूर्ती आहे. त्यामुळे त्याला 'गणेशगुहा' असे ही म्हणतात. कालच्या 'लंबी रेस की दौड़' नंतर सर्वच थकलेले जाणवत होते. पण बसून चालणार नव्हते कारण आज ट्रेकचा शेवटचा दिवस होता. सकाळी गड़ बघून दुपारपर्यंत गड़ सोडून संध्याकाळपर्यंत 'तोलारखिंड - खिरेश्वर मार्गे खूबीफाटा' गाठायचा होता. तिथून पुढे मग माळशेज मार्गे मुरबाड. तेंव्हा आम्ही आवरायला घेतले. चहा बनत आला होता आणि नाश्त्याला काकाने पोहे बनवले होते. इतके मस्त झाले होते की चव अजून सुद्धा जिभेवर आहे. भूक लागली बघा मला लिहितानाच. ते आम्ही सर्वांनी खाल्ले. खाता-खाता काल रात्रीच्या मी हुकवलेल्या काही गोष्टींवर गप्पा सुरू झाल्या. काल रात्री गड़ चढताना कविता इतकी थकली होती की अखेर संतोषने तिची सॅक घेतली होती. पण त्यामुळे संतोषची पाठ दुखून आली होती. शिवाय मी झोपेत असताना कवीशने माझ्या तोंडाला टूथपेस्ट लावल्याचे समजले. (त्याचा बदला राहुलने नंतर घेतलाच... कसा ते पुढे येईलच.)

८ वाजत आले तसे काकाने आम्हा सर्वाना गड़ बघायला हाकलले. गड़ बघून १२:०० वाजता परत गुहेकडे यायचे होते. आम्ही आधी थेट समोर मंदिर आणि पुष्करणी पहायला गेलो. या पुष्करणीचे नाव 'सप्ततीर्थ' असे आहे. त्यात १४ कोनाडे असून आधी त्यात विष्णुमुर्त्या होत्या. खुप वर्षापूर्वी कोणा चोराने त्या पळवून नेल्या. आता असतील कुठल्या तरी श्रीमंत दिवाणखाण्यातल्या कोपऱ्यात. शेजारीच महादेवाचे प्रशत्र मंदिर आहे. आत प्रवेश केला की मोकळी जागा आहे. आतमध्ये शुद्ध, स्वच्छ आणि अतिशय थंड अश्या पाण्याच्या टाक्या आहेत. एक गणेशमूर्ती देखील आहे. देवळाशेजारून मंगळगंगेचा उगम होतो. अजून थोड़े पुढे 'केदारेश्वर' नावाचे अजून एक लेणं आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यामध्ये बरोबर मध्यभागी असलेला चौथरा आणि त्यावर असलेले भव्य शिवलिंग. हे लेणं ३-४ फुट खोल असून बर्फासारख्या थंड पाण्याने कायम भरलेले असते. आम्ही ते सर्व बघून पुन्हा वरती गुहेबाजुला आलो. इतके बाळूचे घर सुद्धा आहे. तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर त्याला सांगायचे. फ़टाफ़ट पीठल - भाकरी आणि सोबत कांदा-ठेचा लगेच तयार.(काय? भूक लागली ना वाचून? मग इकडे लिहिताना माझे काय होत असेल ते विचारूच नका.. :D)




आम्ही तिथून थेट कोकणकडयाकडे गेलो. गडाच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकणाकडे तोंड करून उभा असलेला हा कडा म्हणून त्याचे नाव 'कोकणकडा'. आता असा कोणी ट्रेकर नसेल ज्याने कोकणकडा पाहिला नसेल किंवा किमान त्या विषयी ऐकले नसेल. ह्याची महती काय वर्णावी... सह्यादी मधला सर्वात रौद्र आणि भीषण, बघता क्षणीच काळजात थरकाप उडवणारा असा हा अंतर्वक्र आकारात ६००-७०० मीटर लांबीचा आणि ४००० फुटपेक्षा अधिक उंचीचा हा कडा म्हणजे एक विचित्र विलक्षण प्रकार आहे. हिम्मत असेल तर ह्याच्या टोकावर उभे राहून दाखवा. हवेने उडून एक चक्कर नक्की खाल आणि मग पुन्हा येउन जमिनीवर आपटाल इतकी जोरात हवा असते. हेहे.. गंमत करतोय पण फेकलेले दगड सुद्धा बऱ्याचदा हवेने उडून वर येतात इतकी हवा असतेच. अर्थात तसे कृपया कोणी करू नका कारण न जाणे एखादा दगड खाली गेलाच आणि खालून कडयाला भिड़त एखादा प्रस्तरारोहक वर येत असेल तर??? होय .. १९८६ मध्ये हा कडा एका बह्हादराने (मिलिंद पाठक बहुदा) सर केला त्यानंतर अनेक सह्यवेडया प्रस्तरारोहकांनी ह्याची माती भाळी लावली आहे. येथे आता १२०० फुटांचे रेपेल्लिंग अणि व्हयाली क्रोसिंग सुद्धा होते. इथून सूर्यास्त पाहणे सुद्धा एक भन्नाट अनुभव आहे. सूर्यास्त होतो तो आपल्या डोळ्याखाली. म्हणजे 'eye लेवल' खाली. कधी गेलात तर हा अनुभव चुकू नका. पावसाळ्यात गेलात तर फ़क्त इंद्रधनुष्य नव्हे तर इंद्रवज्र सुद्धा दिसू शकते. सूर्य आपल्यावर आणि ढग आपल्याखाली असल्याने आपण बरोबर मध्ये येतो आणि हे असे घडते. मी कुठल्या गडावर नाही मात्र महिन्याभरापूर्वी कामावर जाताना विमानातून पाहिले. सुंदर आणि अवर्णनीय असे. आम्ही गेलो तेंव्हा दुपार झालेली होती तेंव्हा पहिल्यांदा आम्ही हा अनुभव चुकवला हे सांगायला नकोच. पण त्यानंतर मी अजून २ वेळा जाउन आलोय हरिश्चंद्रगड़ला फ़क्त इथून सूर्यास्त पाहण्यासाठी. कोकणकडयाचे दर्शन घेउन तृप्त झालेले आम्ही तसेच उजव्या हाताला सरकत 'तारामती' आणि 'रोहिदास' ह्या गडाच्या २ शिखरांवर गेलो. वर तसे फार काही नाही पण वरुन मंदिर आणि आसपासचा परिसर सुंदर दिसतो. गड़ दर्शन करून परत गुहेकडे जात असताना लक्ष्यात आले की १२ वाजून गेलेले आहेत. तेंव्हा आता आम्ही पुन्हा काकाच्या शिव्या खायला तयार झालो होतो.


