Showing posts with label सह्याद्री. Show all posts
Showing posts with label सह्याद्री. Show all posts

Monday, 1 November 2010

भटकंतीची १० वर्षे ...

बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे.' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.




सह्याद्रीत पहिले पाऊल टाकल्यापासून ते आजतागायत सह्याद्रीने माझ्यावर प्रेमाचा अक्षरशः: वर्षाव केलाय. त्याने कधी पावसाळी अनुभवांनी मला चिंब भिजवलंय, कधी गडावर कडाक्याच्या थंडीत गारठवलय तर कधी उन्हातान्हात रानोमाळ फिरवलंय. तुम्ही म्हणाल हे का प्रेम?. तर मी म्हणीन होय. त्याचे प्रेम असेच असते. आपली रांगडी परीक्षा बघत, आपली झोळी अनुभवांनी भरत आपल्यावर तो स्वतःच्या प्रेमाचा वर्षाव कधी करतो हे आपल्याला देखील समजत नाही. कळत तेंव्हा आपण एखाद्या सह्यशिखरावर कुठेतरी हरवून सभोवतालचा नजारा बघत असतो. मग तो नानाचा अंगठा असो नाहीतर नागफणी, कोकणकडा असो नाहीतर टकमक टोक. राजगडावरचा सूर्योदय असो नाहीतर मग सूर्यास्त. त्याच्या रांगड्या सौंदर्याचे वर्णन करताना शब्दच तोकडे पडू लागतात.


जसा पाउस तप्त जमिन थंड करू लागतो तसा सह्याद्रीसुद्धा आपला रौद्रप्रतापी चेहरा लपवित एक नवे रूप घेऊन आपल्या समोर येतो. ह्या हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीची मजा काही औरच. मग आपण सुद्धा मनमुराद भिजण्यासाठी नवे ट्रेक आखत त्याच्या भेटीला निघतो. पण माथ्यावर त्याला गाठायचे तर आधी परीक्षा ही द्यावीच लागते. मग तो एखादा भरून वाहणारा ओढा असो, दुथडी भरून वाहणारी नदी असो नाहीतर एखादी वर चढणारी पाण्याची वाट असो. त्याला भेटायचे म्हणजे ते पार करणे आलेच. आपली मजा बघत असतो तो पण त्यालाही मनातून आपण तिथवर पोचावे हे मनात असतेच. दोघांमधली ही ओढ अनिवार होते आणि मग आपली पावले वेगाने शिखराकडे पडू लागतात. माथा जसा जवळ येतो तसे आपण 'आता माथ्यावर पोचूनच टेकायचे रे' हे उगाच नाही म्हणत. पावसाळी वातावरणात राना-रानातून गार वारे साद घालत फिरत असतात आणि मनावर एक वेगळीच धुंदी निर्माण करितात. वर्षोनुवर्षे ऑफिसच्या वातानुकीत यंत्राचा वारा घेणाऱ्या लोकांनो, हे गार वारे अंगावर घेतले आहेत कधी? ते वातानुकीत यंत्र झक मारेल ह्यापुढे. खळखळत वाहणारे ओढ्याचे पाणी ओंजळीत भरून प्यायला आहात कधी? एकदा हे करून बघाच. आयुष्यभराची तहान भागेल तुमची.




पाउस जरा परतीच्या मार्गाला लागतो तसा एक सुखद गारवा सह्याद्रीमध्ये पसरू लागतो. आता आपण खास रग जिरवणारे आणि उंची गाठणारे प्रचंडगड, रतनगड, अलंग-मंडण-कुलंग असे ट्रेक प्लान करू लागतो. पाऊस थांबलेला असला तरी धुक्याचे खास खेळ आपल्यासाठी सुरू असतात. सूर्यदेवाने आपली द्वाही चहूकडे फिरवण्याआधी पहाटे पहाटे दऱ्याखोऱ्यात पसरलेले हे धुके खूपच आल्हाददायक असते. अश्या धुक्यातून ट्रेक करायला तर काय अजूनच मजा!!! हवे तेंव्हा निघावे, हवे तिथे विश्रांतीसाठी बसावे. तो असतोच कधी झाड बनून तर कधी दगड बनून आपल्याला टेकायला द्यायला. आपल्याला तहान लागली आहे हे कळते त्याला मग मध्येच एखादा ओहोळ देतो सोडून आपल्या वाटेवर. काळजी घ्यावी ती त्यानेच. गडावर चूल बनवून जेवण बनवावे तर हा.... वारा. मग कधी थोड्यावेळासाठी वाऱ्याचा वेग जरा कमी करेल आणि आपल्याला जेवण बनवू देईल. आपण निवांतपणे जेवून गप्पा मारत टेकलो की हा परत आपला वेगाने सुरू... गडावर रात्र जागवून निवांतपणा अनुभवावा. भले १० जण सोबत असतील पण प्रत्येकाने शांत राहून फक्त आकाश बघावे. सर्व काही नि:शब्द. आवाज यावा तो फक्त वाऱ्याचा आणि झाडांच्या सळसळीचा. अजून काय हवे!!!


नवा ऋतू आणि सह्याद्रीचे नवे रूप न दिसले तरच नवल. पुन्हा एकदा तो आपले रौद्र रूप धारण करू लागतो. पुन्हा एकदा आपली रांगडी परीक्षा पाहण्यासाठी डोंगर-कडे तप्त होऊ लागतात. आपण देखील मग काही जिद्दी ट्रेक प्लान करू लागतो. स्वतःच्या अगणित हातांनी तो आपली झोळी भरत असतो आणि आपण अधाशासारखे फक्त घेत असतो. मला नाही वाटत तो कधी थांबेल आपल्यावर प्रेम करणे.. आणि मलाही नाही वाटत की मी कधी थांबीन त्याच्याकडे जाणे. कुठलेही संकट पेलण्याची संपूर्ण ताकद, आवश्यक आत्मविश्वास मला दिलाय तो ह्या सह्यकड्यांनी. मला नाही वाटत हे कुठल्या पुस्तकी शिक्षणातून कधी मिळेल. स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला डोंगरातच मिळालेत. आज जगण्याचा अर्थ जो मला कळतोय तो ह्या सह्याद्रीने दाखवलाय मला.




आज फक्त १० वर्षे झालीत. अजून खूप हिंडायचे आहे. रानोमाळ भटकायचे आहे. गड-किल्ल्यावर अभिमानाने शिवरायांचे स्मरण करायचे आहे. इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. ह्या सर्वांनी मी पावन झालो हे नक्की. खूप अनुभव मिळालेत पण अजून खूप घ्यायचे आहेत.


हे सह्याद्री... मी येतोय लवकरच पुन्हा एकदा असेच काही नवे अनुभवायला..तुझ्या भेटीला आसुसलेला... डोंगर यात्री... डोंगर वेडा...


... पक्का भटक्या...

Sunday, 24 October 2010

पवनाकाठचा तिकोना ...

