Friday 15 May 2009

भाग ३ - सप्त शिवपदस्पर्श ... !


आज होता ट्रेकचा तिसरा दिवस... आज अगदी लवकरच उठलो आणि पोहे आणि चहा असा नाश्ता बनवला. खाउन सगळे आटोपले आणि राजगडाकड़े कूच करायला तयार झालो. गावाबाहेर पडलो तशी शेती लागली. सगळीकड़े भात शेती दिसत होती. बांधा-बांधावरुन वाट काढत आम्ही नदीच्या दिशेने सरकत होतो. एके ठिकाणी झाडावर ५०-६० सुगरणीचे खोपे दिसले. अगदी हाताला लागतील इतके खाली. आख्खे झाड़ खोप्यांनी लगडलेले होते. ते बघत-बघत पुढे सरकतोय तोच माझा डावा पाय एका बांधावरुन सरकला आणि मी डाव्या बाजूवर जोरात पडलो. लागले काहीच नाही पण आख्खी डावी बाजू चिखलाने माखून निघाली. ह्या ट्रेकला आम्ही कोण किती सरकते - कोण किती पड़ते ते मोजायचे ठरवले होते त्यामुळे मी आता लीडिंग रन स्कोरर होतो. हा.. हा.. काही वेळातच आम्ही नदीकिनारी येउन पोचलो. नदीला कमरेच्या थोड़े खालपर्यंत पाणी होते. काही मिनिट्स मध्ये आम्ही नदीच्या त्यापार होतो. आता आम्ही विंझर गावामध्ये पोचलो होतो. गावत दुकाने आहेत. कोणाला काही सामान घ्यायचे असल्यास हे ठिकाण उत्तम आहे. तिथून डांबरी रस्त्यावरुन राजगडाच्या पायथ्याला असलेल्या गुंजवणे गावाकड़े निघालो. ९ वाजत आले होते. गुंजवणे गावापासून राजगड चढायला सुरवात केली. लक्ष्य होते पद्मावती माचीवर निघणारा चोर दरवाजा. डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची, त्यात असलेले नैसर्गिक नेढ आणि झुंझार बुरुज, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसत होते. आम्ही राजगडला पहिल्यांदाच येत होतो त्यामुळे ते दृश्य पाहून मी पुरता भारावलो होतो. आता आम्ही गावापासून चढायला सुरवात केली. काही वेळामध्ये एके ठिकाणी दम घेण्यासाठी बसलो. तितक्यात कुठूनसा एक कुत्रा आला आणि आमच्याभोवती घोटाळायला लागला. जसे आम्ही पुढे निघालो तसा तो पण आमच्यासोबत निघाला. काही वेळामध्ये पहिला चढ चढून गेलो की काहीवेळ सपाटी लागते. ह्या सपाटीवरुन समोरचा पूर्ण चढ आणि वरपर्यंतची वाट दिसते. आता इथून चढ सुरु झाला की वळणा-वळणाची खड्या चढणीची वाट आहे. कुठेही सपाटी नाही. एक लक्ष्यात घ्यायला हवे की हा राजगडचा राजमार्ग नसून चोरवाट आहे त्यामुळे वेळ कमी लागत असेल तरी पुरता दम काढते. अगदी सावकाश गेलो तरी तास- दिड तासामध्ये आपण कड्याखाली असतो. इकडून वाट आता गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकड़े कड्यावरुन वर चढते. ह्याठिकाणी एक छोटेसे पाण्याचे टाक आहे. येथपासून ६० फुट वरती तटबंदीमध्ये चोरदरवाजा बांधला आहे. वर जाईपर्यंत सर्व कोरीव पायऱ्या आहेत. हा टप्पा तसा सोपा आहे त्यामुळे कसलेल्या ट्रेकरला काहीच प्रश्न यायला नको. नवशिके आणि इतर लोकांना चढायला सोपे पडावे म्हणुन उजव्या हाताला रेलिंग बांढलेली आहे. ५ मिं. मध्ये हा टप्पा पार करून ३-४ फुट उंचीच्या आणि तितक्याच रुंद अश्या छोट्याश्या दिंडीमधून गडामध्ये प्रवेश करते झालो. आत गेल्या-गेल्या वाट ९० अंशात डावीकड़े वळते आणि लगेच १०-१५ पायऱ्या चढून वर जाते. आपण वर येतो ते थेट पद्मावती तलावासमोर. तलावाच्या डाव्याबाजूला काही पडके बांधकाम आहे. आधी ही बहूदा राहती घरे असावीत. अजून थोड़े वर चढून गेलो की हल्लीच बांधलेले विश्रामगृह लागते. ह्यामध्ये ३० जण सहज राहू शकतात. आम्ही मात्र पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये राहणार होतो. ह्या देवळामध्ये सुद्धा ५० एकजण सहज राहू शकतात. आम्ही वर पोहचेपर्यंत १२ वाजत आले होते. बॅग्स देवळामध्ये ठेवल्या आणि देवीचे दर्शन घेतले. आता आज आणि उद्यापण निवांतपणा होता. राजगडाच्या तिनही माच्या आणि बालेकिल्ला आरामात बघून मगच आम्ही गड सोडणार होतो. आज फ़क्त पद्मावती माचीचा विस्तार बघायचा होता. त्याआधी मात्र आम्ही देवळाबाहेर चुल मांडली, २ दिवस पुरतील इतकी सुकी लाकडे गोळा केली आणि दुपारचे जेवण बनवायला घेतले. देवळाच्या डाव्या बाजूला २ पाण्याची टाकं आहेत. त्यामधले पाणी पिण्यायोग्य आहे. दुपारी जेवण झाल्यावर मात्र आम्ही पद्मावती माची बघायला निघालो.