पोचल्या पोचल्या काकाने फर्मावले,"सर्वानी समोर फॉल इन करा. एकतर लेट आलाच आहात. पण मला सांगा सकाळी पोहे खायचे सोडून टाकुन कोणी दिले? मला बाजुच्या गुहेत कोपऱ्यात सापडले आहेत." आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो. पोहे खरे तर इतके मस्त झाले होते की कोणी टाकेल असे वाटत नव्हते. मला तर अजून हवे होते. आणि हा कोण आहे चायला टाकुन देणारा. "इकडे लोकांना खायला मिळत नाही आणि तुम्ही वाया घालवता? हवे तितकेच घ्याना." काका थांबत नव्हता. "जोपर्यंत मला कळत नाही तो/ती कोण आहे तोपर्यंत आपण इकडून हलणार नाही आहोत." आयला.. हलणार नाही म्हणजे? आज तर कुठल्याही परिस्थितिमध्ये घरी पोचायला हवे होते कारण दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाट होती. झाले असे की काकाला गुहेबाहेर अचानक एक धामण दिसली. तिला पकडायला तिच्या मागे-मागे तो त्या गुहेमध्ये शिरला तिकडे त्याला कोपऱ्यात हे पोहे टाकलेले दिसले. बराच वेळ गेला तरी कोणी हात वर करेना आणि काका सुद्धा काही बोलेना. शेवटी काकाने ट्रेकमधला अजून एक बोंम्ब फोडला. "आज आपण घरी जाणार नाही आहोत. इकडेच राहणार आहोत. आणि आता जेवण झाल्यावर आपण आपली राहती केव्ह साफ़ करणार आणि धुणार आहोत." आता आम्हाला काय बोलावे कळत नव्हते. माझ्या डोळ्यात नकळत पाणीच आले होते. मी काकाला जाउन बोललो,"हे बघ. ते पोहे मी टाकले होते. तू काय ती शिक्षा दे. पण आपण आज घरी जाउया. उदया दिवाळीचा दिवस आहे." तो बोलला,"रोहन. मला माहीत आहे पोहे कोणी टाकले आहेत. तेंव्हा तू स्वतःवर ते घेऊ नकोस. आणि आपण आत्ता निघालो तरी संध्याकाळ होईपर्यंत रस्त्यावर पोहचू शकत नाही तेंव्हा आज आपल्याला इकडेच राहणे आहे. कारण मधला रस्ता सेफ नाही. उदया सकाळी-सकाळी आपण इकडून निघू."



आम्ही खिन्न मनाने जेवून घेतले. कोणाचाच मुड नव्हता. कोणीच काही बोलत नव्हते. जेवणानंतर काकाने ती पकड्लेली धामण बाहेर काढली. आम्हा सर्वांना दाखवून मग तिला आम्ही सोडून दिले. दुपारी ३ वाजता मग सुरू झाला धूवाधूवीचा प्रोग्राम. आम्ही ती पूर्ण जागा साफ़ केली. आपण आपले घर साफ़ करतो ना. मग आपले गड़-किल्ले?? ते आपण साफ़ नाही करायचे मग कोणी करायचे? शिक्षा नव्हतीच ती... डोंगरातल्या शाळेचा अजून एक वर्ग होता तो. जवळ-जवळ २ तास ही साफ़ सफाई सुरू होती. मग आम्ही निवांत झालो. हळू-हळू सर्वांचा मुड सुद्धा परत येत होता. संध्याकाळी आम्ही काहीजण गुहेच्यावरती जाउन बसलो. राजेश आम्हाला एक-एक किल्ले आणि डोंगर दाखवत होता. डोंगरांच्या एकामागे एक अश्या ४-५ रांगा दिसत होत्या. त्यात दुरवर कळसुबाई सुद्धा दिसत होते. "इतके दूर आलो आपण चालत? किमान ८०-९० किमी. नक्कीच असेल ना रे." मी राजेशला विचारले. "हो सहज असेल" तो उत्तरला. इतक्यात राहुल चढून वर आला आणि बोलला,"ऐ. कवीश बघ कसा पाय खाजवतोय. हाहा.. खाजखुजली लावून आलो त्याच्या पायाला." काल रात्रीचा बदला अखेर राहुलने घेतला होताच. त्यानंतर बराच वेळ तो खाजवत बसला होता हे सांगायला नकोच. अंधार पडत आला तसे आम्ही अजून सरण आणले. आणि जेवणाची आणि शेकोटीची तयारी केली.

रात्री जेवायला काकाने आणि शेफालीने 'दाल ढोकळी' केली होती. सोबत 'गुलाबजाम' होते. 'दाल ढोकळी'ची वाट लागली होती तर गुलाबजाम मात्र जबरी झाले होते. आता घेतलेले टाकू तर शकत नाही मग त्यासाठी डीलिंग सुरू झाले. "अरे. थोड़ी दाल ढोकळी घे. हवतर २ गुलाबजाम घेतो" इथपर्यंत. मी मात्र गुलाबजाम सोडले नाहीत अजिबात. दिवाळीच्या दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबरला प्रशांतचा वाढदिवस होता. तेंव्हा रात्री न झोपता गप्पा टाकत बसायचे आणि तो सेलेब्रेट करायचा असा प्लान ठरलेला होताच. चांदण्या रात्रीच्या त्या गप्पा काय होत्या हे काही आता आठवत नाही पण ट्रेक संपता-संपता आमचा एकजीव ग्रुप मात्र बनला होता. ४-५ दिवसांपूर्वी आम्ही सर्व एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो हे कोणाला सांगितले असते तर खरे वाटले नसते. हिच तर किमया आहे निसर्गाची... सह्याद्रीची... त्याच्या मदतीने अजून काही सह्यवेडे तयार करण्यात काका सपशेल जिंकला होता आणि आमच्या नकळत त्याने आम्हाला सुद्धा जिंकवले होते. रात्री बऱ्याच उशिराने आम्ही सर्व झोपी गेलो. प्रशांतला वाढदिवसाच्या आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आम्ही निवांतपणे झोपी गेलो. पण... तिकडे आमच्या सर्वांच्याच घरी काय घडत होते ह्याबाबत आम्ही पूर्णपणे गाफिल होतो. आज रात्रीपर्यंत घरी पोचायचे होते ना आम्हाला.. :) बघुच पुढच्या भागात काय होतय ते. परतीचा प्रवास सुरू झालाय...
.
.
पुढील भाग - परतीचा प्रवास 'तोलरखिंड' मार्गे ... !
.
.

Tuesday, 12 January 2010

मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़कडे ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...

आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण' सुळका समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती. रतनगड़ येथील खुट्टा आणि बाण हे सुळके, अग्नीबाण सुळका, आजोबची प्रचंड प्रस्तर भिंत हे सर्व सह्याद्रीमधल्या प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान. आज आमच्यामधले प्रवीण, आशीष, राहुल, सुरेश हे यशस्वी प्रस्तरारोहक आहेत.