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल २५ भटक्यानी पवना धरणाच्या समोर असलेला तिकोनागड सर केला. तारीख २५ आणि भटके देखील २५. (नशीब या महिन्याची २५ तारीख यायच्या आधी मी कसाबसा हा पोस्ट करतोय.) जुलै महिन्यात केलेल्या विसापूर ट्रेकनंतर त्या ट्रेकमध्ये यायला न जमलेल्या आणि 'टांग दिलेल्या' अनेकांनी अजून एखादा ट्रेक व्हायला हवा असे म्हटल्यावर एक गूगल बझ सुरू झाला आणि सर्वांच्या तारखा जमवत अखेर २५ सप्टेंबर रोजी 'तिकोना' येथे जायचे ठरले. २४ तारखेपर्यंत हा आकडा २२ होता मात्र २५ तारखेला सकाळी तो एकदम २५ झाल्याचे लक्ष्यात आले. २२ वरून थेट २५...


२४ तारखेला संध्याकाळी भाग्यश्री ताईला जाऊन भेटलो. तिला इकडे येऊन अवघे ४ दिवस झाले होते. मी आणि शमी पहिल्यांदाच ताईला भेटत होतो. ट्रेकसाठी कायकाय खादाडी न्यायची ते ठरवत इतर बऱ्याच गप्पा झाल्या. इतक्यात महेंद्रदादाचा फोन आला. त्याच्याकडून 'गाडीत एक जागा आहे का रे?' अशी विचारणा झाली. मी नकार देऊन मोकळा झालो. त्यानंतर तास उलटून गेला तरी श्रीताई बरोबर गप्पा सुरूच होत्या. आता मला देवेंद्रचा फोन आला. त्याच्याकडून सुद्धा विचारणा 'गाडीत एक जागा आहे का रे?' मी नकार देत म्हटले,"मगाशीच महेंद्रदादाला सुद्धा एक नकार दिला आहे मी. तू आता अजून कोणाला सोबत आणू नकोस. गाडीत जागाच नाही तर बसवणार कुठे" ७ वाजून गेले तसा ताईकडून निघालो आणि थोडे खायचे सामान घेणार तेवढ्यात पुण्याहून अनिकेतचा फोन. 'खायचे काय करताय. मी सर्वांसाठी खायला चपात्या घेऊन येऊ का?' मी त्याला फक्त ३-४ जणांसाठी आणायचा सल्ला दिला. कारण प्रत्येक जण ट्रेकला थोडे अधिकच खायचे सामान आणतो आणि मग ते संपता संपत नाही. ८:३० च्या आसपास घरी पोचलो. काही वेळात अनुजा सुद्धा घरी येऊन पोचली. जेवलो आणि लवकर उठायचे म्हणून गुडूप झालो.


दुसऱ्या दिवशी पहाटे-पहाटे मी, शमी, अनुजा, अनघा आणि श्री ताई ठाण्याहून निघालो. आपला आनंद आणि त्याचे मित्र स्वल्पेश, अमोल, उदंड उत्साही सागर नेरकर, सचिन उथळे पाटील आणि त्याचा मित्र अक्षर देसाई, सौ. अवनी वैद्य असे काहीजण दुसरया गाडीतून निघाले. तिकडे महेंद्रदादा, उधाणलेला सुहास, देवेंद्र (च्यायला ह्याने दिलेला खो अजून पूर्ण करायचे मला), स्नेहल आणि चैतन्य असे बोरीवलीवरून निघाले होते. तीनही गाड्या सानपाड्याला सकाळी ७:३० च्या आसपास भेटल्या आणि तिकडे ज्योती भेटली. काल मला आलेले दोन्ही फोन हे ज्योती ह्या एकाच व्यक्तीसाठी होते मला तिकडे लक्ष्यात आले. मी दोघांना नाही म्हणून देखील तिचा ट्रेकला यायचा उत्साह बघता तिला देवेंद्र आणि दादा घेऊन आले होते पण ह्या बाबतीत मला काहीच माहिती आधी सांगितली गेली नाही. तिकडून मग पुढे जात पनवेलच्या आधी ओरिगामी एक्स्पर्ट भामूला उचलत आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो. पुण्याहून निघालेले श्री. अनिकेत, अभ्यासू सागर, मनमौजी योगेश, विकास आणि अभिजित असे ५ जण सुद्धा २ बाइक्स वर मार्गस्थ होत कामशेतच्या दिशेने निघाले होते. मला मात्र पुण्याहून फक्त ४ जण येणार अशी माहिती होती.


तासाभरात लोणावळ्याला पोचल्यावर आम्ही नाश्ता आटोपून घेतला. इकडे एक छोटीशी गडबड झाली ती म्हणजे टवेराच्या चालकाचे परवाना पत्र (सोप्या मराठीमध्ये लायसन्स.. :D) हवालदार मामाने काढून घेतले. कारण गाडीमध्ये एकूण ९ जण बसलेले होते. ते मिळवून पुन्हा मार्गस्थ व्हायला थोडा वेळ गेला. नाष्ट्यामागोमाग थोडा वेळ सुद्धा खात आम्ही अखेर कामशेतच्या दिशेने निघालो. ठरवलेल्या वेळेच्या किमान १ तास तरी आम्ही मागे होतो. अखेर १० नंतर सर्वच्या सर्व २५ जण कामशेत फाट्याला भेटलो. आता ३ चारचाकी आणि ३ दुचाकी असा लवाजमा तिकोना पेठ गावाच्या दिशेने निघाला. डाव्या बाजूला बेडसे गाव आणि मग पवना कॉलोनी पार करत धरणाच्या काठाला लागल्यावर समोरचे दृश्य पाहून गाडी न थांबवणे म्हणजे अरीसकपणाचा कळस झाला असता. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि तिकडे पुन्हा एकदा सर्वांची फोटोगिरी सुरू झाली. पवना धरणाच्या भिंतीमागून आता तुंग किल्ला डोकावू लागला होता आणि डावीकडे तिकोना आम्हाला खुणावू लागला होता.








आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. शेवटची धाव मारत तिकोना पेठच्या आधीचा खडा चढ पार करत आम्ही पायथ्याला पोचलो. गावातल्या देवळासमोर गाड्या टाकल्या आणि निघण्याआधी एक ओळखसत्र घेतले. मोठा ग्रुप असेल आणि बरेच लोक एकमेकांना ओळखत नसतील तर असे एक छोटेसे सत्र घेणे उत्तम. मी काही मोजक्या सूचना दिल्या.








त्याआधी अनिकेत आणि अवनीचे नेमके कुठ-कुठले सामान सोबत घ्यायचे ह्यावर १-२ मिनिटांचे छोटेसे चर्चासत्र सुद्धा पार पडले... :) मग आम्ही सर्व तो गडाकडे जाणारा लाल मातीचा रस्ता तुडवत निघालो. पाउस तर दूरच पण मळभ सुद्धा नव्हते. उनाचा त्रास होणार म्हणून सर्वांना जास्तीतजास्त पाणी सोबत ठेवायला सांगितले होतेच.




