Saturday 28 February 2009

भाग २ - निमगिरी - हडसर - शिवनेरी ... !

८ च्या आसपास आम्ही जेवण उरकले आणि मंदिराबाहेर गप्पा मारत बसलो. स्वच्छ चांदणे पडले होते पण हवी तशी ठंडी मात्र नव्हती. साधारण १० नंतर आम्ही सगळेजण आडवे झालो. पडल्या- पडल्या ऐश्वर्या गुडुप झाली होती तर आदित्य आणि अमृता निवांत पहुडले होते. माझ्या मनात मात्र काही वेळात सुरु होणाऱ्या मजेशीर गोष्टीबद्दल विचार सुरु होते. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशत मी सुद्धा पहुडलो होतो. रात्री १२ च्या आसपास अचानक घंटीचा आवाज आला... आणि अपेक्षित होते तेच झाले. एक गाय मंदीराच्या पायऱ्या चढून आत मध्ये आली. आम्हाला बघून ती चांगलीच दचकली होती. आम्ही तिच्या घरात होतो. माझ्या अगदी समोर गाय उभी होती आणि अमृता तिला बघून ताड़कन उठली होती. ऐश्वर्याने एक वेळ उठून गाईकड़े पाहिले आणि माझ्या झोपेपेक्षा हे महत्वाचे नाही असे ठरवून ती झोपली, ती सकाळपर्यंत उठली नाही. आदित्य सुद्धा निवांत झोपून होता पण बहुदा त्याला काही नीट झोप येत नव्हती. मला आता झोप यायला लागली होती पण अमृता काही मला झोपू देईना. अखेर मी कधी झोपलो मलाच माहीत नाही. बहुदा अमृता काही रात्रभर झोपलीच नाही. रात्रभर रवंथ करणार्‍या गाईला ती कंपनी देत बसली होती. बिचारी गाय इतकी घाबरली होती की ती रात्रभर बसलीच नाही.




पहाटे मला जाग आली ती तिच्या बाहेर जाण्याच्या आवाजानेच. मंदिराच्या दरवाजातून बाहेर पाहिले तर थेट समोर सूर्यनारायण उगवत होता. अमृता जागीच होती. अक्षरशः घोडे विकून झोपलेल्या ऐश्वर्या आणि आदित्यला जागे केले. फटाफट आवरले आणि किल्ला बघायला निघालो. आज आम्हाला हडसर किल्ला पुर्ण बघून १२वा. पर्यंत शिवनेरी गाठायचा होता. गड़ बघताना मध्यभागी असलेल्या उंचवटयाला प्रदक्षिणा मारावी. शिवमंदिराच्या बाजुलाच एक मोठा पाण्याचा तलाव आहे. तिकडून थोड पुढे गेल की उतारावर जमिनीखाली बांधलेल्या कोरीव गुहा लागतात. गुहेचे तोंड चुकू नये म्हणुन शक्यतो कडेच्या जवळून चालावे. गुहेचे मुख वक्राकार असून आत गेल्यावर समोर, डावीकडे आणि उजवीकडे असे ३ भाग आहेत. प्रत्येक भागात आतल्या बाजूला २०-२० फुट लांब-रुंद आणि १०-१५ फुट खोल अशी २-३ कोठारे आहेत. यात बहुदा धान्य, शस्त्र आणि ग़डावर लागणारे सर्व सामान साठवण्याची सोय असावी. सध्या ह्या गुहा वाइट स्थितीत आहेत. तिथून पुढे गेले की गडाच्या उत्तर टोकावर तूटका बुरुज आहे. बाकी गडावर कुठलेच बांधकाम शिल्लक नाही. वाड्यांचे जोते मात्र तेवढे दिसून येतात. एक गड़फेरी पूर्ण करून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.



हडसरच्या बांधीव पायऱ्या उतरताना मध्येच मी आणि आदित्य धावायला लागलो. आम्ही त्या पायऱ्या अक्षरशः १-२मी. च्या आत उतरलो. आणि मग खाली येउन पाय मोकळे करत बसलो. पाय कसले सॉलिड भरून आले होते. आल्या मार्गानेच हडसर गावात आलो आणि पुन्हा आमच्या बाइक्स घेउन शिवनेरीच्या दिशेने सुटलो. आता शहाजीसागर जलाशयाची भिंत दिसू लागली होती. ती पार करून आम्ही जुन्नरचा शिवाजीचौक गाठला. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला त्रिवार मुजरा करत शिवनेरीचा दरवाजा गाठला.