चालता चालता आमच्या गप्पा सुरूच होत्या. अग्नीबाण मागे पडला तशी आम्ही डावी मारली आणि अखेरच्या चढाला लागलो. खिंड गाठली आणि पुन्हा डावीकडे उतरु लागलो. खिंडीतून पुढे उतार असल्याने थकवा जाणवत नव्हता तसा. इकडे मध्ये बऱ्याच फसव्या वाटा आहेत. शिवाय लोकवस्ती देखील नाही. एखाद दुसरा लाकुडतोड्या दिसला तरच. तेंव्हा वाटा जपून घ्याव्यात. चुकलात तर अमूल्य असा वेळ वाया जायची १०० टक्के खात्री. सर्वात पुढे राजेश आणि विल्या होतेच. तेंव्हा आम्ही आपले 'जाऊ रे त्यांच्या मागल्या' करत होतो. पण डोंगरातून, जंगलातून ट्रेक करताना वाटेवरच्या खुणा कश्या लक्ष्यात ठेवाव्यात, मार्किंग्स कसे घ्यावेत, थोडक्यात 'रूट'चे नव्हिगेशन कसे करावे याचा अंदाज हळू-हळू येऊ लागला होता. राहत्या जागेपासून निघून ३ तास होत आले होते आणि आम्ही 'वाकडी'च्या पायथ्याला पोचत होतो. मागे दुरवर अजुनही अग्नीबाण दिसत होताच. पण जिकडे जायचे होते तो हरिश्चंद्रगड़ अजून सुद्धा टप्प्यात येत नव्हता. ऊन जसे-जसे वाढायला लागले तशी तहान वाढत गेली. जिकडे राहिलो होतो तिथूनच पाणी भरून घेतले होते ते संपू लागले. वाटेत जिथे कुठे ओहोळ-ओढा लागेल तिथे आम्ही पाणी भरून घ्यायचो आणि पुढे निघायचो. सर्वात पुढे राजेश आणि सर्वात मागे काका असल्याने चुकायची तशी भीती नव्हती. आशिष, संतोष, विवेक, अभिषेक, सुरेश, दीप्ती, प्रवीण ही पहिल्या दिवसापासून पुढे असलेली टोळी पुढेच होती तर मागचे शेफाली, जाड्या, कविता, हिमांशु हे भिडू मागेच होते. मी, अभि, मनाली, सत्या, सुमेधा, प्रशांत, कवीश असे काहीजण आपले मध्य गाठत बरोबर मध्ये होतो.

'वाकडी'हून पुढे मळलेली वाट लागली. उजव्या हाताला कुमशेत दिसू लागले होते. तिकडे पोचायला अजून किमान तास-दिडतास तरी लागणार होताच. एव्हाना ११ वाजून गेले होते. जितका स्पिड असायला हवा होता त्यापेक्षा बऱ्याच कमी स्पिडने आम्ही पुढे सरकत होतो. थकवा जाणवू लागला होता आणि सॅक्स पुन्हा एकदा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. दर काही मिं. नंतर थांबावे लागायचे आणि दम घ्यावा लागायचा. मला तर भूक सुद्धा लागली होती. बहुदा सर्वांनाच. मी माझ्या सॅकमधून पार्ले-जीचे पूड़े काढून कमरेच्या पाउच मध्ये टाकले आणि एक-एक खायला लागलो. शेफाली एव्हाना स्पिड वाढवत आमच्यापर्यंत येउन पोचली आणि आता आम्ही गप्पा मारत पुढे जाऊ लागलो. माझी बिस्किट्स संपली की ती सॅकमधून अजून पार्ले-जीचे पूड़े काढून देई. माझ्या शिवाय मात्र कोणी ती बिस्किट्स खाईना. सर्वांचे मत त्याने तोंड आतून सुकते आणि घसा अजून कोरडा होतो असे होते. तर माझ्या मते त्याने शरीरामधील शुगर आणि ग्लूकोज लेवल नीट राहते आणि थकवा जाणवत नाही असे होते. आजही मी ट्रेकला पार्ले-जी सोबत ठेवतो. आता तर मला आमच्या ग्रुपमध्ये 'पार्ले-जी किंग' हे डोंगरातले नाव देखील मिळाले आहे. नाव ठेवणारा दुसरा तीसरा कोणी नसून माझा सह्यसखा 'अभिजित'च आहे.

आता कुमशेत पर्यंत संपूर्ण उतार होता. डोंगराच्या उजव्याकडेने तर कधी वळसा घालत डाव्याकडेने आम्ही खाली उतरत होतो. लक्ष्य समोर असल्याने वाट चुकायचा प्रश्नच नव्हता. वेळ मात्र चुकली होती. नेहमीप्रमाणे... इतके पोचायला साधारण २ तास उशीर झाला होता. गावात पोचलो. आता इथपर्यंत गाडी रास्ता झाला आहे. 'राजुर'वरुन इथे आणि पाचनईला सुद्धा गाडीने पोचता येते. तेंव्हा रस्ता होता का आठवत नाही पण आम्ही नदीकाठच्या वाटेने पाचनईला पोचणार होतो. कुमशेत गाव थोड़े उजव्या हाताला ठेवत आम्ही नदीकाठाकडे निघालो. नदी पाहिल्यावर वाटले अरे.. 'मंगळगंगा' आली सुद्धा म्हणजे आपण फार दूर नाही आहोत पाचनईहून. पण नंतर कळल की ही आहे 'मुळा नदी'. ( पुण्याजवळची मुळा नदी नव्हे.. ती वेगळी..) अजून पुढे गेलो की मंगळगंगा आणि मुळा एकत्र होतात तिकडून पुढे काही अंतरावर पाचनई आहे. २ वाजत आले होते आणि अजून जेवण बनवायचे होते. काल दुपारी सुद्धा रतनवाडीला पोचायला उशीर झाल्याने दुपारचे जेवण रद्द केले गेले होते. आज मात्र जेवण बनवायचेच होते. पण सर्व इतके दमले होते की आता लाकडे जमवून, चुल पेटवून मग जेवण बनवायचे आणि मग जेवायचे हा प्रकार जीवघेणा वाटत होता. जेवण बनवायची जबाबदारी खुद्द काकाने उचलली होती. सर्वच भिडू चांगलेच दमल्याचे त्याला लक्ष्यात आले होते. राजेश गावातून कुठून तरी कसलीशी गावठी भाजी सुद्धा घेउन आला. मग तो, काका आणि विल्या जेवण बनवायला लागले. अंगात जीव असलेल्या काही जणांनी त्यांना लाकडे जमवून आणि सामान काढून दिले. आम्ही सर्वजण चादरी पसरून निवांत आराम करत होतो. काहीजण नदीमध्ये पोहायला गेले होते. तिकडे जेवण बनत होते पण आम्ही कोणीच काकाला काही मदत करत नव्हतो. तासभर वाट बघून अखेर मी, अभिषेक आणि आशीष दमलो. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. काकाने जेवण तयार झाल्याचे सर्वांना सांगितले. पण ज़रा आधी न राहून मी सॅकमधून तिखट शेवचे एक पाकेट काढले होते आणि खायला लागलो होतो. झाले... काकाने ते पाहिले आणि तो आमच्यावर भलताच डाफरला. "मी इकडे तुमच्यासाठी जेवण बनवतोय आणि तुम्ही काय हे सटर-फटर खाताय. तुम्हाला फुकट बनवून खायला घालायला मी काय आई आहे का तुमची. किमान किम्मत ठेवा ज़रा."