अर्ध्या तासात तो लाल मातीचा धीम्या चालीचा रस्ता संपला आणि आम्ही पहिल्या चढणीला लागलो. चढणीला लागलो तेंव्हा आनंद, त्याचे मित्र, अनघा, अनुजा आणि स्नेहल वगैरे भराभर पुढे जात होते पण श्री ताई, महेंद्रदादा, अनिकेत आणि मी सर्वात शेवटी होतो. कधीही कुठेही मी सर्वात शेवटीच असतो. माझ्याबरोबर ट्रेकला जर अभिजित असेल तरच मी शेवटी नसतो. चढायला सुरवात करताना बरोबर वरचे ढग पसार झाले आणि अगदी प्रखर उन्हात आम्ही वर सरकू लागलो. थोडे वर गेल्यावर मात्र महेंद्रदादाला त्रास व्हायला लागला. इतक्या वर्षांनी ट्रेक म्हणजे त्रास हा अपेक्षित होता पण आधीचे काही दिवस त्याची धावपळ बघता हे प्रकरण अजून कठीण जाणार असे वाटू लागले. आता शमिका, अनुजा आणि श्री ताई सुद्धा पुढे निघून गेल्या. काही मिनिटे आराम करून मी, दादा आणि अनिकेत पुन्हा चढायला लागलो. पण अजून थोडेच वर गेल्यावर दादाला अजून त्रास होऊ लागला. तिथून मग त्याने ट्रेक न करता पुन्हा खाली जायचा निर्णय घेतला. अर्थात त्याचा निर्णय योग्यच होता.


डोंगरात असताना 'मी हे करू शकतो, किंवा जरा स्वतःला खेचले तर होऊन जाईल' असे करण्यापेक्षा सारासार विचार करून निर्णय घ्यायचा असतो आणि तसा योग्य निर्णय त्याने घेतला. पण त्याला एकट्याला खाली जाऊ देणे मला शक्य नव्हते. तेंव्हा मी पुन्हा एकदा खाली उतरून त्याच्यासोबत देवळापर्यंत जायचे ठरवले. माझ्या सोबतीला देवेंद्र आला. मी माझी सॅक अनुजाकडे दिली आणि खालच्या वाटेला लागलो. जसजसे आम्ही खाली उतरत होतो तसे वरवर जाणारे बाकी सर्वजण आम्हाला स्पष्ट दिसत होते. बरोबर २ वाजता दादाला देवळापाशी सोडून मी आणि देवेंद्र पुन्हा एकदा ट्रेक रूटला लागलो. परत येताना आम्ही दादाच्या स्पीडने आलो होतो पण परत जाताना आम्ही आमचा स्पीड डबल केला. ४५ मिनिटात वर पोचायचे असे मी ठरवले होते. एव्हाना सर्वजण वर पोचले असणार ह्याची मला खात्री होती. एक शंका मात्र मनात होती आणि ती माझा न राहून जीव खात होती. ती म्हणजे गडाच्या शेवटच्या टोकाच्या पायऱ्या... पण सर्वांनी खास करून श्री ताईने विनादिक्कत त्या पार केल्या. नशीब पाउस नव्हता नाहीतर कसरतच झाली असती. शिवाय नेमक्या त्यावेळी मी तिकडे नव्हतो. पण आनंद, सुहास आणि अनुजा आहेत हे मला ठावूक होते










पायथ्यापासून वेगाने निघालेलो मी आणि देवेंद्र एकामागून एक टप्पे सर करत अवघ्या ३५ मिनीटामध्ये राम ध्यान मंदिर, मारुतीची मूर्ती आणि गडाचा खालचा दरवाजा पार करत पायऱ्यांना भिडलो. गडाचा दरवाजा शिवकालीन पद्धतीचा असून बुरुज पुढे देऊन मागे लपवलेला आहे. बुरुज साधारण २० मीटर उंचीचा तरी असावा. गडाची उजवी भिंत आणि बांधीव बुरुज ह्या मधून १०० एक खोदीव पायऱ्या आपल्याला गड माथ्यावर घेऊन जातात. पायऱ्यांच्या अर्ध्या वाटेवर उजव्या हाताला एक शुद्ध पाण्याचे टाके आहे. इथून वरच्या काही पायऱ्या थोड्या खराब झालेल्या आहेत. तेंव्हा जरा जपून. पायऱ्या संपल्या की डाव्या हाताला बुरुजावर जाता येते. दरवाज्याच्या बाजूला उजव्या हाताला पाण्याच्या २ टाक्या आहेत. ह्यातले पाणी अतिशय गार आणि शुद्ध असून पिण्यासाठी एकदम योग्य आहे. २००२ साली ह्या टाक्याचे पाणी वापरून शामिकाने अशी काही साबुदाणा खिचडी बनवली होती की ती चव अजून सुद्धा जिभेवर आहे. ते टाके बघताच त्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या.




५ एक मिनिटात पायऱ्या पार करून आम्ही दोघांनी सुद्धा गडाचा माथा गाठला. तो पर्यंत बहुदा बाकीच्या सर्वांचा गड बघून झाला होता. माथ्यावर जाऊन झेंडा लावणे, सभोवतालचा नजरा डोळ्यात साठवणे आणि तेथे फोटोगिरी करणे हे सर्व आटोपून सर्वजण खाली येऊन निवांत बसले होते. बहुदा आमची वाट बघत. आम्ही आलो की लगेच जेवण सुरू करायचे असा प्लान असणार नक्कीच. तेंव्हा गेल्यागेल्या आम्ही जेवून घेतले.






बाकी लोक वर येताना काय काय घडले हे सर्व वर गेल्यावर समजले. काल श्रीताईने ट्रेकवर पोस्ट टाकली आहेच. खादाडी तर जमके झाली. भाकर्‍या काय, अळूवड्या काय (बहुदा योगेशने आणलेल्या), भामूने आणलेली लसणाची चटणी (उरलेली चटणी तर शमी घरी घेऊन आली आणि दररोज खाताना 'जियो भामू' म्हणून बोलायची), शमिने घेतलेले मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, आणि श्रीताईने बनवलेले बेसनाचे लाडू (हे मी घरी घेऊन गेलो बरं का) अशी न संपणारी यादी होती. अर्धा तासभर खादाडी महोत्सव साजरा करत मग मी आणि देवेंद्र गड बघायला निघालो. आमच्यासोबत अनुजा, सपा आणि सागर पुन्हा भटकायला आले. एक गडफेरी पूर्ण केली. गडाच्या माथ्यावर शिवशंकराचे मंदिर असून मंदिराच्या खाली पाण्याचे कुंड आहे. २००२ साली मी इकडे आलो होतो तेंव्हा हे पाणी पिण्यायोग्य होते पण आता इकडे बरीच पडझड झाली आहे. मंदिरासमोरचा नंदी बराच झिजला असून एक नवीन छोटा नंदी पिंडी समोर बसवला आहे. आम्ही गड माथ्यावरून सभोवतालचा नजारा बघून तृप्त झालो. पश्चिमेला विस्तीर्ण पवना जलाशय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असणारा तुंग किल्ला एक आगळेच विलोभनीय दृश्य निर्माण करीत होता. हिरवीगार जमीन, निळेशार पाणी आणि पांढरेशुभ्र ढग यांनी एक सुंदर चित्र रेखाटले होते.




हल्लीच जाऊन आलेलो तो विसापूर उत्तरेकडून हाक मारत होता. विचारात होता बहुदा,'काय काही दिवसांपूर्वी इकडे होता विसरला नाही ना?' आणि बाजूचा लोहगड म्हणत होता,'काय राव इकडे कधी येताय? खूप दिस झालं की तुम्हाला भेटून' मनोमन लोहगडाला भेटायचे ठरवून पुन्हा एकदा खाली दरवाज्यापाशी आलो आणि निघायच्या तयारीला लागलो. ४ वाजून गेले होते. आम्ही आता भराभर परतीच्या मार्गाला लागलो. अर्धेजण भराभर उतरत वेगाने खाली निघून गेले मात्र मी-शमिका, अनुजा, सुहास, भामू, सागर असे काही जण निवांतपणे गप्पा-टप्पा करत, मध्येच थांबून खादाडी करत उतरत होतो. श्री ताई, अनिकेत-अवनी आणि बाकी लोक पायथ्याला पोचले तरी आम्ही अर्ध्या वाटेवर देखील उतरलो नव्हतो. मला चढताना काहीच फोटो घेता अले नव्हते तेंव्हा माझी क्लिका-क्लिकी सुरू होती.गड चढताना मारुतीच्या मूर्तीपाशी थांबून फक्त नमस्कार केला होता पण फोटो राहिला होता तो घेतला. खाली २००२ सालचा फोटो दिलाय जेंव्हा मी, शमी आणि अभिजित पहिल्यांदा तिकोनाला आलो होतो.