राजगड म्हणजे स्वराज्याची पाहिली राजधानी. खुद्द मासाहेब जिजामाता, शिवाजीराजे आणि त्यांचे कुटुंब यांचे गडावर कायम वास्तव्य. त्यामुळे लश्करीदृष्टया तो अभेद्य असावा अश्या पद्धतीने त्याची बांधणी केली गेली आहे. गडाच्या तिन्ही माच्या स्वतंत्रपणे लढवता येतील अशी तटबंदी प्रत्येक २ माच्यांच्या मध्ये आहे. प्रत्येक माचीला स्वतंत्र मुख्य दरवाजा आहे. पद्मावती माचीला 'पाली दरवाजा', जो राजगडचा राजमार्ग देखील आहे. संजीवनी माचीला 'अळू दरवाजा' तर सुवेळा माचीला गुंजवणे दरवाजा, जो सध्या बंद स्थितिमध्ये आहे. शिवाय प्रत्येक माचीला स्वतंत्र चोर दरवाजे आहेत. पद्मावती माचीच्या चोर दरवाजामधून तर आम्ही गडावर चढून आलो होतो. संजीवनी माची आणि सुवेळा माचीकड़े आम्ही उदया जाणार होतो. आम्ही आता पद्मावती माची बघायला निघालो. पद्मावती माचीचा विस्तार हा इतर दोन्ही माच्यांच्या मानाने कमी लांबीचा पण जास्त रुंद आहे. माची ३ छोट्या टप्यात उतरत असली तरी गडावरील जास्तीतजास्त सपाटी ह्याच माचीवर आहे. सर्वात खालच्या टप्यामध्ये पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा आहे. मधल्या टप्यामध्ये विश्रामगृह, शंकर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. शिवाय देवळासमोर एक तोफ आणि एक समाधी आहे (ही समाधी राजांची थोरली पत्नी 'महाराणी सईबाई' यांची आहे असे म्हटले जाते. ५ सप्टेंबर १६५९ रोजी त्यांचा राजगडावर किंवा पायथ्याला मृत्यू झाला होता.) देवळासमोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक स्तंभ आहे. विश्रामगृहापासून डावीकडे म्हणजेच माचीच्या पूर्व भागात गेल्यास अधिक सपाटी आहे. टोकाला तटबंदी असून एक भक्कम बुरुज आहे. येथून पूर्वेला सुवेळामाचीचे तर पश्चिमेला गुंजवणे गावापासून येणाऱ्या वाटेचे सुंदर दर्शन होते. माचीवर सर्वात वरच्या टप्प्यामध्ये राजसदन, राजदरबार, सदर, दारूकोठार, पाण्याचा एक तलाव अशी बांधकामे आहेत. ज्याठिकाणी आता सदर आहे त्याखाली काही वर्षांपूर्वी एक गुप्त खोली सापडली. आधी ते पाण्याचे टाके असावे असे वाटले होते पण तो खलबतखाना निघाला. ७-८ अति महत्वाच्या व्यक्ति आत बसून खलबत करू शकतील इतका तो मोठा आहे. त्या मागे असलेल्या राजसदनामध्ये राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये... त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटी सारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणुन तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे. इतका वेळ इतिहासावर गप्पा मारत आम्ही तिघेजण राजसदनाच्या मागे तटबंदीवर बसलो होतो. सूर्यास्त होत आला होता. आम्ही परत फिरून देवळाकड़े निघालो. जेवणाची तयारी करत-करत परत गप्पा मारू लागलो. पायथ्यापासून आमच्या सोबत आलेला कुत्रा अजून सुद्धा आमच्या सोबत होता. एव्हाना अभिने त्याला 'वाघ्या' असे नाव सुद्धा ठेवले होते. आम्ही जेवण झाल्यावर त्याला सुद्धा थोड़े खायला दिले. रात्री देवळामध्ये झोपायच्या ऐवजी देवळाबाहेर झोपायचे आम्ही ठरवले. आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही राजगडावरील निरव रात्र अनुभवणार होतो. दिवसभराच्या भटकंतीनंतर शांत झोप लागली. आता उदया सकाळी लवकर उठून राजगडावरील सूर्योदय पहायचा होता...


क्रमश:

4 comments:

  1. aata hi oghavati bhasha pahun varandha ghat vachnyachi ustukata lagliye..arthat tya sathi barach vel vaat pahavi lagnar ahe...karan madhe ajun barech number ahet...

    Good script...keep it up.

    ReplyDelete
  2. मित्रा किरण ... ह्या पावसाळ्यामध्ये तो प्लान नक्की रे ... :)

    ReplyDelete
  3. सुंदर रोहन!!! डोळ्यात पाणीच आलं!! तू तिथे होतास तेंव्हा ही सर्व माहिती तुला पाठ होती की ती तू नंतर मिळवलीस? जर माहिती असेल तर तुला नक्कीच जास्त आनंद मिळाला असेल. नाही का?

    ReplyDelete
  4. Rohan, great adventure and great writing. Aksharashah sagale raste, marg, dongar, darya ani durg dolyasamor anales. Great. Anaghane sangitale tasech, dolyamadhe pani anales. Pratyek shabd ani shabd lihilela hrudayaparyant pohochala. Hats of to you boys and your daring.

    ReplyDelete