आमचे पुढे काही न ऐकता काकाने कवीशला हाक मारले. "कवीश. यांच्या पाठीवर रात्रीच्या जेवणाचे सुद्धा सामान दे आणि ह्याना पुढे जाऊ दे. नाहीतरी ह्यांना जेवायचे नाही आहे." कवीश सुद्धा काकाची आज्ञा पाळत आमच्या सॅक्स भरताना जास्तीतजास्त सामान कसे भरले जाईल हे बघत होता. त्यात रात्रीच्या जेवणासाठी न लागणारे सामान सुद्धा होतेच. आमच्या तिघांबरोबर म्हणजे मी, आशीष आणि अभिषेक बरोबर विवेक सुद्धा लटकला होता. काकाने आमच्या बरोबर राजेशला पाठवले. लवकर गडावर पोचायचे आणि रात्रीचे जेवण बनवून ठेवायचे अशी आम्हाला शिक्षा होती. माझे टाळके आता पूर्णपणे फिरले होते. सामानाने गच्च भरलेली ती वजनी सॅक उचलताना मी शेवटी न राहून बोलून गेलोच. "हा म्हातारा काय समजतो स्वतःला." काकाने ऐकले की ते माहीत नाही पण ज्यांनी ऐकले ते गार पडले. आता काका तसे म्हातारे नव्हते. ४० च्या आत वय. फ़क्त गिर्यारोहण करून केस जास्त सफ़ेद झाले होते इतकेच. न जेवता भुकेल्या पोटी आम्ही ५ जण सर्वांच्या पुढे निघालो. सर्वांच्या पाठीवर आता अधिक सामान होते. पण आता लवकर पोचायचेच असे आम्ही ठरवले होते.थोड़े पुढे जाउन 'शेव'ची ती पिशवी आशिषने परत बाहेर काढली आणि आमचा छोटासा मिनीलंच चालता-चालता उरकला. राजेश सोबत होता तेंव्हा वाट चुकायचा प्रश्न नव्हताच. शिवाय जेवण बनवायचे सर्व सामान आमच्याकडेच असल्याने ती ही चिंता नव्हती. कुठे आडवाटेवर अडकलो, चुकलो तरी चिंता आता बाकीच्यांना असणार होती.

कुमशेत सोडून पुढे गेलो की उजव्या हाताला अजिबात जायचे नाही. समोरच्या टेकडीला बगल देत डाव्या हाताला वळलो आणि पुढच्या पठारावर पोचलो. आत्ता कुठे तो हरिश्चंद्रगड़ नजरेत येऊ लागला. अंतर बरेच होते. "किमान ५ तास तरी लागतील." - राजेशचा अचूक अंदाज. पुढे पुन्हा एक ओढा लागला. तो पार केला आणि पुढच्या टेकडावर चढलो. वाट मळलेली होती तेंव्हा आम्ही सुद्धा कुरकुर न करता तिच्यासोबत जात होतो. आता वाट नदीच्या काठाकाठानेच पुढे जात राहते. नदी उजवीकडे वळली की वाट सुद्धा उजवीकडे वळते. नदी डावीकडे वळली की वाट सुद्धा डावीकडे वळते. मध्येच कुठेकुठे ओढे लागतात. ते अडसं-दडसं करत पार करायचे. पाठीवरच्या सॅक सांभाळत पाण्यातल्या दगडांवरुन उदया मारत जायला मज्जा येत होती. मध्येच आम्ही थांबायचो, खांदे मोकळे करायचो, काहीतरी खायचो आणि पुढे निघायचो. ३ तास होउन गेले तरी दुरचा तो हरिश्चंद्रगड़ काही जवळ येईना. संध्याकाळ होत आली होती. राजा हरिश्चंद्र म्हणायचे "राज गया... मेरा ताज गया..." त्याप्रमाणे आता आम्हाला बोलावेसे वाटत होते. "पाठ गेली रे माझी.. खांदे पण गेले.. अब बस भूक लगी है." हेहे.. :D जोक्स अपार्ट.. त्या राजाला त्याच्या आयुष्यात बरेच कष्ट पडले होते. तेंव्हा त्याच्या नावावर असलेल्या गडावर जताना आम्हाला सुद्धा काही कष्ट घेणे क्रमप्राप्त होतेच. अंधार पड़ता-पड़ता अखेर 'पायलीची वाडी' आली. इकडून नदी ओलांडून आम्ही पलिकडच्या बाजुला गेलो आणि पाचनईच्या रस्त्याला लागलो. नदी आता डाव्याहाताला मागे मागे राहून गेली. आम्ही एका टेकाडावर चढून पुढे उतरलो तर नदी सुद्धा वळसा मारत तिकडेच आली होती. म्हटले "राजेश काय रे? पुन्हा नदी क्रोंस करायची आहे का?" तो म्हणाला,"नाही. पण एक छोटा ओढा ओलांडायचा आहे. लवकर चला. पूर्ण अंधार झाला तर कुठून पार करायचा ते कळणार नाही आपल्याला." त्यावर आशीष बोलला,"आयला मग ते मागचे सर्व चक्रम कसे पोचणार? आज रात्री काय २१ जणांचे जेवण आपणच बनवून आपणच संपवायचे काय? मी काका आल्याशिवाय जेवण बनवायला सुरवात करणार नाही आहे. बास." आम्ही हसून-हसून आडवे व्हायचे बाकी होतो. खरच इतका वेळ मागचे भिडू कुठे असतील? त्यांना यायला तर पूर्ण अंधार होणार मग ते कसे पोचणार हे प्रश्न आता पडायला लागले होते. "ते लोक दुसरीकडेच राहिले तर त्यांचे जेवणाचे वांदे होतील रे." मी बोललो. त्यावर लगेच अभि उत्तरला. "आपण नेउन देऊ बनवलेले जेवण." पुन्हा एकदा हलके फुल्के जोक्स झाले. गप्पा मारता मारता आम्ही पाचनईच्या दिशेने वाटचाल करताच होतो. ७ वाजून गेले होते. पूर्ण मिट्ट अंधार झाला होता. अचानक बैलाच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज आला. गाव एकदम जवळ असल्याची ती पोचपावती होती.