२००२ साली

आम्ही काहीजण निवांतपणे गप्पा-टप्पा करत, मध्येच थांबून खादाडी करत उतरत होतो. श्रीताई, अनिकेत-अवनी आणि बाकी लोक पायथ्याला पोचले तरी आम्ही अर्ध्या वाटेवर देखील उतरलो नव्हतो. मध्येच एका मोठ्या ढगाने आम्हाला सावलीत घेतले. छान गार वारा सुटला. आम्ही लगेच थांबून बसकण मारली. खाली दूरवर बाकी लोक मातीचा रस्ता तुडवत जाताना दिसत होते पण आम्ही आपले मस्तपैकी खादाडी करत होतो. तिथून चक्क २० एक मिनिटांनी निघालो. पायथ्याला पोचलो तेंव्हा ५ वाजून गेले होते. लाल मातीच्या वाटेवरून वळून पुन्हा एकदा तिकोनाकडे पाहिले. तो म्हणत होता,'सुखरूप जा पोरांनो. आठवणीने आलात बरं वाटले.' गड-किल्ले नेहमीच आपल्याशी बोलतात असे मला वाटत आले आहे. अर्थात त्यांची भाषा आपल्याला समजायला हवी.





देवळापाशी पोचून सर्वजण फोटोसाठी जमलो. एक ग्रुप फोटो घेतला आणि गाड्या काढल्या. बघतो तर काय 'योमू'ची दुचाकी ठुस्सस्सस्स.... चाकात एकदम कमी हवा. मग कसा बसा हळू-हळू तो पवना कॉलनीपर्यंत निघाला. कॉलनीमध्ये एक चहा घेऊ आणि सर्वजण आपापल्या घरी सुटू असे ठरले.





आजचा ट्रेक तिकोना असला तरी संपूर्ण वेळ पवना धरणाने वेढा घातलेला उत्तुंग तुंग आम्हाला खुणावत राहिला. परतीच्या वाटेवर मावळतीच्या सूर्याबरोबर देखील त्याचेच दर्शन झाले... मनात आल्याशिवाय राहिले नाही. मी मनात म्हणालो, 'काळजी करू नकोस. लवकरच येतोय मी तुझ्या भेटीला.'

.......... पक्का भटक्या...  


नोंद : सदर पोस्ट मधील बहुतांशी फोटो शमीने काढलेले आहेत. काही फोटो आनंद आणि श्रीताई कडून साभार...


Tuesday, 3 August 2010

नाणेघाट - नानाचा अंगठा ... !

सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्य स्थळांपैकी एक आहे कोकण आणि घाट यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट. आजपर्यंत अनेकदा जाऊन देखील इकडे जायची उर्मी कमी होत नाही. मात्र गेली २-३ वर्षे इकडे येणे न झाल्याने ह्यावर्षी मान्सून मधला पहिला ट्रेक ३ जुलै रोजी नाणेघाट हाच करायचा हे मी आधीच ठरवले होते. जोडीला ह्यावेळी शमिका सुद्धा होती. शिवाय अमृता, तिचा मित्र विकास आणि जाड्या हर्षद सुद्धा सोबतीला होते. ट्रेक झाल्यावर संध्याकाळी माळशेजघाटाच्या खाली असणाऱ्या  'दिघेफळ' या गावी जाऊन राहायचे असे ठरले होते. रविवारी तिकडच्या धबधब्यामध्ये मज्जा करायची होती. त्यासाठी अभी-मनाली, अमेय-शुभांगी आणि इतर काहीजण आम्हाला शनिवारी संध्याकाळी टोकावड्यात भेटणार होते.


गोरखगड आणि मच्छिंद्र सुळका ...


शनिवारी पहाटे-पहाटे माझ्या 'छोट्या भीम' (गल्लत करू नका... छोटा भीम हे आमच्या गाडीचे नाव आहे..) सोबत आम्ही ५ जण मुरबाडमार्गे नाणेघाटाच्या दिशेने निघालो. पहिला थांबा अर्थात मुरबाड मधले रामदेव हॉटेल होते. तिकडे भरगच्च नाश्ता झाला आणि आम्ही पुढे निघालो. सरळगाव वरून जरा पुढे जातो न जातो तोच उजव्या हाताला गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याने आम्हाला धुक्यातून बाहेर येऊन नमस्कार केला. आम्ही सुद्धा थांबून मग तो स्विकारला. समोर आता नाणेघाट दिसत होता. मध्येच धुक्यातून डोके वर काढत नानाचा अंगठा आपले उत्तुंग अस्तित्व दाखवून देत होता. आता जास्त क्षण आम्ही दूर राहणे शक्य नव्हते. फटाफट गाडी मारत पायथ्याला पोचलो आणि जिथे नाणेघाटचा रस्ता सुरु होतो तिकडून गाडी जरा आत टाकली. पार्किंगला एक मस्त जागा मिळाली. लगेच निघालो तिकडून. वर पहिले तर ढग दाटलेले होते. धुके पसरलेले होते पण पावसाचा मागमूस नव्हता. लालमातीच्या मळलेल्या वाटेने आता खरी चाल सुरु झाली होती. आजू बाजूला सर्वत्र सागाची झाडे होती. काही इतर झाडांवर ऑर्किड फुलले होते.

वाईल्ड ऑर्किड...


पहिला काही वेळ अगदीच रमत-गमत गेला. ओढ्याकाठाने गप्पा टाकत टाकत आणि फोटो काढत आम्ही पुढे जातच होतो. माहिती असलेली थोडीफार माहिती जाड्या बरोबर शेअर करत होतो.

अजूनही मला नाणेघाटला आलो की कधीतरी बैलांचे, लमाणांचे मैलभर लांब तांडे दिसतील असे वाटते. दूरदेशीच्या जहाजांमधून कोकणातील बंदरांवर उतरलेल्या विविध वस्तू वरघाटावर घेऊन जाणारे पुरातन काळातील व्यापारी तांडे. कसे असेल ते दृश्य??? किंवा मराठा फौज दौड मारत जुन्नर मारायला वरघाटी कूच करत आहे. फौजेच्या आघाडीला प्रतापराव, येसाजी कंक किंवा आपले थोरले राजे आहेत. हे दृश्य तर त्याहून भन्नाट... टाईम मशीन असे काही असते तर मी नक्कीच १७व्या शतकात गेलो असतो.
पण फार काळ इतिहासात गुंतून न जाता आम्ही २ वेळा ओहोळ पार करत आता पहिल्या टप्याच्या चढणीला लागलो. थोडेसेच पुढे जातो तोच उजव्या बाजूने खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज येऊ लागला. वाट सोडून मी लगेच पाय तिकडे वळवले. मगाशी पार केलेल्या ओढ्यांचाच हा वरचा भाग होता. पाउस काही पडत नव्हता मग ओढ्याच्या पाण्यानेच जरा फ्रेश झालो. इतक्यात पाण्यामध्ये एक सापाचे पिल्लू दिसले. आता हा कुठला साप आहे इतका काही माझा सापांवर बारीक अभ्यास नाही. पण बिन-विषारी होता हे मात्र नक्की. दर काहीवेळाने प्राणवायू घ्यायला तो फक्त आपले तोंड पाण्याबाहेर आणायचा. तेंव्हाच टिपलेला हा फोटो. अर्थात ह्या एका फोटोसाठी पठ्याने बराच वेळ घेतला माझा. त्याला टाटा करून आम्ही सर्व पुन्हा चढाला लागलो.