किल्ल्याचा पहिला दरवाजा समोर येताच माझ्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहू लागला. किल्ले शिवनेरी - आपल्या शिवबांचे जन्मस्थान. जेँव्हा राजेशहाजी जिजाऊ मासाहेबांना घेउन येथे आले तेंव्हा निजामशाहीचे सरदार, जिजाऊंचे वडिल लखुजी जाधवराव शहाजीराजांच्या मागावर होते. खरे तर शिवनेरी हा निजामशाहीचा किल्ला. पण किल्ल्याचे किल्लेदार विश्वासराव हे शहाजीराजांचे व्याही. थोरल्या संभाजी राजांचे सासरे. किल्ला निजामशाहीचा, त्यामुळे जिजाऊ मासाहेबांना येथल्यापेक्षा सुरक्षित जागा नव्हती. अखेर शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांना शिवनेरीच्या हवाली ठेवून गेले आणि फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी शिवरायांचा जन्म झाला. मनातल्या मनात त्यांना वंदन करत आम्ही शिवनेरीच्या पायऱ्या चढायला लागलो. आता सरकारने संवर्धनाच्या नावाखाली इकडे सगळे बांधकाम नवीन केले आहे. शिवाय रविवार असल्याने खुपच गलका होता. त्यामुळे आम्हाला ना हवा तसा गड बघायला मिळाला ना हवे तसे फोटो काढता आले. ग़डावरील गंगा-जमुना टाकी, धान्यकोठार, राजवाडा, शिवजन्मस्थान, त्या पुढे असलेला कड़ेलोटकडा आणि नविन बांधलेले बाल शिवाजी मंदिर बघून आम्ही साखळीच्या वाटेकडे मोर्चा वळवला.





साखळीची वाट म्हणजे शिवनेरीची चोरवाट. उभ्या कडयामधून पायऱ्या खोदून बनवलेला हा छुपा मार्ग. ह्या वाटेने फारसे कोणी येत जात नाही. गावातली माणसे आणि डोंगरवेडे. मुळात ही चोरवाट फार कोणाला माहीत पण नाही. आम्ही ह्या वाटेने उतरायचे ठरवले. पण आमच्या गाड्या रस्त्याला असल्याने आमची नंतर पंचाइत झाली असती. आम्ही त्यावाटेने खाली उतरून पुन्हा चढून वर यायचे ठरवले. साखळीच्या वाटेवर पायर्‍यांचा पहिला टप्पा सोपा आहे तर दुसरा थोडासा कठीण. पावसाळ्यात ही वाट थोडी निसरडी असते. पण आता उतरून जायला फारसे प्रयास पडले नाहीत. पायर्‍या संपल्या की डावीकडे कोरीव गुहा आहेत. हे आम्हाला माहीतच नव्हते. दुर्लक्षित स्थितीत असलेल्या ह्या गुहा सुंदर आहेत. जुन्नर शहराचे इकडून छान दर्शन होते. शिवनेरीवरच्या गर्दीत जो निवांतपणा मिळाला नव्हता तो येथे येऊन मिळाला. पुन्हा चढून वर आलो आणि बालेकिल्ला बघायला गेलो. वरती तसे फार काही बांधकाम उरलेले नाही. एक तटबंदी सदृश भिंत उत्तम स्थितीत आहे. येथून भोवतालचा अप्रतिम नजारा दिसतो. ४ वाजत आले होते आणि आता आम्हाला परतायला हवे होते. मुख्य मार्गाने आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. माळशेजघाटमार्गे अंधारपडेपर्यंत आम्हाला किमान मुरबाड गाठायचे होते. गाडी पुन्हा दामटवली. आणि कुठेही न थांबता सुसाट वेगात २ तासात थेट टोकावडेला थांबलो. मस्तपैकी पोटपूजा आटोपली आणि अजुन एका जबरदस्त धमाल ट्रेकची सांगता केली. मी आणि अमृताने ऐश्वर्या - आदित्यला टाटा केला पण त्या आधी पुढच्या ट्रेकचे प्लॅनिंग करायला विसरलो नाही...