पुढे २ मिं. मध्येच गाव लागले. गावातल्या मारुती मंदिरात आम्ही टेकलो आणि निवांत झालो. सकाळपासून तसे पोटात फारसे काही गेले नव्हते. 'दुपारचा लंच' सुद्धा केलेला नव्हता. मारुतीच्या देवळात बसल्या-बसल्या मला डुलकी लागली. जाग आली तेंव्हा बाहेर गड़बड़ ऐकू येत होती. मागचे सर्व भिडू येउन पोचले होते. राहुल आणि शेफाली हातात कॉफ़ीचा मग घेउन आले. चायला.. जणू काही माझा आमरण उपवास होता आणि मी तो हरिश्चंद्रगड़ला गेल्या शिवाय सोडणार नव्हतो. कॉफी घेतली तशी ज़रा तरतरी आली. माझ्या अंगात ताप भरला होता. सर्वच जण प्रचंड दमलेले दिसत होते शिवाय गडावर चढून जायला खुप उशीर सुद्धा झाला होता  तेंव्हा आज आपण इकडेच राहणार असा आमचा (गैर)समज झाला. काकाने आपल्याला आज रात्री काहीही करून गडावर जायला हवेच असे स्पष्ट केले. आता मात्र थकलेल्या चेहरे पूर्ण पडले होते. मुलीच नाही तर मूले सुद्धा खुपच दमली होती. तरीपण जसे जमेल तसे एकमेकांना मदत करत वरती जायचे नक्की झाले होते. ९ वाजले होते आणि आता आम्ही सर्व गडावर जाणार होतो. गावातून एक वाटाडया सुद्धा घेतला होता. राहुलच्या म्हणण्याप्रमाणे मी माझी सॅक त्याला देऊन वरपर्यंत कमी वजन उचलून जावे असे होते. तर माझे मत स्पष्ट होते. मी ही सॅक घेउन वरपर्यंत जाणार म्हणजे जाणार. रात्रीच्या त्या अंधारात आमची वाटचाल सुरू झाली. पुन्हा एकदा पुढे मी, आशीष, अभिषेक आणि राजेश. अर्थात आमच्याही पुढे तो वाटाडया होताच. मी अर्ध्याअधिक झोपेत चालत होतो. मध्येच धडपडायचो आणि मग त्याला विचारायचो. "अजून किती जायचय रावं?" तो प्रोफेशनल वाटाडया होता बहुतेक. दरवेळी "बास. हे काय हिक्कड़ हाय आता. अजून १० मिंनितं" असे उत्तर देऊन आम्हाला समाधानी करायचा. त्या वाटेवरची एक जागा सुद्धा मला लक्ष्यात नाही आहे. पुन्हा एकदा त्या वाटेवरून ट्रेककरून हरिश्चंद्रगड़ सर करायची खुप इच्छा आहे बरेच वर्ष. बघुया या वर्षी जमते का ते.

गडावर पोचलो तेंव्हा १२ वाजून गेले होते. कुठे काय काही समजत नव्हते. एका देवळाशेजारून पुढे जाउन कुठल्या तरी मोठ्या गुहेत शिरलो इतकेच काय ते समजले. आत जाउन पुन्हा मी आडवा. जेवण कोणी बनवले माहीत नाही. जेवायला राहुलने उठवले तेवढे मात्र कळले. जेवताना तोंडाला टूथपेस्टचा स्मेल येत होता. मी झोपलेलो असताना बहुदा कोणीतरी लावली असावी. जेवलो आणि पुन्हा आडवा झालो. इतका दमलो होतो की बाकी काही करणे शक्य नव्हते. आजवर मी इतका कधीच दमलो नव्हतो. पहाटे ६ ते दुपारी २ आणि परत दुपारी ३ ते रात्री १२ असा जवळ-जवळ १५-१६ तासांचा ट्रेक झाला होता आज एका दिवसात. ट्रेकच्या ३ऱ्या दिवशी अजून अनुभव घेत आम्ही आडवे झालो. सकाळी हरिश्चंद्रगडाचे आणि विहंगम अश्या कोकणकडयाचे दर्शन घेण्यासाठी...
.
.
पुढील भाग - हरिश्चंद्रगड आणि विहंगम असा कोकणकडा ... !
.
.

Thursday, 9 April 2009

भाग २ - ढाक-भैरी ते राजमाची ... !

आता लक्ष्य होते कुंढेश्वर. ४ पर्यंत तरी तिकडे पोचणे अपेक्षित होते. तरच कुठे अंधार होईपर्यंत आम्ही राजमाचीला पोचणार होतो. मजल-दरमजल करीत निघालो. वाटेमध्ये सगळीकड़े ओहोळ लागत होते. मध्येच अडसं-दडसं ते ओलांडत आम्ही पुढे जात होतो. आमचा वेग चांगलाच वाढला होता. आता दूरवर कुंढेश्वर देऊळ दिसू लागले होते. एक क्षण मागे वळून ढाककड़े पाहिले तर काय ... जंगलामध्ये लपून बसलेल्या गेंड्यासारखा आकार घेउन तो आमच्याकडेच पाहत होता. ढाक किल्ल्याचा माथा म्हणजे गेंड्याचे डोके तर कळकराय सुळका म्हणजे त्याचे शिंग असा तो स्पष्ट दिसत होता. डोंगराचा तो आकार आम्ही कॅमेरामध्ये टिपला आणि देवळाकडे निघालो. देवळापासून पुढे वाट चुकलो की काय माहीत नाही पण ठळक वाट काही भेटत नव्हती. मध्येच वाट पूर्णपणे चुकलो. पुन्हा मागे आलो आणि वाट शोधायला लागलो. उजव्या हाताला मांजरझुम्याचा डोंगर होता. त्या पलिकडे राजमाचीचे जोड़किल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन दिसत होते. म्हणजे आता डाव्याबाजूला दुरवर वळवंड धरण दिसायला हवे होते. पण अजून सुद्धा काही ते दिसत नव्हते. आता निश्चितपणे राजमाचीच्या पायथ्याला असलेल्या उधेवाडीला जाईपर्यंत मिट्ट अंधार पडणार होता. आता एक स्पष्ट वाट मिळाली पण त्यावर पुढे सरकायचे की राहायला वळवंड गावाकडे जायचे अस प्रश्न मनात होता. कारण ५:३० होत आले होते. आम्ही अखेर पुढे सरकायचे ठरवले. थोडा पुढे जाउन एक चढ दिसला. तो चढून वर गेलो की वाट सापडेल असे वाटत होते. ह्या ठिकाणी आम्हाला कधी नाही इतका सोसाट्याचा वारा अंगावर घ्यावा लागला. इतका की अभिजित आणि आशिष आता हवेत उडतील की काय असे वाटत होते. वारा सारखा मागे ढकलत होता आणि त्या चढावर पुढे सरकणे अशक्य झाले होते. अवघ्या ५-७ मिं. मध्ये आमची पुरती दमछाक झाली होती. कसाबसा तो टप्पा पार करून आम्ही वर चढून गेलो आणि काय... मुळ लालमातीची वाट आमचीच वाट बघत उभी होती की तिकडे...








