Thursday 4 February 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - 'कविता'च्या मनातून ... !

मला लहानपणापासून डोंगरांची नितांत आवड. त्यांच्याकडे जायची सुप्त इच्छा सतत मनात येत असे. डोंगरात जावे आणि निसर्ग भर-भरून पहावा असे सारखे वाटायचे. त्यामुळे ट्रेकला जाण्याची इच्छा निर्माण झाली. टेंटमध्ये रहायचे, ब्लैंकेट घेउन झोपायचे आणि आकाशात बघत तारे मोजायचे... काय मस्त ना... आयुष्यातले सर्वात सुखद क्षण हे.. नाही का ... !!! अशी संधी मला मिळाली ती 2000 साली. एक असा अनुभव जो मला देऊन गेला आयुष्यभरासाठी थरारक अनुभव, कधी न विसरता येतील अश्या आठवणी आणि मित्र-मैत्रिणीं. माझा भाऊ हिमांशुने मला या ट्रेकबद्दल जेंव्हा सांगितले तेंव्हा मी लगेच तयार झाले. नुकतीच कोंलेजमध्ये गेलेली मी हा नवा अनुभव घ्यायला उत्सुक होते. ट्रेकला जाण्याआधी मात्र एक महत्वाचे काम बाकी होते ते म्हणजे आई-बाबांची परवानगी. नशिबाने हिमांशू सोबत असल्याने फारसे अड़थळे न येता ते पार पडले. कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़ अश्या ५ दिवसांच्या ट्रेकमध्ये मी अनेक अविस्मर्णीय अनुभव घेतले. डोंगरात कसे राहावे, चुल कशी पेटवावी आणि त्यावर जेवण कसे बनवावे, पार्ले-जी पाण्याबरोबर कसे खावे (विचित्र वाटतय?? खाऊन बघा एकदम सही लागते..!!)