भाग १ - निमगिरी - हडसर - शिवनेरी ... !



२४-२५ जाने. ला मी, अमृता, ऐश्वर्या आणि आदित्य माणिकडोह - जुन्नर परिसरात भटकंतीसाठी गेलो होतो. उदिष्ट अर्थात होते किल्ले शिवनेरी आणि जवळच असलेले हडसर आणि निमगिरी हे किल्ले. गेल्या सुट्टीमध्ये आम्ही जास्त बाइकनेच फिरलो. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बाइक घेउन जायची, मग पुढे चढाई सुरु. २४ला सकाळी माळशेज घाटाच्या रस्त्याने निघालो. कल्याण ते मुरबाड रस्ता एकदम मस्त आहे. सकाळी फारसे ट्राफिक नसते आणि वातावरण पण एकदम मस्त. आमच्या अत्यंत महत्वाच्या अश्या 'नाश्ता ब्रेक' साठी मुरबाडला थांबलो आणि मग गाड़ी दामटवली. उजव्या हाताला सिद्धगड़ आणि गोरख-मछिन्द्र आमची साथ करत होते. टोकावडे गाव गेल तसा समोर नाणेघाट दिसायला लागला आणि त्यामागे जीवधन साद घालत होता. सकाळी ९ ची वेळ. माळशेजघाट अतिशय सुंदर दिसत होता. भैरवगड़ची डाइक भिंत आता डोक्यावर होती पण ऊन समोरून येत असल्याने काही फारसे फोटो काढला आले नाहीत. माळशेज घाटात लागणारा छोटा बोगदा पर करून आम्ही जरा वेळ थांबलो. अलिकड़े असणार्‍या मंदिरापाशी बोर विकणारी गावातली माणसे, विकत घेणारे आणि माकडे ह्यांचा एकच गलका होता. म्हणून तिकडून लगेच निघालो, ते पण बोर न खाता. हा.. हा.. डावीकडे आजापर्वत, हरिश्‍चंद्रग़डाचा थरारक कोकणकडा दिसत होता. घाट संपला आणि पुढे खिरेश्वर धरण लागले.



आम्हाला जायचे होते आधी किल्ले निमगिरी आणि मग तिकडून हडसरला. हवा तसा नीरव शांततेचा आनंद शनिवारी शिवनेरीला मिळणे अशक्य होते. तो मिळणार होता आडवाटेवरच्या ह्या किल्ल्यांवर. निमगिरी गावच्या वाटेला लागलो. मध्ये एका गावातल्या माणसाला रस्ता विचारला. बाइक नीट जाइलना अस नक्की करून घेतल. तो बोलला 'टेंशन घेऊ नका. आख्खा डांबरी रास्ता आहे. बिनधास्त जा.' पुढे रस्ता कसा होत ते सांगायला नकोच. १० की.मी.च्या पुढे गाड़ी न्यायचा प्रयत्न जर मी किंवा आदित्यने केला असता तर, एकतर आमची तरी वाट लागली असती किंवा गाडीची तरी. माझी आणि आदित्यची 'स्लो-बाईकिंग' रेस सुरु होती. त्यारस्त्याने मध्ये लागणारी चढण पार करत पलीकड़े उतरून अखेर निमगिरीच्या पायथ्याला पोचलो. पहिल्याच घरासमोर गाड्या लावल्या. गावातली लोक इतकी अथत्यशील असतात. त्या घरातल्यांनी आम्हाला पाणी दिले, जेवायला आत बसा असे सांगितले. अगदी किल्ल्यावर जाताना आम्ही आमचे सामान सुद्धा तिकडेच ठेवून गेलो.