काय रे.. फोटो काढतो काय???


वाट अजूनही सरपटत चाललेल्या अजगरासारखी रुंद होती. हळू हळू वाट अरुंद होऊ लागली आणि अधिक चढणीला लागली. वाट चढणीला लागली तसे हृदयातील ठोके सुद्धा चढणीला लागले.. म्हणजे वाढायला लागले हो... ३० एक मिनिटात पहिल्या टप्याच्या शेवटाला पोहोचेपर्यंत आश्चर्यकारकरित्या शमिका सर्वात पुढे होती. तर मी शिरस्त्याप्रमाणे सर्वात मागे. अमृता आणि विकास मध्ये होते तर जाड्या फुसफुसत कसाबसा वर चढत होता. पाउस नाही, वारा नाही आणि त्यात ते चंदेरी मच्छर मध्येच येऊन त्रास  देत होते. कधी एकदा पहिला टप्पा पार करून वरच्या टापूवर पोचतोय असे वाटत होते. वरती मस्त वारा होता. धुक्याच्या जवळ अधिक गार देखील वाटत होते. तिकडे येऊन पोचतो न पोचतो तोच सर्व धुके गायब झाले आणि नाणेघाट - नानाचा अंगठा यांनी आम्हाला त्यांचे सर्वांग दर्शन घडवले.

नाणेघाट आणि नानाचा अंगठा ...


दुसऱ्या टप्याची चढण सुरु झाली तसा जाड्या अधिकच मागे पडू लागला. त्याला सोबत म्हणून मी जरा मागेच थांबलो होतो. शामिकाला मात्र ट्रेक करताना सारखे मध्ये-मध्ये थांबायला आवडत नाही. मग ती आपली पुढे जायची. तिच्या हि पुढे आता अमृता आणि विकास होते. ते सुद्धा इकडे बस, ते फोटो काढ असेच फुरसत मध्ये जात होते. जस-जसे वर जात होतो तसे धुके दाट होत गेले. आता आम्ही धुक्यात विलीन झालो होतो. इथून ज्या दगडी पारऱ्या सुरु होतात त्या आपल्याला वरपर्यंत घेऊन जातात. आज अजिबात पाउस नव्हता नाहीतर इथे पावसात पायऱ्या चढून जायला अफलातून धमाल येते. २००५ साली मी जेंव्हा नाणेघाट केला होता तेंव्हा अर्धा फुटभर पाणी वेड्यासारखे खाली धावत होते. आत्ता तिकडे धो-शो पाउस पडतोय ना... आत्ता खरेतर नाणेघाटला जायला अजून मज्जा येईल.


अस वाटतंय की हरवून जावे ...


कातळात खोदलेले पाण्याचे टाके ...


दुसऱ्या टप्यात बरोबर मध्ये पाण्याचे एक टाके खोदलेले आहे. किती प्राचीन असावे हे टाके? वरची गुहा जितकी जुनी तितकेच जुने असावे बहुदा.. मार्ग वापरणाऱ्या वाटसरूंना पाण्याची सोय म्हणून बांधले गेले असणार नक्की. अशीच अजून २-३ छोटी टाक उजव्या बाजूला कड्यात आहेत. चटकन लक्ष्यात येत नाहीत. टाक्यापासून निघालो कि अगदी काही वेळात आपण वरती पोचतो. आम्ही इकडे पोचलो तेंव्हा एक ग्रुप मागून येऊन इकडे पोचला. त्यातला एकजण मला विचारतो 'और कितना बाकी है.' त्या मुलाने हाफचड्डी घातलेली होती. त्याच्या बाजूचा तर अजून हाईट. त्याच्या पाठीवर तिरपी अडकवलेली सामानाने भरलेली चक्क लैपटॉप बैग होती. तिसऱ्याच्या हातात फुटबॉल होता. मला कळून चुकले कि कुठल्यातरी कंपनीमधली हौशी कलाकार मंडळी आहेत. त्याला बोललो,'अजून ४५ मिनिटे.' त्यांच्या चेहऱ्यावर 'गार' पडलेले भाव होते. एकजण 'Hmmm.. More 45 minits' असे बोलून खाली दगडावर बसला. त्यांना खरेतर थोडे प्रेमाचे डोंगरी नियम सांगावे असे मनात आले होते पण तितक्यात त्यांचा म्होरक्या मागून काठी टेकत आला आणि त्यांना 'चला..चला.. We are almost there. निकलते है' असे मराठी - इंग्रजी आणि हिंदी असे तिन्ही भाषां एकाच वाक्यात बोलला. त्याचे बोलणे ऐकून ते अजिबात हलले नाहीत. मी मात्र पुढे निघालो. अमृता, विकास आणि शमिका आधीच पुढे गेलेले होते. फक्त मी आणि हर्षद मागे राहिलो होतो. 

नाणेघाटाचा अतिप्राचीन व्यापारी मार्ग...


वळणा-वळणाच्या दगडी पायऱ्या चढत चढत अखेर आम्ही गुहेपाशी पोचलो. आता इथून वरच्या पठारावर जाणारा तो ऐतिहासिक मार्ग दिसू लागला होता. आता आम्ही थांबू शकणार नव्हतो. शिवाय गुहेमध्ये जेवणाऱ्या जत्रेचा एकाच गलका होता. तेंव्हा गुहा उतरताना बघू असे ठरले. खूप-खूप गच्च पाउस पडला कि ह्याठिकाणी इतके पाणी वाहते कि पायऱ्या सुद्धा दिसत नाहीत. गुहा धुक्याने भरून जाते आणि खालचा मार्ग तर स्वर्गतीत असतो. आज मात्र ती परिस्थिती नव्हती. थेट वर पोचलो. पाउस अजून हवा तितका झालेला नव्हता. धुके मात्र खूप होते. उजव्या हाताला जीवधन आणि खडापारशी त्यात लपून बसले होते. वर पोचल्यावर बाकीच्यांना डाव्या हाताचा दगडी रांजण दाखवला. जेंव्हा नाणेघाट हा व्यापारी मार्ग म्हणून अस्तित्वात होता तेंव्हा हा मार्ग वापरल्याचा कर ह्या रांजणात टाकावा लागायचा. ज्याची हुकुमत जीवधन किल्ल्यावर त्याची हुकुमत ह्या वाटेवर.


वरच्या पठारावरचे दृश्य .. डाव्याबाजूला तो दगडी रांजण दिसतोय ...