जस-जसा ट्रेकचा दिवस जवळ येत होता तशी-तशी माझी उत्सुकता वाढत जात होती. आदल्या रात्री तर मी झोपलीच नाही. क्षणा-क्षणाला मिळणाऱ्या आईच्या सूचनांचे पालन करत सामान भरले. ट्रेकच्या दिवशी दुपारी सर्वजण सी.एस.टी.ला जमले. माझी नजर  सर्वांकडे फिरत होती. वयाने ३-४ वर्षे मोठे असणाऱ्या ह्या ग्रुपमध्ये आपण फिट बसू का? असा प्रश्न मानत यायला लागला होता. सर्वांशी ओळख करून घेतली. आम्ही एकुण १८ ट्रेकर्स. राहुल, शेफाली, सत्यजित, हिमांशु, अभिजित, मनाली, रोहन, दीप्ती बावा, सुमेधा, आशिष पालांडे, कवीश, प्रवीण, सुरेश नागवेकर, प्रशांत आचरेकर, अभिषेक डोळस, संतोष मोरया, विवेक आणि मी कविता. शिवाय काका, राजेश आणि विली होतेच.कल्याण येईपर्यंत आम्हा सर्वांची ओळख झालेली होती. इकडून पुढे मात्र आम्हाला दुसरी गाडी पकडून इगतपुरीला जायचे होते. जेंट्स डब्यात इतके गर्दी होती की मुलींनी सर्व सामान घेउन लेडिज डब्यात जावे असा सल्ला मिळाला. "काय...५ मुली आणि २० ब्यागा.. काय वेडे झाले की काय हे.. म्हणजे आम्ही हे सामान चढवायच आणि इगतपुरीला उतरवायचे सुद्धा???" हिच माझी पहिली प्रतिक्रया होती. अखेर त्या सर्व सॅक्स घेउन आम्ही लेडिज डब्यात चढलो. आमच्या ५ जणींकडे इतके सामान बघून इतर बायका डोळे विस्फारून बघत होत्या. कुठे वरती, कुठे सीट खालती अश्या सर्व सॅक्स बसवल्या. चांगली ४५ मिं. ही कवायत सुरू होती. आधी त्रास वाटणारा हां प्रकार नंतर मात्र एक टीम एक्टीव्हिती झाला होता. निवांत बसतो न बसतो तसे समोरची एक बाई बोलली,"पोरींनो, इतके सामान घेउन इगतपुरीला उतरायचे कश्या तुम्ही. गाडी २ मिं. थांबेल फ़क्त तिकड़." खरच आम्हाला हच प्रश्न पडला होता. मग आम्ही ५ जणी मिळून ठरवू लागलो की हा टास्क कंप्लीट कसा करायचा आहे. प्लानिंगचा पहिला धडा हा असा मिळाला. शेवटी असे ठरले की २ आणि ३ चे दोन ग्रुप करून, वेगवेगळ्या २ दरवाज्यामधून सामान बाहेर काढायचे. ट्रेन इगतपुरीला नेमकी कधी पोचणार ते माहिती करून घेतली आणि मग आम्ही सर्वचजणी ज़रा निवांत झालो. बसायला तशी जागा नव्हती पण "बाय.. सरख की बासुदे पोरीना थोडावेळ, दमल्या असतील" असे म्हणुन आजुबाजुच्या बायकांनी सरकून बसायला जागा दिली. गप्पा मारत २ तास गेले. पुन्हा ती बाई बोलली,"बाय सामान काढाय घ्या. स्टेशन येइल आता." मग पुन्हा एकदा कवायत सुरू झाली. सर्व जणींनी 'जमेल ना तूला' म्हणुन विचारायचे आणि 'न जमायला काय झाले तू काळजी नको करू' असे म्हणून म्हणून सर्व सामान दाराजवळ आणून ठेवले. अखेर ती २ मिनिटे आली. आम्ही त्या सर्व २० बाग्स बाहेर काढल्याच पण आतमध्ये जाउन पुन्हा एकदा काही राहिले नाही ना याची खात्री सुद्धा केली. सर्जन इगतपुरी बसस्टैंडकडे चालू लागलो. आज रात्र तिकडेच काढायची आहे असे मला कळले. बसस्टैंडवर रहायचे??? तिकडे पोचल्यावर काही मिनिटात हिमांशू आणि राजेशने सर्व सामान उचाकले आणि ग्रुप्स पाडून त्या-त्या ग्रुपच्या हवाली केले. सर्व आटपून झाल्यावर आम्ही जरा पडलो तर कोणाला तरी बाकडाखाली उंदीर दिसला. नशीब तो लगेच गायब झाला. सकाळ झाली तसे आम्ही निघालो. काकाने राहुलला माझ्या बैगमध्ये अजून सामान भरायला सांगितले कारण माझी बैग खुपच लहान आणि हलकी होती. मला धक्काच बसला. पण मी ती बैग घेतली.