निमगिरीचा किल्ला हा जोड़किल्ला आहे. गावातून निघाल की शेता-बांधाच्या मधून थेट खिंडीच्या दिशेने जायला लागले की वाट मस्त बाजरीच्या शेतामधून जाते. जोड़किल्ल्यांच्या मधल्या खिंडीमधून उजव्या बाजूने वर जायला स्पष्ट वाट आहे. उजवीकड़े दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. काही मोडल्या आहेत, काहींवर मातीचा घसारा आहे. पण चढून जाऊ शकतो. अगदी वरपर्यंत कोरलेल्या पायऱ्या असल्याने वाट चूकायचा कुठेच प्रश्न नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडले आहे. पण ह्या ठिकाणी आहे किल्ल्याचा 'फोटो स्पॉट'. तिकडे आम्ही थोडी फोटोग्राफी केली आणि थेट वर पोचलो. निमगिरी चढ़ताना पाठीमागे शहाजीसागर जलाशयाचे म्हणजेच माणिकडोहचे विहंगम दृश्य दिसत राहते. त्याच्या प्राश्वभूमीवर किल्ले शिवनेरी आपल्याला खुणावत राहतो. ग़डावर मध्यभागी एक उंचवटा आहे. त्याच्या चारही बाजूने खुप पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. काहींमधले पाणी पिण्यायोग्य आहे. एक पडके मंदिर आहे आणि त्यासमोर थोड़े वरती काही समाधीचे अवशेष विखूरलेले आहेत.


पायऱ्या उतरून पुन्हा खिंडित आलो आणि समोर असलेल्या जोड़किल्ल्यावर गेलो. तेथेसुद्धा पुन्हा कोरीव पायऱ्या आणि शत्रूला चकवा देइल अशी प्रवेश रचना. मी सर्वात पुढे होतो आणि चकणार सुद्धा होतो. पण मला डावीकडे वर जाणाऱ्या पायऱ्या आधी दिसल्या. उजवीकडच्या बाजूने एक थोडी मळलेली वाट पुढे जाते. समोर किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असे वाटते, तसे बुरुजाचे बांधकाम सुद्धा आहे. पण समोर गेलो की काहीच नाही. रस्ता बंद. डावीकडे वर जाणाऱ्या पायर्‍यांनी वरती गेलो, तिकडून परत खाली उतरून आलो आणि पायथ्याच्या मार्गाला लागलो. किल्ला चढून आणि बघून उतरायला साधारण तीन-साडेतीन तास पुरले.


पायथ्याला पोचलो तेंव्हा दुपारचे ३ वाजून गेले होते. आम्ही पुन्हा आमचा एक छोटासा फ़ूड ब्रेक उरकला आणि हडसरच्या दिशेने निघालो. नागमोडी वळणा-वळणाचा रस्ता आता जलाशयाच्या कड़े-कड़ेने जात होता. मध्येच ख़राब तर मध्येच सुसाट गाड़ी पळेल इतका छान. हडसर गावात पोचलो, एके ठिकाणी गाड्या लावल्या आणि फटाफट निघालो. अंधार पड़ायच्या आत आम्हाला वर जाउन पाणी आणि राहती जागा शोधणे आवश्यक होते. गावाच्या मागून वर निघालो आणि वरच्या पठारावर पोचलो. ५ वाजून गेले होते आणि हातात अजून फार तर दीडतास होता. वरती जायचा २ मार्ग आहेत. एक पाण्याची वाट तर दूसरा बांधीव पायर्‍यांचा मार्ग. पाण्याच्या वाटेने तासाभरात वर जाता येते पण खडा चढ आणि थोडा घसारा आहे. तर पायर्‍यांचा रस्ता पाण्याच्या वाटेच्या बरोबर विरूद्ध दिशेने वर जातो. त्यासाठी डावीकडच्या टेकाडाला वळसा मारावा लागतो. आम्ही त्या टेकाडावर तिरप्या रेषेत वर चढत जाउन वळसा मारून पायर्‍यांकड़े पोचलो.