मळलेली पायवाट आता आम्हाला राजमाची पर्यंत घेउन जाणार होती. त्या वाटेवर भर-भर चालत होतो. पूर्ण अंधार पडायच्या आधी किमान खंडाळ्याहून राजमाचीला जाणाऱ्या रस्त्याला लागणे आवश्यक होते. एकदा का तिकडे पोचलो की पुढचा रस्ता अंधारामध्ये सुद्धा पार करता येणार होता. मध्येच एक पाडा लागला. तिथल्या एका पोराला 'कुठला शॉर्टकट आहे का' असे विचारले. त्याने आम्हाला एक मस्त शॉर्टकट दाखवला. त्या वाटेने आम्ही राजमाचीच्या मुळ रस्त्याला लागलो. आमचा किमान अर्धा तास तरी वाचला होता. आता पूर्ण अंधार पडला होता आणि आमची वाटचाल अजून राजमाचीकड़े सुरूच होती. साधारण ७ च्या सुमारास आम्ही राजमाचीच्या तुटक्या तटबंदी मधून प्रवेश करते झालो. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि सामसूम. अखेर उधेवाडी आली. आशिषच्या ओळखीच्या एका घरामध्ये मुक्काम टाकला. पथारी पसरली, निवांतपणे पहुडलो आणि गप्पा मारत बसलो. दिवसभरात चालून इतकं दमलो होतो की जेवल्यानंतर लगेच गुडुप झालो. दसऱ्या दिवशी सकाळी उठलो तो पर्यंत अख्खी उधेवाडी माणसांनी भरून गेली होती. एक तर रविवार त्यात पावसाळा. राजमाची हा सगळ्या ट्रेकर्सचा एकदम फेवरेट स्पॉट. सगळ आवरून गड़ बघायला निघालो. आज पाउस तितका पडत नव्हता त्यामुळे निश्चिंती होती. राजमाची हा प्रचंड किल्ला आहे. किल्ल्यात आहेत २ बालेकिल्ले. श्रीवर्धन आणि मनोरंजन. त्यामध्ये वसली आहे उधेवाड़ी आणि थोडं वर आहे काळभैरव मंदिर. मंदिराचे पटांगण प्रशस्त्र आहे आणि जवळच आहे पिण्याच्या पाण्याचे टाकं. मंदिरासमोर आहे श्रीवर्धन आणि मागच्या बाजूला आहे मनोरंजन किल्ला. येथुनच थोड्या अंतरावर आहे गडावरील शंभू महादेवाचे मंदिर. मंदिरासमोर पाण्याचा प्रशत्र तलाव आहे. वर्षभर गडाला पुरेल इतके पाणी ह्यात साठवता येईल इतका मोठा. आजूबाजूला परिसर सुद्धा सुंदर आहे. हे मंदिर सुद्धा खूप रेखीव असून हल्लीच जमिनीमध्ये दबलेला ह्याचा खालचा अर्धा भाग खोदून मोकळा केला गेला आहे.







आता आम्ही श्रीवर्धन गडाकड़े निघालो. काही वेळातच उजव्याबाजूला गडाचा दरवाजा लागतो. तिकडून थोडेसे पुढे गडावरील गणेशगुहा आहे. अजून पुढे सरकलो की आपण किल्ल्याच्या वरच्या भागात पोचतो. या ठिकाणाहून समोरच्या व्याघ्रदरी मधल्या धबधब्याचे सुंदर दृश्य पहावयास मिळते. पुढे जाउन व्याघ्रदरी मधल्या पाण्याचा उल्हास नदी सोबत संगम होतो. इकडून आता मागच्या बाजुच्या बुरुजावर गेलो की दुरवर मांजरझुम्याचा डोंगर आणि ढाक किल्ल्याचे दर्शन होते. श्रीवर्धन गडाच्या माथ्यावर दरवर्षी झेंडावंदन होते. गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. आम्ही गड़फेरी पूर्ण करून परत खाली मंदिरात आलो. आता लक्ष्य होते मनोरंजन.







मनोरंजन किल्ल्याचा दरवाजा आणि पायऱ्या अधिक बिकट अवस्थेत आहेत. गडावर काही पाण्याच्या टाक्या आणि एक धान्य कोठी आहे. गडावरुन उधेवाड़ी आणि गावाबाहेर असलेल्या शेतीचे सुंदर दृश्य दिसते. श्रीवर्धन गडाची उतरत्या डोंगरावरची वेडीवाकड़ी तटबंदी मनोरंजन वरुन फारच सुंदर दिसते. वेळ कमी असल्याने आम्ही ही गडफेरी आवरती घेतली आणि परतीच्या मार्गाला लागलो.







पुन्हा गावात आलो, दुपारचे जेवण आटोपले आणि साधारण २ च्या सुमारास गड़ सोडला. आता खाली कोकणात उतरून कोंदीवडे गाव गाठायचे होते. खाली उतरताना बराच वेळ मनोरंजन किल्ला आपली साथ करत असतो. एक-एक करून खालच्या टप्यावर उतरु लागलो तसे मस्त धबधबे दिसू लागले. कितीही पुरेसा वेळ असला तरी एका-एका धबधब्यामध्ये डुंबायला वेळ पुरणार नाही इतके मस्त. अश्याच एका धबधब्यापाशी आहेत कोंढाण्याची सुप्रसिद्द लेणी. अप्रतिम अशी हो कोरीव लेणी आजही थोडी दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहेत. निसर्गामुळे झालेल्या नुकसानीपेक्षा मानवाने त्यांचे जास्त नुकसान केले आहे. काहीवेळ तिकडे थांबलो आणि मग पुढे निघालो. इतकी काही घाई नव्हती फ़क्त पूर्ण अंधार पडायच्या आधी गावात पोचणे गरजेचे होते नाहीतर लेट झाला की तिकडचे गाड़ीवाले अव्वाच्या-सव्वा भाड़े सांगतात कर्जतला जाण्यासाठी. ५ च्या सुमारास खाली पोचून लालमातीच्या रस्त्याला लागलो. तिकडून लालमातीचा चिखल तुडवत पुन्हा चाल गावापर्यंत. अखेर चाल संपवून गावात पोचलो. कपडे असे माखले आणि भिजले होते की त्या कपड्यात प्रवास करणे शक्य नव्हते. एके ठिकाणी पटकन ते बदलून घेतले आणि गरम-गरम चहा मारला. मस्तपैकी ताजे झालो आणि कर्जतकड़े निघालो. २ दिवसामधल्या भटकंतीने मन प्रसन्न झाले होते. ढाक-भैरीची थरारक गुहा आणि राजमाची दर्शन असा दुहेरी बेत मस्त जमला होता. त्याच मूड मध्ये आम्ही पुढच्या भटकंतीचे प्लानिंग करत घरी निघालो होतो...