कळसुबाईला पोचलो तेंव्हा तिकडे सुंदर दृश्य पसरले होते. ढगांची सावली डोंगरावर पडल्याने मनोहारी चित्र निर्माण झाले होते. आम्ही पुढे जाउन एका मंदिरात थांबलो. चुल कशी बनवतात, कशी पेटवतात हे बघण्याचा हा माझा अगदी पहिलाच अनुभव होता. नाश्ता केला आणि पुढे निघालो. चालायला सुरवात केल्यावर मला बैगचे वजन चांगलेच जाणवू लागले होते. पण नंतर नंतर एकत्र चालता-चालता बोलता-बोलता सवय होऊ लागली. मध्ये एके ठिकाणी मात्र मी पाय घसरून अशी पडले की काय विचारू नका... त्या उभ्या चढाची भीती मनात बसली एकदम. पण अभिजितने माझा हात पकड़त मला 'काही होत नाही. पुढे चल' असे म्हणून सोबत नेले. काका माझ्या मागेच होता. तो सुद्धा मला शांत रहा. घाबरू नकोस असेच सांगत होता. अभिजित त्या वेळेला इतका बारीक होता की एक क्षण तो मला खेचायच्या ऐवजी मीच त्याला खाली खेचेन की काय असे मला वाटले होते. काकाने मग तिथल्या तिथे डोंगरात चढताना आणि उतरताना वजन कसे सांभाळावे ह्याचे एक छोटेसे प्रत्याक्षिकाच दाखवले. मला घेउन तो चक्क धावत खाली उतरु लागला आणि एके ठिकाणी त्याने थांबायचे कसे हे सुद्धा दाखवले. माझी भीती आता नाहीशी झाली होती. अखेर खुप वेळाने आम्ही वरती पोचलो. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरुन दिसणारे ते दृश्य अप्रतिम होते. नजर हटत नव्हती माझी एका क्षणासाठी. तिकडे आम्ही दुपारचे जेवण घेतले आणि मग कुंकवाच्या करंडयाकडे निघालो. डोंगर चढण्यापेक्षा उतरणे सोपे असेल हा समज सुद्धा इकडे दूर झाला. इतक्या वेळा मी पडले की “The whole group came down climbing and Kavita came tumbling after” असे काहीसे मनात आले होते. आम्ही इतरांच्या बरेच मागे पडलो होतो. मी. शेफाली, हिमांशू आणि हर्षद. सोबत काका होता. पण जरासे पुढे असणारे हिमांशू आणि हर्षद रस्ता चुकल्याने काकाच्या नावाने बोंबा मारत होते. अखेर काकाने त्यांना आवाजावरुन शोधले. अखेर त्या ट्रकपाशी जाउन पोचलो. एका दिवसात किती विचित्र घटना घडू शकतात? त्या ट्रकमध्ये आम्ही इकडून तिकडे घरंगळत होतो. एकमेकांच्या अंगावर पडत “एस्सेलवर्ल्डमे रहूंगा मै.. घर नाही जाऊंगा मै.." असे ओरडत होतो. 'ओ भाऊ, जरा हळू चालवा. माझे लग्न नाही झाला आहे अजून." ह्या प्रशांतच्या वाक्यावर आम्ही सर्व फुटलो. शेंडीला पोचलो आणि जेवल्यानंतर गुडुप झालो. रात्रभर कंबर-पाठ दुखत होतीच. दुसऱ्या दिवशी सकाळी नुडल्स बनवण्याचा प्लान फासला आणि आम्ही चहा-बिस्किट्स खाऊन तसेच पुढे निघालो.

भंडारदरा धरण पार करत रतनवाडीला पोचलो आणि उशीर झाल्याने काकाने रतनगड़ला जाणे रद्द केले. आता आम्ही थेट कात्राबईच्या खिंडीकडे निघालो. आणि तिथे पोहचेपर्यंत देखील उशीर झाल्याने आम्ही जंगलात राहायचा निर्णय घेतला. सही ना...!!! अंधार पड़ता पड़ता चुल आणि कैंप फायर पेटवल्या आणि गप्पा मारत बसलो. तिकडे जेवणाची तयारी सुरू होती. सर्वजण बोलत होते पण मी मात्र गप्प होते. अचानक माझे लक्ष्य वरती आकाशाकडे गेले. संपूर्ण आकाशात अनेक तारे लुकलुकत होते. जणू काही एकमेकांशी बोलत होते ते. तो एक क्षण मला सर्वांसोबत जोडून गेला. मग मी सुद्धा बोलायला लागले सर्वांबरोबर. नंतर तर सर्वांच्या मधोमध असुनही माझे लक्ष्य आकाशाकडेच होते. लहानपणापासून जी गोष्ट कराविशी वाटत होती ते आज मला करायला मिळत होते. झोप कधी लागले ते सुद्धा कळले नाही. नंतर मात्र अंगात अशी थंडी भरली की मला बोलवेना. अखेर काकाने मला ईलेक्त्राल दिल्याने अंगातली थंडी गेली.