हडसरच्या बांधीव पायऱ्या खुपच सुंदर आहेत. आणि त्या अश्या बांधल्या आहेत की समोर येईपर्यंत काही दिसत नाहीत. साधारण १००-१५० पायऱ्या चढून गेलो की समोर तटबंदीची भिंत लागते. दरवाजा एकसंध व कोरीव आहे आणि वरच्या बाजूला डावीकड़े लपलेला आहे. तिकडून आत गेल की आतली तटबंदी लागते. एकसंध पाषाणामधून कोरुन काढलेल्या ह्या पायऱ्या म्हणजे दुर्गबांधणीमधला एक उत्तम नमूना आहे. गेल्या काही वर्षांपासून मला हडसरला याकारणासाठी यायचे होते. आम्ही ती कारागिरी पाहून पुरते भारावलो होतो. शेवटच्या टप्यातल्या पायऱ्या चढून आम्ही वर पोचलो तेंव्हा सूर्य अस्ताला टेकत होता. अगदी वेळेत आम्ही ग़डावर पोचलो होतो. समोर स्वच्छ पाण्याचे टाके आणि त्याच्या मागे दुरवर सफ़ेद रंगाचे शिवमंदिर उठून दिसत होते. पचिमेकड़े क्षितिजावर कडा लालसर होत जात होती आणि त्याचे प्रतिबिंब माणिकडोहामध्ये चमकत होते. आम्ही आमचा मोर्चा मंदिराकड़े वळवला. आमचा आजचा मुक्काम तिकडेच असणार होता. गडावर गुहा आहेत पण त्या राहण्यायोग्य नाहीत. मंदिरात पोचलो आणि बघतो तर काय ... सगळीकड़े गुरांचे शेणच शेण. उजवीकड़े हनुमान, पवनदेव आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या, तो भाग मात्र स्वच्छ होता. पण आम्ही पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेतले. आता जागा राहण्यायोग्य झाली होती. सगळीकड़े अंधार पसरत होता. माझ्या मनात एक विचार घर करत होता, जो काही वेळात १०० टक्के ख़रा ठरणार होता.


क्रमशः ...

Sunday 22 February 2009

भाग २ - प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !

भाग १ वरुन पुढे सुरु ...

तिथून निघालो ते थेट प्रबळगडाच्या कड्याखालून सरकत सरकत मुळ वाटेवर येउन पोचलो. एकडे मध्ये अमृता धडपडली. जास्त काही झाल नाही. ह्या वाटेने आमचा थोडा वेळ वाचला होता. आता खरी चढाई सुरु होणार होती. किती वाजले, पाणी किती बाकी आहे हे सगळ पाहील आणि फटाफट पल्ला मारायचा अस ठरवून सुटलो. पुढे जाउन पुन्हा एक क्षणभर विश्रांती झाली. माझी तब्येत आता टोटल डाउन होत चालली होती. पण आता थांबायचे नाही असे ठरवून आम्ही निघालो ते थेट प्रबळगड़चा ढासळलेला दरवाजा आणि तटबंदी ओलांडून माथ्यावर पोचलो. आमच्याकडचे पाणी संपले होते. तितक्यात वरती एका दगडावर 'पाणी' अस खडूच निशाण आणि मार्ग दाख़वणारा बाण दिसला. खर तर गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेल नाही पण त्या वेळी आम्ही ते पाणी प्यालो.


अभि आणि ऐश्वर्या पाणी आणायला गेले तर मी आणि अमृताने चक्क सुक्या गवतावर मस्त लोळण घेतली. हा.. हा.. मी बरेच दिवसांनी असा पहुडलो होतो. बिछान्यात लागणार नाही अशी झोप मला त्या ५-१० मी. मध्ये लागली होती. दोघे परत आले आणि मग आम्ही प्रबळगडाच्या टोकाशी जायला निघालो. तिकडून कलावंतीण सूळका एकदम जबरी दिसतो. त्यासाठी तर इतकी पायपिट केली होती. अखेर टोकाला पोचलो. ते दृश्य बघून भरून पावलो. सगळे श्रम एक क्षणात विसरलो.



'ह्याच त्या कलावंतीण सुळक्याच्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या'





पुन्हा तिकडून पाण्याकड़े गेलो आणि आमचा लेट लंच उरकला. खायला काय होत ह्याचे डिटेल्स एकडे नको नाही का. कस असत की बरेच जणांना ते वाचूनच भूक लागते. आता ४:३० वाजून गेले होते आणि अंधार व्हायच्या आत आम्हाला किमान खाली गाडयांपर्यंत पोचयचे होते. पुन्हा सुसाट निघालो ते कुठेही न थांबता उतरायला सुरवात केली. माचीवर पोचलो आणि तिकडून खाली ठाकुरवाडीला. दिवसभर सुरु असलेली अमृताची फोटोग्राफी सुरूच होती. मावळत्या सुर्याचे काही मस्त फोटो तिने टिपले. खाली गाडयांपर्यंत पोचलो तोपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. त्यात कोणीतरी गाड़ीचा स्पार्कप्लग काढून टाकला होता. नशीब तो नीट लागला आणि गाड़ी सुरु झाली. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. हा माझा ह्या सुट्टीमधला शेवटचा ट्रेक होता. बरेच दिवसांपासून डोक्यात असलेला एक ट्रेक एकदम मस्तपैकी पार पडला होता.