Wednesday, 8 April 2009

भाग १ - ढाक-भैरी ते राजमाची ... !

२००५ च्या ऑगस्टमधला ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते. त्यात धो-धो पावसाळ्याचे दिवस आणि आम्ही निघालो होतो ढाक-भैरीला. अभिजित आणि आशिष ह्या आधी ढाक-भैरीला जाउन आले होते. गुढ असा ढाक-भैरी ... काय वर्णावे ... कुठल्याही कसलेल्या ट्रेकरला भूरळ पाडणारा असा हा ट्रेक. मुळात कठीण असलेला हा ट्रेक पावसाळ्यात अतिकठीण होऊन बसतो. ह्या ठिकाणी काही अपघात सुद्धा झाले आहेत त्यामुळे नवख्यांनी याठिकाणी अनुभवी मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये. आम्ही सकाळी-सकाळी पहिल्या कर्जत लोकलने कर्जतला पोचलो. नाश्ता आटोपला आणि तिकडून वदपला पोचलो. वदप गावामागूनच ढाक किल्ल्याकडे जायची वाट आहे. गावात पोचलो की खिंड दिसते. थोडसं उजव्या हाताला एक मस्त पिटूकला धबधबा आहे. खिंडीच्या दिशेने चालायला लागलो. पावसाळी वातावरण होते त्यामुळे मस्त वाटत होते. १५ मिं. मध्ये वर चढून खिंडित पोचलो. आता खरी चाल होती म्हणून थोड़ेफार पोटात ढकलले. मजल दरमजल करत तासाभरात वरच्या टप्याला पोचलो. वरच्या पठारावर पोचायच्या आधी एक झाडीची वाट लागते. पायाखाली लालमातीचा चिखल तुडवत ती वाट पार केली. ही वाट पूर्ण झाली की आपण वरच्या पठारावर येतो आणि समोर विस्तीर्ण पठार आणि त्यावर सगळीकडे शेतीच-शेती दिसते.









त्या शेता-शिवारांमधून आणि बांधांवरुन वाट काढत थोड्याच वेळात आम्ही गावात पोचलो आणि तिथून ढाक किल्ल्याकडे निघालो. वाटेवर सगळीकडे धुके होते. दूरचे काही दिसत नव्हते आणि मळलेली वाट नव्हती. त्यामुळे वाट अंदाजानेचं काढत होतो. आम्हाला ढाक किल्ल्यावर जायचे नव्हते तर त्याला वळसा मारून पुढे भैरीच्या गुहेकडे जायचे होते. उजवीकडे वर चढलो तर ढाक किल्ल्याच्या माथ्यावर जायला होते आणि डावीकडे खाली आपण रस्ता चुकतो. अखेर वाट आम्हाला समोरच्या दरीच्या टोकाला घेउन गेली गेली. समोरचे दृष्य फारच सुंदर होते. डोंगर उतारावर पसरलेल्या फुलांच्या चादरी आणि समोरच्या कडयावरुन कोसाळणारे धबधबे. ते दृष्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. पुढे स्पष्ट वाट नव्हती त्यामुळे जंगलामधून अंदाजानेच वाट काढत-काढत कळकराय सुळक्याच्या दिशेने आमची पावले पडत होती. काही वेळानी अखेर धुक्यामधून पुसटसा कळकराय सुळका दिसायला लागला. आता आमच्या पावलांची गती वाढली. काही वेळातच आम्ही मळलेल्या वाटेच्या चौरस्त्यावर येउन पोचलो. येथून समोरचा रस्ता कुंढेश्वरमार्गे राजमाचीला जातो. त्याच रस्त्याने आम्हाला पुढे जायचे होते. पण त्याआधी उजवीकडे खाली घळीमध्ये उतरून भैरीच्या गुहेकडे जायचे होते. चौरस्त्यावरुन डावीकडे वळल्यास भीमाशंकरला जाता येते. आम्ही आता उजवीकडे उतरून त्या छोट्याश्या घळीमध्ये उतरलो. उतार असलेली घळ संपत आली की ढाकच्या पश्चिम कड्याची भिषणता आणि दुर्गमता लक्ष्यात येते. समोरच्या दरीमध्ये धुके भरले होते त्यामुले खोलीचा अंदाज येत नव्हता. घळीमधून खाली उतरताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण घळ संपता-संपताच लगेच उजवीकडे सरकून खाली उतरावे लागते. तिकडे पायाखाली एक मोठा दगड आहे त्यावर पाय टाकुन उजवी कडे सरकावे लागते. पावसामुळे सगळीकडे निसरडे झाले होते त्यामुळे काळजीपूर्वक आम्ही चौघेजण तिकडे उतरलो. आता आम्ही ढाकच्या काळ्याकभिन्न कडयाखाली उभे होतो. मागच्या बाजूला थोड़ वरती कळकराय सुळका दिसत होता.