पुढच्या दिवशी आम्ही जंगलातून पाचनाई मार्गे हरिश्चंद्रगड़ला पोचणार होतो. जंगलात सर्वत्र विविध प्रकारची झाडे दिसत होती. हा अनुभव सुद्धा मला नविनच होता. आम्ही दुपारपर्यंत मंगळगंगेच्या काठाला पोचलो. ३ दिवसांनी मनसोक्तपणे पाण्यात दूंबायला मिळत होते. दुपारनंतर खुप चाल मारत अखेर पाचनाईला पोचलो. इतका उशीर झाला होता की आज आपण इतकेच राहू, सकाळी गडावर जाऊ असे वाटले होते. पण नाही... काकाने रात्रीच गड़ चढण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही सर्व इतक्या दमले होतो की रडू कोसळणे बाकी होते. पण मग एक प्लान ठरला. संतोषने त्या चढ़ाईमध्ये माझी खुप मदत केली. मी इतकी दमले होते की बाकीचे सर्व कोण..कुठे..कसे आहेत ह्याची मला शुद्ध नव्हती. केव्हमध्ये जाउन मी झोपून गेले. अभि आणि शेफालीने मला पार्ले-जी खायला दिले पण २ बिस्किटे खाऊन मी पुडा हातात घेउन झोपी गेले. सकाळी उठले तेंव्हा हात-पाय आहेत का ह्याची सुद्धा शुद्ध नव्हती. पण काकाने बनवलेल्या पोह्याची चव अजून सुद्धा तोंडावर आहे. आम्ही मग गड़ बघायला निघालो. कोकणकडा बघून तर मला उंचीची भीती वाटुन राहिली. मी आणि कडयाच्या इतकी जवळ... परत आलो तर काकाचा मुड बिघडलेला.. कोणीतरी पोहे टाकले म्हणून मग त्याने सर्वांना शिक्षा म्हणून आमचा १ दिवसाचा स्टे वाढवला आणि आम्हाला संपूर्ण गुहा साफ़ करायला लावली. आधी शिक्षा वाटणारे हे काम नंतर मात्र प्रमाणीकपणे आपले वाटू लागले. आपला इतिहासिक ठेवा आपण जपायचा नाही तर कोणी? का लोक येथे येउन कचरा करतात? भिंतीवर नावे लिहितात? अश्या लोकांचा मला खुप राग आहे. जेवणासाठी बनवलेली दालढोकळी कवीश सोडून कोणीच फारशी खाल्ली नाही. मी त्याला दालढोकळी देऊन त्याच्याकडून गुलाबजाम घेतले. भारीच झाला हा सौदा...!!! ह्या ट्रेकमध्ये अजून एक गोष्ट जी मी शिकले ती म्हणजे ताटात असलेले काहीही न टाकता सर्व खाणे. मग ते लसुण असो नाहीतर लोणचे. २६ ऑक्टोबर ट्रेकचा शेवटचा दिवस होता. आज होता प्रशांतचा वाढदिवस. तेंव्हा सर्वांनी त्याला गुलाबजाम भरवले. जरा जास्तच.!!! अखेर आम्ही परतीच्या वाटचालीला लागलो. खाली खिरेश्वरला एका झाडाखाली प्रत्येकाकडे चूरमुरे, चोकलेट्स, पार्ले-जी, पेपरमिंट, व्हेफर्स..जे काही होते ते मिक्स करून स्नाक्स बनवले. एका अविस्मरनीय ट्रेकची सांगता होती. आज सुद्धा जेंव्हा-जेंव्हा आम्ही सर्व भेटतो, तेंव्हा-तेंव्हा त्या सर्व आठवणी जागवतो आणि खुप-खुप हसतो...
.
.

Monday 1 February 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - अभिजितच्या मनातून ... !

बरेच महीने झाले 'कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़' या भ्रमंतीवर लिखाण करायचे होते. गेल्या महिन्यात लिखाण पूर्ण केल्यावर आख्या ट्रेक ग्रुपमधून मला प्रतिक्रया आल्या. अभिजितने तर छोटेसे लिखाणच करून त्याच्या मनातल्या आठवणी माझ्यासमोर मांडल्या. त्याचे विचार येथेच ब्लॉगवर पोस्ट करावे असे वाटले म्हणून हां पोस्ट...