कलावंतीण सुळक्याच्या कोरीव पायऱ्या आणि खिंडीमध्ये पायथ्याला असलेली गुहा हे ह्या ट्रेकचे मुळ उदिष्ट होते. नेहमी खातो त्याप्रमाणे मी आणि ऐश्वर्याने फारसे खाल्ले पण नाही. तरीपण हा ट्रेक माझ्या बेस्ट ट्रेक्स पैकी झाला. पुढच्या महिन्यात करायचे ट्रेक्सचे प्लान बनवत बनवत परतीच्या वाटेला लागलो.

Friday 20 February 2009

भाग १ - प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !



५ फेब. ला मी, अभिजित, अमृता आणि ऐश्वर्या पनवेल जवळ असणाऱ्या प्रबळगड़ - कलावंतीण सूळका येथे गेलो होतो. सवयीप्रमाणे बाइक्स काढल्या आणि सकाळी ६ला ठाण्यावरुन निघालो. तस ऐश्वर्याला ५च्याही आधी निघावा लागल होत. ही पोरगी ग्रेट आहे. कसला तो उत्साह आणि आवड. खाण्याच नाही बोलत आहे इथे; ट्रेकबद्दल बोलतोय. हा.. हा.. खाण्याच नंतर बोलूयात. आता त्याच लाइनला अमृता सुद्धा येउन पोचली आहे. त्याच लाइनला म्हणजे ट्रेकच्या. मी आणि अभिजितने २००० पासून एकत्रच भ्रमंती सुरु केली. अभि आणि मी एकदम 'बेस्ट ट्रेक बड़ी'.


पनवेल नंतर पळस्पे फाटयाला नेहमीप्रमाणे नाश्ता आटोपला आणि सुसाट निघालो ते थेट शेडुंग फाटयाला डावीकड़े वळालो, कर्जत - पनवेल रेलवेचा बोगदा लागला त्यापलीकडे प्रबळगड़ दिसत होता. पायथ्याला ठाकुरवाडीला पोचलो. ठाकुरवाडीच्या डाव्या हाताला असलेल्या टेकाडावरुन कलावंतीण सुळक्याकड़े रस्ता वर जातो. त्या टेकाडाच्या पायथ्याला गाडया लावून निघालो. माथ्यावर जाउन झेंडा लावणे आमचे उदिष्ट कधीच नसते. त्यामुळे आम्ही एकदम सावकाश ट्रेक करतो, अर्थात किमान वेळेचे गणित मांडून. प्रत्येक डोंग़रावर एक फोटोस्पॉट असतो. तसा एक मस्त फोटोस्पॉट आम्हाला लगेच मिळाला. तिकडे थोडी फोटोग्राफी झाली आणि आम्ही पुढे निघालो. प्रबळगड़माची लागली. साधारण ९ वाजत आले होते. चढ़ सुरु झाला आणि पाणी संपायला लागल. प्रबळगड़ला जाताना नेहमी जास्त पाणी घेउन जावे, एकदा का माची सोडली की कुठे पाणी नाही. गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेला नाही.


प्रबळगड़ आणि कलावंतीण सूळक्या मधल्या 'V' आकाराच्या खिंडी मध्ये पोचलो तेंव्हा जवळजवळ ११वाजून गेले होते. तिकडे एक मस्त फ़ूड ब्रेक घेतला आणि मग कलावंतीण सुळक्याच्या त्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या चढायला लागलो. ज्या अपेक्षेने गेलो होतो त्यापेक्षा सोप्या निघाल्या त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. ३०मी. मध्ये कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर होतो. तिकडून माथेरान, इर्शाळगड़ आणि धुरकट मलंगगड़ दिसत होता. पावसाळ्यात मात्र एकडे यायला जास्त मज्जा येइल. पुन्हा येऊ अस ठरल आणि आम्ही उतरायला सुरवात केली. माझी तब्येत २ दिवस आधीपासून थोडी ख़राब होती आणि ट्रेक सुरु केल्यापासून जास्तच बिघडत चालली होती. कोणी आठवण काढत होत का माहीत नाही पण उचक्या काही थांबत नव्हत्या.
(मी, अभिजीत, अमृता आणि ऐश्वर्या - कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर)