अंगावर येणारा विस्तीर्ण कडा आणि खालच्या दरीत पसरलेलं धूक असं मस्त वातावरण होतं. त्या कडयाखालून चालत-चालत आम्ही पुढे सरकू लागलो. कडयावरुन अंगावर पाणी ओघळत होते शिवाय पायाखालची वाट निसरडी होती. उजवीकडच्या कडयाचा आधार घेत-घेत, पायाखालच्या ओबड-धोबड दगडांकडे लक्ष्य देत पुढे सरकावे लागत होते. तरीसुद्धा मी आणि हर्षद मजेत गाणी म्हणत, पण लक्ष्य देत पुढे जात होतो. अभि आणि आशीष आम्हाला जरा गप्प बसा सांगत होते. अभि आणि आशीषला मी इतका गंभीर कधी पाहिलं नव्हत. पुढे जात असताना उजव्या बाजूला २-३ खोदलेल्या कपारी दिसतात. गुहा म्हणायला त्या तितक्या मोठ्या सुद्धा नाहीत पण आपले सामान ठेवून किंवा काही वेळ बसायला त्या नक्कीच उपयुक्त आहेत. त्यातल्या एकात आम्ही आमचे सामान ठेवले आणि त्यावर जॅकेट टाकुन झाकून ठेवले. आता खऱ्या चढाईसाठी आम्ही पुढे सरकलो. थोड़ पुढे गेलो की उजव्या बाजूच्या कडयामध्येच वर जाणाऱ्या कोरलेल्या पायऱ्या दिसतात. आशीष सर्वात पुढे सरकला. त्या मागे हर्षद. त्या नंतर अभि आणि सर्वात शेवटी मी. एका पायरीवर चढलो की त्यावरच्या पायर्‍या दृष्टीक्षेपात येतात. पायर्‍यांवर पाणी जमले होते त्यामुळे प्रत्येक पायरी वर आधी हात फिरवून मगच घट्ट पकड घ्यावी लागत होती. त्याशिवाय आधीपासून तिकडे काही किडूक-मिडूक प्राणी नाही ह्याची सुद्धा खातरजमा करावी लागत होती. कारण थोडसं दचकून सुद्धा तोल जाण्याची शक्यता असते. मी माझ्या उजव्या हातावर जास्त जोर न टाकता डाव्या बाजूवर जोर टाकून वर चढत होतो. तसा मी डावरा असल्याने मला फार त्रास पडत नव्हता. एक-एक करून त्या १०-१२ पायऱ्या चढून वर गेलो. पायऱ्या संपल्या की उजवीकडे एक मोठी स्टेप घ्यावी लागते. सर्वात वरच्या पायरीवर पाय घट्ट रोवून हाताने अगदी वरती पकड घ्यायची आणि स्वतःला वर खेचून घ्यायचे. दूसरा माणूस उभी रहायची जागा सुद्धा नसल्याने कोणी मदतीला किंवा आधाराला सुद्धा उभे राहणे कठिण होउन बसते. आशीष आणि हर्षद तिकडून पुढे सरकले तसे मी आणि अभि मागून पुढे सरकलो. आमच्या ग्रुप मधला आशिष हा निष्णात प्रस्तरारोहक (Rock Climber). स्वतःचे वजन सांभाळून अतिशय शिफातीने तो पुढे सरकत होता. आम्ही त्याच्या मागून पुढे सरकत होतो. पाउस मध्येच थोडा-थोडा पडत होता. दाट ढूक्यामुळे खाली दरीमधले काही दिसत नव्हते. आता डावीकडे तिरप्या रेषेत वर जाणारी दगडामधली खाच आहे. स्वतःचे वजन पूर्णपणे उजवीकडे ठेवून हळू-हळू वर सरकत आम्ही तो अंदाजे १५ फुटांचा टप्पा पार केला. ह्या ठिकाणी पकडायला कुठेही खाचा नाहीत. आपले हात दगडांवरुन सरकवत-सरकवत पुढे जात रहायचे. वर आलो की मात्र ६-७ जण नीट उभे राहतील इतकी मोकळी जागा आहे. एकडे येउन जरा दोन क्षण निवांत झालो कारण पुढचा टप्पा अजून बिकट होता. आता खाच तिरप्या रेषेत उजवीकडे सरकते. पायाखालची जागा मोजून वितभर आणि धरायला काही नाही अश्या दोलायमान स्थितिमध्ये स्वतःला सरकवत पुढे जायचे. आता स्वतःचे पूर्ण वजन डाव्या बाजूला. कुठेही बसायचे नाही कारण ते शक्यच नसते. ह्या ट्रेकला येणारे भिडू हे पक्के असावे लागतात नाहीतर अश्या मोक्याच्या ठिकाणी कोणी कच खाल्ली तर पुढे सगळेच अवघड होउन बसते. खालच्या खाचेच्या दुप्पट अंतर उजव्या बाजूला पार करून वर सरकून आता आम्ही पोचलो ते गुहेच्या पायथ्याशी. ह्या ठिकाणापासून अंदाजे १५ फुट सरळ वर चढून गेलो की लागते ढाक-भैरीची गुढरम्य गुहा. ह्या ठिकाणी चढायला न आहे शिडी.. न पायऱ्या.. वर चढण्यासाठी एक बदामाच्या झाडाचे खोड जाड दोरखंडाला बांधले आहे. अर्थात तो दोरखंड वरती मोठ्या दगडाला बांधला आहे. सरळ फुटणाऱ्या फांद्यांचा शिडीच्या पायर्‍यांसारखा वापर करून वर चढून जावे लागते. आता ही तर सर्कस होती कारण वरच्या फांद्या पकडून खालच्या एका फांदीवर एक पाय टाकल्या-टाकल्या माझ्या वजनामुळे झाड एका बाजूला स्विंग झाले.






----------------->>>


उजव्याबाजूला वर जाणारी वितभर रुंदीची वाट, दोरखंडाला बांधलेले बदामाच्या झाडाचे खोड आणि सर्वात वरती ढाक-भैरीची गुहा दिसते आहे.











पावसाने फांद्या निसरड्या झाल्या होत्या. एक-एक पाउल काळजीपूर्वक उचलत पुढची काही मिनिट्स अशी कसरत करत आम्ही एक-एक करून अखेर वर पोचलो. एकदम भन्नाट वाटत होते. आपला सह्याद्री जितका रांगडा तितकाच राकट. आपल्या साहसी वृत्तीला प्रेरणा देणारा. गेल्या तासाभरामधल्या ह्या अनुभुतीने मन प्रसन्न झाले होते. इतका वेळ हाताचे दुखणे सुद्धा मी विसरलो होतो. गुहेमध्ये भैरी म्हणजेच भैरवनाथाचे स्थान आहे. बाजुलाच २ पाण्याची टाकं आहेत. त्यातल्या पाण्यामध्ये देवाची भांडी आहेत. आपल्याला जेवण बनवायचे असल्यास ही भांडी घेता येतात पण वापरून झाली की ती स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यात ठेवावी लागतात. इतका वेळ दरीमध्ये पसरलेलं धुकं आता विरु लागलं. खालचे स्पष्ट दिसू लागले. आपण काय दिव्य करून वर आलो आहोत हे समजून आले होते. उतरून जाताना किती काळजी घ्यावी लागणार आहे ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आली होती. अभि आणि आशीषला बहुदा ती आधी पासूनच होती म्हणूनच ते मला आणि हर्षदला 'जरा सिरीअस व्हा' अस सांगत होते. आता आम्हाला उतरायला हवे होते कारण पुढे जाउन कुंढेश्वरमार्गे राजमाचीला पोचायचे होते. आता अभि पुढे सरकला. पुन्हा तीच कसरत; मात्र जास्त काळजी घेउन. स्वतःचा तोल सांभाळत हळू-हळू आम्ही खाली उतरायला लागलो. बदामाच्या झाडावरची सर्कस करून खाली आलो आणि वितभर खाचेवरुन खाली सरकू लागलो. समोर खोल दरी दिसत होती. उजवा हात दगडावर सरकवत-सरकवत आम्ही खाली सरकलो. मोकळ्या जागेमध्ये दम घेतला आणि पुन्हा खाली उतरलो. शेवटच्या पायऱ्या उतरताना फारसे प्रयास पडले नाहीत. पूर्ण खाली उतरून आलो तरी कड्याखालचा पॅच बाकी होताच. पण आधी सामानाकड़े गेलो आणि पेटपूजा आटोपली. दुपारचे २ वाजून गेले होते आणि अजून बरेच अंतर बाकी होतं. भराभर पुढे निघालो. कडयाखालचा उरलेला मार्ग संपवला आणि घळीमधून चढून वर आलो. आता लक्ष्य होते कुंढेश्वर..........




(शेवटची ३ छायाचित्रे आमच्या ट्रेकच्या वेळची नसून माझी मैत्रिण 'कस्तूरी शेवाळे' हिच्या संग्रहातील आहेत.)

क्रमशः ...