आधी मुघलांच्या ताब्यात असलेला हा मार्ग नंतर छत्रपती शिवरायांनी आपल्या ताब्यात आणला होता. कल्याण बंदरातून आणि उत्तर कोकणातून येणाऱ्या सर्व देशी -परदेशी मालावर मुघलांना मराठ्यांकडे कर भरावा लागायचा. शिवाय प्रत्येक खाजगी व्यापार करणाऱ्याला सुद्धा कर द्यावा लागायचा. एकदा का कर भरला की खालपासून वरपर्यंत संपूर्ण मार्गावर व्यापारी मालाला संरक्षण दिले जायचे. आता आम्ही रांजणासमोरच्या कातळात असलेल्या गणेशगुहेकडे पोचलो. दर्शन घेतले आणि तसेच डाव्याबाजूने नानाच्या अंगठ्याकडे निघालो. भुका लागल्या होत्या तेंव्हा आधी पोटोबा करावा असे मत पडले. पोटोबा म्हटल्यावर थोडीच कोणी विरोधात जाणार होते.नानाच्या अंगठ्याच्या दिशेने थोडे वर चढून जीवधनच्या दिशेच्या एका कड्यापाशी विसावलो. अमृताने आणलेली हल्दीराम भेळ, जाड्याने आणलेले फरसाण आणि असे काही-बाही सटर-फटर पदार्थ खाल्ले. पोट भरले नव्हते पण पर्याय नव्हता.

गुहेमधील गणेशमूर्ती ...



अमृता, विकास आणि हर्षद नानाचा अंगठ्याच्या टोकाला जाऊन आले. धुके इतके होते कि काहीच दिसणे शक्य नव्हते. मी आणि शमिका गणेशमूर्तीपाशी बसून होतो काहीवेळ. ३ वाजत आले होते. आता आम्हाला उतरणे भाग होते. शिवाय हर्षदचा चढतानाचा स्पीड बघता उतरायला अधिक वेळ लागणार हे साहजिक होते. अखेर तिकडून निघताना पुन्हा एकदा जीवधनच्या दिशेनं नजर टाकली. किमान एक झलक तरी दिसते का ते बघायला.. पण आज बहुदा तो काही दिसायचा नव्हताच.

नानाच्या अंगठ्यात असलेली नाणेघाटाची गुहा ...

तिघे आले तसे आम्ही खाली उतरून गुहेकडे पोचलो. ३ वाजून गेल्याने सर्व सामसूम झाले होते. होते-नव्हते तेवढे ग्रुप्स उतरून गेले होते. गावातली २ माणसे तेवढी बसली होती फक्त. आम्ही तिकडे काहीवेळ काढला. गुहेमधल्या भिंतीवरती उरलेल्या उरल्या-सुरल्या ब्राह्मी स्क्रिप्टचा फोटो घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र गुहेमधून बाहेरचे काढलेले Silhoutte फोटो मस्त आले.

धुक्यात ते ...


धुक्यात मी...

धुकेच-धुके सगळीकडे... पण पाउस गेला कुठे??? असे म्हणत ३:३० वाजता खाली उतरायला लागलो. अपेक्षेप्रमाणे पण वेळेत ६:३० वाजता आम्ही खाली पोचलो. 'छोटा भीम' सुखरूप होता. आमचीच वाट बघत होता. एक नजर पुन्हा नाणेघाट पाहून घेतला आणि 'टोकावडे'कडे निघालो. काही वेळात तिकडे अभी-मानली आणि इतर काहीजण येऊन पोचणार होते. मग आम्ही जाणार होतो 'दिघेफळ'ला. धमाल - मज्जा - मस्ती करायला..... त्याचे फोटो आणि त्यावर एक छोटीशी पोस्ट टाकतो नंतर...

Tuesday, 15 September 2009

भाग ३ - गोरखगड ... !


सुळक्याची चढण सुरू होताना पहिले ६-८ फुट 'फ्री क्लाइम्बिंग' करून चढावे लागते. त्या खालच्या छोट्याश्या प्रस्तरावर उभे राहिले तरी नेमके कसे चढायचे ते समजते. आमच्यामध्ये राजेश हा पक्का गिर्यारोहक. डोंगरामधला त्याचा अनुभवसुद्धा साधारण १५ वर्षे... तितकाच दांडगा. पहिला तोच वर चढून गेला. त्या मागोमाग सुमेधा आणि मग शेफाली. 'फ्री क्लाइम्बिंग' करताना एक गोष्ट नेहमी करावी ती म्हणजे चढणाऱ्याच्या मागे म्हणजेच खाली कोणीतरी आधार द्यायला उभे रहावे. न जाणो पटकन चढणाऱ्याला आधार द्यावा लागल तरं ??? तसेच वरच्या बाजूला सुद्धा कोणीतरी होल्ड्स कुठे आहेत ते सांगायला असले तर अजून उत्तम. २-४ फुटावरुन खाली सरकले तरी बऱ्याचदा पायाला दुखापत होण्याची शक्यता असते. न जाणो कालच्या त्या पोराच्या पायाला असेच काहीसे झाले असेल ???



शेवटी मी आणि अभि तो छोटासा पॅच मारुन वर गेलो आणि मग सुरू झाला प्रवास अंतिम टप्याकड़े. गोरखागडाच्या सुळक्याच्या ह्या पायऱ्या कश्या खोदल्या असतील कोण जाणे. लांबी-रुंदीला अगदीच लहान असणाऱ्या ह्या पायऱ्या एकदम उभ्या चढाच्या आहेत. पायऱ्या आधी डावीकडे सरकत वर चढत जातात आणि प्रत्येक पायरीवर हात धरायला पायरी मध्येच खोब ण्या केलेल्या आहेत. त्यात हात घालताना जरा बघून आणि जपून. एक-एक पायरी चढत आम्ही थोडं वर पोचलो. मग पायऱ्या उजवीकडे वळून पुन्हा डावीकडे वर सरकत जातात. ह्या डाव्या वळणावर जरा जास्त काळजी घ्यावी लागते. कारण ह्या ठिकाणी स्वतःचे वजन पूर्णपणे उजवीकडे ठेवून वर सरकावे लागते. एकदा का हा टप्पा पार झाला की मग पुन्हा आधीसारख्या खोबण्या असलेल्या पायऱ्या अगदी वरपर्यंत आहेत. माथ्यावर पोचायच्या आधी जरासा मातीचा घसरा आहे. पावसा ळ्या त गेलात तर हा घसरा गवताचा होउन जातो आणि मग उतरताना धमाल येते. सुळक्याच्या माथ्यावर एक शिवमंदिर आहे. त्या व्यतिरिक्त तशी फारशी सपाटी वरती नाही. मंदिराच्या मागच्याबाजूने चहुबाजूचे सुंदर दृश्य दिसते. गोरखगडाला लागुन असलेला शिंदोळ्याचा डोंगर आणि त्यामागे असलेला सिद्धगड़ दिसतो. तर उजव्या बाजूला दुरवर नाणेघाट आणि जीवधन किल्ला दिसतो. आकाश निरभ्र असेल तर त्या पुढे थोडं डाव्या बाजूला आजा पर्वत आणि हरीश्चंद्रगडाचा कोकणकडा सुद्धा दिसतो. बरोबर समोर किल्ले माहुली आपल्याला खुणावत असतो.