खिंडीमध्ये परत आलो तेंव्हा १ वाजत आला होता आणि आम्ही उन्हाने करपत होतो. पाणी धडाधड संपत होत आणि अजून आख्खा प्रबळगड़ करायचा राहिला होता. खिंडीमध्ये पायथ्याला एक मस्त गुहा आहे. जो कोणी प्रबळगड़ - कलावंतीणला जाइल त्याने ही गुहा चुकवू नये. ५०फुट सरकत सरकत आत जावे. शेवटपर्यंत पुढचा रस्ता कळत नाही. शेवटी डावीकड़े जायला वाट दिसते. डावीकड़े वळून ७-८ फुट गेले की परत उजवीकडे वाट वळते. पुन्हा २-४ फुट आत गेला की एक प्रशस्त गुहा लागते. चांगली १०-१५ फुट लांब आणि १५-२० फुट रुंद. ज्यांना श्वास घायला त्रास होतो अश्यांनी आत जाणे टाळावे. एक वेळेला ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी आत जाऊ नये. टॉर्च न्यायला विसरु नका बरे. नाहीतर आत दिसणार काय आणि तुम्ही बघणार काय...



क्रमशः ...

Wednesday 18 February 2009

डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !



सह्याद्री नामा नग हा प्रचंड ... हा दक्षिणेचा अभिमान दंड ... !
स्कंधावरी दुर्गम दुर्ग ज्याच्या ... हाती झळाळे परशू तयाच्या ... !



कोकणातील सर्वात उंच पर्वत ... आजा / आजोबा डोंगर ... !!!


मी भ्रमंती का सुरू केली माहीत नाही आणि का ते कधी शोधायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. २००० मध्ये कॉलेजला असताना सुरू झालेल हे वेड आता अगदी टोकाला जाउन पोचल आहे. गिरीभ्रमण आणि गिर्यारोहण हे माझे आवडते छंद. मला माझ्या कामातून सलग खूप सुट्टी मिळते. मग त्या सुट्टीमध्ये भटकणे हा माझा छंद. अर्थात सोबत फोटोग्रॉफी म्हणजेच छायाचित्रण आणि ग्रामजीवन जवळून बघणे हे त्यासोबतचे छंद. अर्थात तेथे सुद्धा मी माझा खाण्याचा छंद सांभाळतो. हा.. हा.. आता माझ्या बरोबर असे अनेक वेडे आहेत हे काही सांगायची गरज नाही. २००० मध्ये सुरू झालेली ही भटकंती आज २००९ मध्ये सुद्धा तितक्याच जोमाने सुरू आहे. कॉलेज संपल्यावर मध्ये थोडा ब्रेक लागला होता. पण आला पुन्हा सूटलोय. 'सूटलोय म्हणजे फुल्ल टू सूटलोय.' घरून शिव्या खातोय सध्या आणि काही मित्रा - मैत्रीनींच्या सुद्धा.

ह्या ९ वर्षात अनेक अनुभव आले. चांगले-वाईट. गावा गावातून विविध स्वभावाची लोक भेटली . खूप काही शिकलो. खूप काही घेतल. काही देता आल आहे का माहीत नाही. म्हणतात ना ' निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे ' पूर्णपणे पटले ह्या ९ वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला. आज हे सगळ तुम्हाला सांगायच आहे. आवडल तर घ्या नाहीतर डोंगरवेडा म्हणून सोडून द्या.

डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला... !
कुणी फिरस्ता हिंडता वनी... वदला ऐसी आर्तवाणी... !
ऐकून त्याची आर्तयाचना... आली येथल्या जडा चेतना... !
मला विचारा मीच सांगतो... आधी या माझ्या कड़े... !
सरसावत एकेक पुढे... हात उभारुनी घुमू लागले... !
डोंगर किल्ले बुरुज कड़े... डोंगर किल्ले बुरुज कड़े... !

लवकरच येतो आहे ... काही मजेशीर आणि जबरदस्त किस्से घेऊन ... !!!


*******************************************************************************