"18 यात्री... काही अनुभवी तर काही अगदीच नवखे. मी का गेलो? खरच माहीत नाही. पण ट्रेक संपताना मात्र उत्तर सापडले. कल्याण ते इगतपुरीसाठी ट्रेनमधील तोबा गर्दी. त्यात काकाची बोंबाबोंब. धावपळ आणि धमाल. रोहन, सी.एस.टी.ते इगतपुरी प्रवास डोक्यातून डीलिट झालाय. आठवतच नाही.

राजेश माझ्याच ग्रूप मधे होता आणि तिसरा भिडू, दीप्ती बावा... बाबा.......!


रात्रीचे ते धान्य वाटप तर भयानक. हिमांशू किराणा स्टोर कीपर. वाटणारा राहुल आणि गल्ल्यावर शेफाली. सत्या सूपरवाइज़र. हा हा... झोपेत काय दिले आणि कशात भरले, कोणाचा कोणाला पत्ता नव्हता. नशीब मास्टर लिस्ट होती शेफालीकडे.


ट्रेक सुरू झाला तसे सॅकचे वजन जाणवू लागले. मंदिरापर्यंत पोहचतना धाप लागली. अजुन असेच ५ दिवस... बापरे! आणि चूल पाहून तर ओरडलोच. (अजूनही चुलीशी माझे सख्य नाही). दीप्ती बावा आणि टीमने सर्वात आधी समीट केला. आम्ही पोहचलो तेव्हा ती संतोष आणि अभिषेकबरोबर साखळी खेचण्याची पैज लावण्यात मग्न होती. देवाला नमस्कार केला. एवढ्या दुपारी देखील गार वाटत होते. पहिलाच ट्रेक... तोही सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरावर. इट वॉज अ ग्रेट फीलिंग.


शेंडीपर्यंत ट्रेकदेखील छान होता. काळोखात आम्ही हरवलो की काय म्हणून प्रशांत जाम घाबरला होता. आणि ट्रक राइड तर एकदम झकास. धिंगाणा घातला अगदी. शाळेत उतरलो तेव्हा दमलो होतो पुरे. कवीश आणि प्रवीण इथेच भेटले. ते सी.डी.एस.ची परीक्षा देऊन आले होते. जेवण राहीले बाजूला. झोपून कधी गेलो कळलेच नाही. “काका मात्र झोपला नव्हता. उद्याची स्क्रिप्ट लिहीत बसला होता बहुतेक.”
सकाळीच हिमांशुने लीडरशिप कविशला हॅण्ड ओवर केली. हक्का नुडल्स आणणारी शेफाली किवा राहुलच असणार. खाता खाता पुरेवाट झाली. पार्ले-जी आणि चहा मात्र बेस्ट कॉंबिनेशन. लॉंचमधला प्रवास तर अजूनही आठवतो. हळू-हळू मागे पडणारे कळसुबाई शिखर आणि जवळ येणार रतनगड. स्वप्नवत दुनियेत असल्यासारखे वाटत होते. पण त्यात विरजण पडले. काकाची बाइनाक्युलर गायब. कशी, कुठे, कुणी... सगळे सी.आइ.डी. फंडे वापरुन झाले. शोध मोहिमेत अपयश आले आणि काका आमच्यावर घसरला. सगळयांचे ब्रेन वॉश झाले. रतनगड स्कीप करायचे ठरले.


कात्राबाईच्या खिंडीत मनाली आणि सुमेधाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. हिमांशू ब्लीस्टर पीडीत होता तर शेफालीची पाठ धरली होती. पण काकाला टेंशन वेगळेच होते. रात्रीचे...! रोहनने छान रंगवली आहे ती रात्र. इतक्या गोष्टी घडल्या त्या रात्री... आठवण आली की शहारे येतात. रोहन, राजेशला विचारू, पुन्हा त्या जागी जाता येईल का...? तोच नेऊ शकेल कदाचित...