आम्ही वर पोचलो तेंव्हा ९ वाजत आले होते. काहीवेळ तिकडे घालवला आणि पुन्हा उतरु लागलो. उतरताना अधिक काळजी घेणे गरजेचे होते. पुन्हा त्या सर्व पायऱ्या आणि तो छोटासा टप्पा उतरून खाली आलो. पुन्हा गुहेकडे जायच्या आधी गडाच्या पलिकडच्या बाजूला चक्कर टाकली. तसे तिकडे फारसे काही नाही. नाही म्हणायला २ गुहा आहेत. त्या सुद्धा थोड्यावर कोरल्या आहेत. आतमध्ये डोकवायचे असेल तर १०-१५ फुट चढून जायला लागते. एकामध्ये आम्ही डोकावलो आणि पुन्हा गुहेकडे निघालो. परतीची तशी काही घाई नव्हती. दुपारी २ च्या आसपास खाली गावात पोहचायचे होते. आजचे जेवण कालच हमीदला सांगून आलो होतो. १२ च्या आसपास परतीच्या वाटेवर निघालो. पुन्हा एकदा ते दोन्ही रॉकपॅच आणि गडाचा दरवाजा उतरून खालच्या 'मेटे'पर्यंत उतरलो. तिकडे थोडावेळ टाइमपास केला आणि मग थेट गाव येईपर्यंत थांबलो नाही. मी आणि शेफाली गप्पा मारत मारत इतके हळू-हळू उतरत होतो की बाकी तिघांच्या बरेच मागे पडलो होतो. आम्ही खाली पोचलो तो पर्यंत अभि, राजेश आणि सुमेधा फुरसतमध्ये हमीदच्या घरी जाउन पडले होते. ३ च्या आसपास जेवण आटोपले अजून एका ट्रेकची सांगता करत बस पकडून मुरबाड गाठले आणि तिकडून कल्याण मार्गे ठाणे-मुंबई ...
.
.

Monday, 14 September 2009

भाग २ - गोरखगड ... !

शिवमंदिरापाशी थांबलो होतो तेंव्हा हेडटॉर्चच्या प्रकाशात खादू-पिदू झाले आणि आम्ही सगळे शेवटच्या टप्याच्या चढाईला लागलो. पुन्हा एकवार राजेश सर्वात पुढे आणि मी सर्वात मागे. निघताना शिवपिंडीला नमस्कार केला. मंदिराकडे तोंड करून उभे राहिलात की तुमच्या बरोबर उजव्या बाजूला थेट वरती गोरखगडाचे प्रवेशद्वार आहे. चालायला म्हणजे चढायला सुरुवात केली. १० पावले वर चढलो की लगेच दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या सुरू होतात. इकडे जरा काळजीपूर्वक कारण बऱ्याच पायऱ्या तूटलेल्या आहेत आणि अंधारात त्या काही नीट दिसत नाहीत. उजवे-डावे वळसे मारत पायऱ्यावरुन थोडं वर गेले की एका ठिकाणी जराशी सपाट जागा आहे. पौर्णिमा असेल तर ह्या ठिकाणाहून प्रवेशद्वाराचा छानसा फोटो घेता येतो. आज मात्र पंचमी होती त्यामुळे तसा फारसा चंद्रप्रकाश नव्हता. तिकडे १-२ मिं. थांबलो आणि पुढच्या चढाला लागलो.


आता पायऱ्या लांबीला चांगल्या भल्या मोठ्या आहेत पण रुंदीला तितक्या मोठ्या नाहीत. गोरखगडला पावसाळ्यात गेलात तर इकडे जरा जास्त सांभाळून. रुंदीला तितक्या मोठ्या नसणाऱ्या ह्या पायऱ्या खडया चढाच्या आहेत. ह्या ३० एक पायऱ्या चढून गेलो की लागतो गोरखगडाचा दरवाजा. इकडे पोचून आता जरा मागे वळून तर बघा... कळेल मी खडया चढाच्या पायऱ्या म्हणजे काय म्हणतोय ते. गडाचा दरवाजा उंचीला फारतर ४ फुट आणि रूंदीला ३ फुट. ८ एक फुट लांबीचा पथ्थर खोदून हा दरवाजा बनवला गेला आहे. दरवाजा पार करून दुसऱ्या बाजूला निघालो की आपण असतो गोरखगडाच्या आतमध्ये. आता पुढची संपूर्ण चढाई दगडी आहे. म्हणजे वरती गुहेकडे पोचेपर्यंत छोटे छोटे रॉकपॅच आहेत. मोठी सॅक पाठीवर असेल तर जरा सांभाळून कारण १-२ ठिकाणी ती अडकायचा संभव आहे. इकडे पोहचेपर्यंत आम्हाला काहीच त्रास झाला नव्हता. निवांतपणे रॉकपॅच पार करून आम्ही वर सरकलो. गोरखगडाचा सुळका एकदम जवळ येउन ठेपला होता आणि आम्हाला कधी एकदा वर पोचतोय ही उत्कंठा लागली होती. मधल्या टप्यामध्ये त्या बाकीच्या २ पोरांना घेउन उतरणारे गावातले लोक भेटले. त्यांच्याकडचे सगळे पाणी संपले होते. त्या पोराच्या पायाला कमीत कमी हालचाल व्हावी म्हणुन लाकडाची पट्टी उभी बांधून आणि खांद्याला आधार देत-देत उतरवत होते. त्यांना विचारला 'काही औषध वगैरे आहे का ? नसेल तर हवे का?' सगळ्याला उत्तर "नाही". पाणी तेवढे घेतले बास.




पहाटेचे ३ वाजत आले होते आणि आम्ही सर्वजण गडाच्या सुळक्यापाशी येउन पोचलो. उजव्या बाजूची पायवाट आपल्याला ८-१० पायऱ्या उतरवून गुहेकडे नेते. गुहेबाहेर पाण्याच्या टाक्या आहेत. पण त्यात पाणी कमी आणि कचरा जास्त भरलेला असतो. आम्ही गुहेत पोचलो तेंव्हा गडावर कोणीच नव्हते. गुहा प्रशस्त्र असून किमान ५० जण मावतील इतकी मोठी आहे. गुहेमध्ये डाव्या बाजूला 'नवनाथ पंथीय' देवांची स्थापना केलेली आहे तर उजव्या भागात आपल्याला रहता येते. तसा गुहेचा उजवाच भाग झोपण्यायोग्य आहे कारण जमीन ह्याच भागात तशी सपाट आहे. योग्य जागा शोधून आम्ही थोडावेळ पाठ टेकली. मी, राजेश आणि शेफाली गुहेमध्ये गप्पा टाकत बसलो तर अभि आणि सुमेधा गुहेबाहेर पायऱ्याच्या बाजूला एक मस्त मोठा सपाट प्रस्तर आहे त्यावर गप्पा टाकत बसले होते. रात्री गप्पा मारता-मारता मला झोप कधी लागली ते कळले पण नाही. पहाटे-पहाटे मला जग आली तेंव्हा अभि, शुमेधा आणि राजेश जागे होते. बहुदा ते झोपलेच नव्हते. शेफाली नुकतीच उठली होती. आम्ही सर्वांनी आवरून घेतले आणि गडफेरीला निघायची तयारी केली.