जाम बोर वाटत होते. दोन दिवस नुसतीच तंगडतोड. त्यात ती कालची रात्र. रोहनचे नॉनस्टॉप खाल्लेले पार्ले-जी आणि काकाच्या अधून-मधून कान पिचक्या. काय करत होतो काय पत्ताच नव्हता. सर्वांशी आता बऱ्यापैकी ओळख झाली होती. त्यामुळे बडबडीत वेळ भराभर जात होता. अंतर मात्र काही कमी होत नव्हते. जेवण पुराण तर विचारू नका. रोहन आणि टीमला शिक्षा भारी झाली. पण या ५ बिलंदरानी ती मजेमजेत पूर्ण निभावली. मंदिरातल्या चहाची एक गंमत सांगतो. हिमांशू खूप दमला होता. बूट भिजल्यामुळे गार पडला होता. त्याच्यासमोर चहा ठेवला. हातात पार्ले-जी दिले. पण त्याला ते खाताच आले नाही. तो चहात बिस्किट बुडवून खाईपर्यंत ते खाली पडायचे. असे तीन वेळा झाले. शेवटी कोणीतरी त्याला अक्षरष: भरवले. हा हा...


गड चढताना माझ्यापुढे मनाली होती. तर सत्या मागे. पण टॉर्च मात्र एकच. सत्या अर्धवट झोपेत माझ्या पावलावर पाऊल टाकत चालत होता. मी आणि मनाली काही बाही बडबडत स्वतःला जागे ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. गडावर जेव्हा पोचलो तेव्हा काहीच दिसत नव्हते. जेवण केले की नाही ठाऊक नाही. गाढ झोपलो हे मात्र खरे.

काकाच्या रागाचा धनी व्हायची आज माझी वेळ होती. त्याचे झाले असे... की गुहेबाहेरच्या दगडावर मी आमच्या कॉलेजची नावे मार्करने लिहिली. काकाने ते पहिले. गडाचे सौंदर्य बिघडवले म्हणून माझी शाळा घेतली आणि मग फर्मान काढले की "जो पर्यंत मी ते लिखाण धुवून साफ करत नाही तो पर्यंत मला गड फेरीला जाता येणार नाही" झाले...! मी लागलो कामाला, स्टीलवूल घेऊन. घासत बसलो एकटाच. बाकी सगळे गेले. प्रवीण आणि आशिष मात्र थांबले माझ्यासाठी. पर्मनॅंट मार्कर असल्यामुळे बराच वेळ गेला. नखातून रक्ता येऊ लागले. पण कोकण कडा बोलावत होता. झाले एकदाचे साफ. काकाचे अप्रूवल घेतले आणि धाव मारली तिघानी कोकणकड्याकडे.

'अप्रतिम' असेच वर्णन करता येईल इतका सुंदर आहे हा कडा. रोहन्या डोळ्यासमोर उभा केलास अगदी तुझ्या ब्लॉगमधून आणि हा ग्रूप फोटो... माझ्या आयुष्यातील "वन ऑफ दि बेस्ट मोमेन्ट" आहे.

परत आल्यानंतर सगळ्यात जास्त वैताग मला आला होता काकाचा नवीन निर्णय ऐकून. एकतर प्रथमच दिवाळीचा पहिला दिवस घरी नसणार होतो. त्यात ती पूर्ण केव धुवून काढायची म्हणजे काय??? पण म्हटले... आलिया भोगासी... पण रागाच्या भरात सामान शिफ्ट करताना ३ वेळा माझे डोके गुहेच्या दारावर आपटले. अजुनच वैतगलो. निषेध करायचा म्हणून गुलाबजामचा त्याग केला. डाळ ढोकळी पण पाण्याबरोबर कशीबशी ढकलली. भयानक दिवस गेला. रात्री मात्र मस्त गप्पा रंगल्या. दिवसभरचा गोंधळ विसरून छान मजा केली.



अभ्यंग स्नान राहीले बाजूला, इथे तर आंघोळ करायचे वांदे होते. सर्वात आधी मी उठलो होतो. काकाने कालच दही भात लावून ठेवला होता सकाळच्या न्याहारीसाठी अणि मलाच दिला चवीसाठी. तो पण अगदी मूठभर. त्याला कोण सांगणार की मला दही मुळीच आवडत नाही. पण पुन्हा... आलिया भोगासी म्हणून खाल्ला. वर सांगून टाकले, छान झालाय. हा हा... बाकीच्यानी मात्र खरेच मेजवानी हाणली.