गुहेच्या बरोबर समोर आहे तो 'मछिंद्र सुळका'. त्यावर चढाई करायची म्हणजे प्रस्तरारोहण करावे लागते. अर्थात अर्ध्याअधिक मातीचा घसारा आहे हे खरे. तिकडे जायचा काही प्रश्नचं नव्हता.  गोरखगडाच्या सुळक्यावर चढाई करायला मात्र पायऱ्या खोदलेल्या आहेत. गुहेबाहेर पडलो की डाव्याबाजूला निघायचे. वाट थोडी निमूळती आहे. मध्ये-मध्ये पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. पुढे मात्र सपाट पायवाट आहे. पायवाट जिकडे डावीकडे वळू लागते तिकडे उजव्या हाताला एक प्रस्तर आहे. त्याच्या बरोबर समोरुन आणि पायवाटेच्या डाव्याबाजूने सुळक्यावर जायचा मार्ग आहे.
.
.
.
क्रमश: .....

Saturday, 12 September 2009

भाग १ - गोरखगड ... !

'गोरखगड ... गोरक्षगड' ... 'नाइट ट्रेक' म्हणजेच रात्री चढून जाण्यासाठी हा मस्त किल्ला आहे. अगदी पौर्णिमा असलीच पाहिजे असे काही नाही पण असली तर अजुनच मज्जा. मी गोरखगडला दोनदा जाउन आलो आहे. एकदा २००५ साली तर त्या नंतर २००८ साली भर पावसात. दोन्ही वेळेला भिडू वेगवेगळे. २००५ साली रंगपंचमीच्या दिवशी आलेला शनिवार पकडून मी, सुमेधा, अभिजित, मनाली आणि राजेश असे पाचजण गोरखगड येथे गेलो होतो. तर दुसऱ्या वेळेला ऑगस्ट महिन्यात भर पावसात ऐश्वर्या, हर्षद, सचिन, अनुजा, अभि, आदित्य असे काहीजण गेलो होतो. मार्च महिन्यात जेथे सह्याद्रीचा रांगडेपणा जाणवतो, पावसाळ्यात तेथेच अप्रतिम सौंदर्य विखुरलेले असते. गोरखगड तरी त्याला अपवाद कसा असेल.



मुंबई-ठाण्याहून निघाल्यावर कल्याणमार्गे मुरबाडला पोचले की S.T. स्टैंडच्या पुढच्या हाताला लगेचच उजवी मारली की आपण सिद्धगड़ - गोरखगडच्या रस्त्याला लागतो. आमचे लक्ष्य 'गोरखगड' असल्याने आम्ही मुरबाडवरुन बस पकडून थेट गोरखगडच्या पायथ्याला म्हणजेच 'देहरी' गावात उतरलो. गावात उतरलो की रस्त्याच्या डाव्या हाताला लगेचच 'हमीद पटेल'चे घर आहे. गावात पोचायला उशीर झाला तर इकडे रहायची सोय होऊ शकते. जेवण तर इकडे अप्रतिम मिळते. गोरखगड वर चढाई करायच्या आधी आम्ही इकडे जरावेळ निवांतपणे जेवण केले आणि गप्पा मारत बसलो. गडावरील गुहेमध्ये पोचायला तास पुरतात त्यामुळे रात्री ११ नंतर चढाई सुरू करायची असे सर्वानूमते ठरले. आम्ही बसलेलो असताना बाजूला बसलेला एक मुलगा अचानक मध्येच येउन आम्हाला बोलला,"मला जरा तुमची मदत हवी आहे". पूर्ण माहिती काढल्यावर कळले की सकाळी - जण वर चढून गेले होते त्यातल्या एकाला पायाला लागल्यामुळे उतरता येत नव्हते. त्यातले जण खाली गावात मदत घेण्यासाठी संध्याकाळच्या आत उतरले आणि गावातली लोक घेउन बाकीच्या मुलांना खाली घेउन यायला पुन्हा वरती गेले होते. का कोण जाणे पण त्यातला एकजण खालीच थांबला होता. तोच हा मुलगा.



आम्ही त्याला म्हटले, 'तू झोप आता आरामात. गावातली लोक गेली आहेत ना. आणतील त्याला बरोबर.' आम्ही बरोबर ११:३०ला निघालो. गडाच्या पायथ्याकडे जाण्यासाठी डांबरी रस्त्यावरुन पुन्हा थोडं मागच्या बाजूला चालू लागायचे. लगेचच म्हणजे अवघ्या ५० मीटर मध्ये डाव्या हाताला एक देउळ दिसू लागते. ह्या देवळामागुनच गडाकडे जाण्याचा रस्ता आहे. देवळामागून पायवाट हळू-हळू वर चढायला लागते. दिसायला अनेक असल्या तरी वर जाणारी वाट एकच आहे. त्यामुळे निश्चिंत होउन चढाई करावी. 'ही' वाट घेऊ की 'ती' ... असा प्रश्न पडायची गरज अजून तरी नाही. आमच्यात राजेश आधी येथे येउन गेला होता त्यामुळे तो सर्वात पुढे होता. मध्ये सुमेधा, अभिजित आणि शेफाली तर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सर्वात मागे मी. पायवाट आता डाव्या बाजूला सरकत वर चढत होती तर उजव्या बाजूला उतार जाणवतं होता. २० मिं. मध्ये चढ संपला आणि सपाटी लागली. रात्रीच्या १२ वाजता मस्तपैकी गप्पा मारत त्या सपाटीवरुन आम्ही गडाकडे निघालो होतो.



सपाटी संपली तसा गोरखगड आमच्या डाव्या हाताला होता तर उजव्या बाजुला दुरवर अंधारात सिद्धागडाची छाया दिसत होती आणि आमच्या बरोबर समोर होता 'शिंदोळ्याचा डोंगर'. इकडे बरेच नवखे वाट चुकतात कारण ह्याठिकाणी वाट उजवीकड़े उतरून पुढे जाते आहे असे वाटते पण खरेतर वाट पटकन डावीकडे वळून गोरखगडाच्या मूळ डोंगराच्या आणि ज्या सपाटीवर आपण असतो त्या पाहिल्या टेकडीच्या मधल्या खळग्यात उतरते आणि लगेच वर चढून गोरखगडाच्या मुळ डोंगरावर चढायला लागते. अभ्याने इकडे सुद्धा सिक्स़र मारायचा चान्स सोडला नाही. बोलता-बोलता तो मागे वळणार तितक्यात पाय घसरून पडला. तिकडे पाच मीं. टाइमपास केला आणि आम्ही खऱ्या चढणीला लागलो. साधारण अर्ध्या तासाची खडी चढण पार करून आपण एका झाडापाशी पोचतो. इकडे जरा दम घेतला. आता पुढे पुन्हा सपाटी आहे. पायवाट आता उलट्या 'C' आकारात वळत गोरखगडाच्या मागच्या बाजूला जाते. आता आपण गोरखगड आणि शिंदोळ्याचा डोंगर यांच्या बरोबर मध्ये उभे असतो. इकडे एक पडके शिवमंदिर आहे. आसपास बांधकामाचे विखुरलेले अवशेष आहेत. बहुदा इकडे आधी गडाची चौकी म्हणजेच 'मेट' असावी. मंदिरापाशी पोचलो तेंव्हा साधारण वाजत आले होते. वेळेची काही घाई नव्हती त्यामुळे आम्ही सर्वच आरामात चढत होतो. ह्याठिकाणाहून सुरू होते गडावरची तिसरी आणि शेवटच्या टप्यामधली चढाई...
.
.
.
क्रमश: .....