परतीचा प्रवास. थोडी हूरहुर लागली होती. पण आनंद देखील होत होता. ५ दिवसांच्या सवयीमुळे कोणालाच काही त्रास जाणवत नव्हता. आणि सॅक पण बऱ्यापैकी हलक्या झाल्या होत्या. विहिरीजवळची पॉट पौरी म्हणजे या सगळ्याचा कळस.


"डोंगरात कसल्या सीमा नसतात. मनाला येईल तो वेडेपणा करण्याची मुभा असते."

तिथून निघालो. मनालीशी चांगली मैत्री झाली होती. दोघेच निघालो गप्पा मारत. बराच वेळ बोललो. लंच ते खुबी फाटा. ऑलमोस्ट एक ते दीड तास. खुबी फाट्याला माझा चष्मा गायब. बसमधे कळले, तो मनालीनेच लंपास केला होता. काका एकदम अचंब्यात. त्यात एस.टी.मधे त्याच्या डोक्यावर ठेवलेला स्टोव पडला. तो गार. हा हा... मुरबाड आणि मग कल्याणला पोहचलो. ट्रेनमधे बसल्यानंतर एकदम खिन्न वाटले. ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.....???"

"इथून पुढे काय म्हणतोस... तुझी-माझी दोस्ती आणि आपली सह्यभ्रमंती" ... :)


ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.....???"
अभ्या... इथून पुढे तर सुरू झाली एक कधीही न संपणारी सह्ययात्रा.... :)

खरच रे रोहन, सह्ययात्रा - मनाला वेड लावणारी, ताप कटकटी पासून मुक्त, आयुष्याचे धडे देणारी... अतिशयोक्ती करत नाही. माझ्या आयुष्याचे धडे मी डोंगरातच गिरवले आहेत. ग्रॅजुयेशन पर्यंतच्या १५ वर्षात जे शिकलो नाही ते या एका ट्रेकने शिकवले. ट्रेकच्या आधीचा अभिजीत आणि ट्रेक नंतरचा अभिजीत यात जमीन असमानाचा फरक आहे. ज्या आत्मविश्वासाने आज मी काम करतो तो आत्मविश्वास या ट्रेकनेच आलेला आहे. नेतृत्व तर अगदी अंगात भिनले. जगण्याला खरा अर्थ मिळाला. योग्य आयोजनाचे महत्व पुरे पूर पटले.
नवीन सवंगडी मिळाले. 

जुने सवंगडी अजुन घट्ट झाले. राजेश तर आमचा राजदा ( राजेश दादा ) बनला. मी आणि रोहन... डोंगर वेडे झालो. शेफाली, मनाली, सुमेधा, कविता, हर्षद, प्रशांत, कवीश याना गिर्यारोहनाची गोडी लागली. आशिष, प्रवीण, राहुल, सुरेश तर आज उत्करूष्ट रॉक क्लाइंबर आहेत.

निसर्गाशी बंधिलकी, आपुलकी इथूनच निर्माण झाली. सह्याद्रीची ओळख झाली. नकळत महाराजांशी जवळीक साधता आली. या गड किल्ल्याना पाहून दुर्दम्य इच्छा शक्ति मिळाली. इतिहास फक्त पुस्तकात न रहता आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला.

काकाने जे काही फंडे तिथे शिकवले आहेत ते पदोपदी उपयोगी पडत आहेत. मी तर म्हणेन मॅनेज्मेंटचा एखादा कोर्स करण्यापेक्षा काका बरोबर ट्रेकला जावे. हा हा... काय रोहन? आजही ते मुंबई यूनिवर्सिटी मधून हे काम अविरत करत आहेत. काकाचे आभार मानीत नाही. कारण आपल्यांचे कसले आभार??? पण तरीदेखील "आइ ओ अ लॉट टू धिस मॅन"

बर्‍याच मोहिमा झाल्या कळसुबाई नंतर... अगदी लेह-लडाख देखील. पण या ट्रेकची मजा काही औरच होती. अवीट अशी. एवरग्रीन...
.
.