Friday 6 March 2009

भाग २ - पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड ... !


दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच उठलो. करपेवाडी काल रात्रीच्या अंधारात नीट पहिलीच नव्हती. छोटी-छोटी कौलारू घरे, आवारात दाणे टिपत फिरणाऱ्या कोंबडया, सगळच कस एकदम मस्त वाटत होत. आम्ही सर्वात महत्त्वाचा असा नाश्ता आटोपला आणि फटाफट सामान आवरले. एकडे आम्ही काही वह्या आणि कपडे वाटप केले. ऐतिहासिक मोहिमेसोबत भरारी संस्था याठिकाणी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपते. आम्ही आता कूच करण्यास तयार झालो होतो. काल खुपच मागे पडल्याने आम्हाला आता सर्वात पुढे राहा असे सांगितले होते. शिवाय साधनाला त्यामुळे इतर काही ट्रेकर्सचे बाइट्स पण घेता येणार होते. आमचा आजचा मार्ग होत करपेवाडी ते पांढरपाणी. एकुण अंतर होते २७ किलोमीटर. करपेवाडी सोडल्यानंतर बराच वेळ ट्रेक रूट जंगलातून जात होता. मध्येच एखादी लागवडी खालची जमिन लागायची. आसपासचे शॉट्स घेण्यात आम्ही पुन्हा मागे पडलो होतो. बाकी सगळे बरेच पुढे निघून गेले होते. रस्ता एकदम मस्त होता. कधी शेतातून, तर कधी जंगलातून, कधी दगडांमधून, तर कधी एकदम मोकळे मैदान. आम्ही वाट चालतच होतो. मध्ये मध्ये छोट्या-छोट्या वाडया आणि पाडे लागत होते. ह्या भागात पाउस अजून म्हणावा तितका झालेला नव्हता. असलेले पाणी अडवून छोट्या-छोट्या खाचरांमध्ये भात शेती सुरु होती. काही ठिकाणी पिक पाण्याअभावी करपले होते तर काही ठिकाणी जमिन सुकून काळीठिक्कर पडली होती. पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा इथल्या लोकांना लांब जावे लागायचे.





त्यावेळेला महाराजांनी मात्र म्हसाईंपठार ते पांढरपाणी ह्या मार्गात लागणारी गावे आणि वाडया सोडून रस्ता पकडला होता. जेणेकरून त्यांचा माग कमीतकमी लोकांना लागो, शिवाय मागून येणाऱ्या सिद्दीमसूदच्या फौजेकरून त्यांना उपद्रव नको म्हणून सुद्धा. त्यावेळेला इतक्या वाडया आणि गावे नव्हती म्हणा. आसपासची झाडी आणि जंगलसुद्धा निश्चितच दाट असेल. सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता. अर्थात घोड़खिंडीच्या अलिकड़े राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल. त्यांच्या थोड़े मागून आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ येत होते. राजांचे पहिले लक्ष्य होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री १० वाजता पन्हाळगड सोडल्या पासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते.





आम्ही आता रिंगवाडीच्या अलिकड़े पोचलो होतो. साधारण ११ वाजत आले होते. वाडीच्या बाहेर एका खाचरात मस्त छोटीशी झोपडी उभी केली होती. उन्हाचे बसायला आणि पाखर उडवायला त्याचा उपयोग करत असावेत. एकडे साधनाचा उत्साह उतू जात होता. त्या खाचरात पाय टाकायला ती जरा आधी कचरत होती. पण मग शेवटी उतरली. अनवाणी पायाने त्या बांधा पलीकड़े गेली. सोबत प्रमोद होता. उमेश एकडून ते सगळ शूट करत होताच. आणि मग ती मस्त पैकी तिच्या त्या छोट्याश्या झोपडी वजा फार्महाउस मध्ये पहूडली. शेताच्या ह्या टोकाला आम्ही तिची वाट बघत खात बसलो होतो. आम्हाला दुसरे काय काम. तिकडून तिने एक टेक दयायला १२ रिटेक घेतले. असली धमाल आली म्हणून सांगू. रिंगवाडीच कधी रिंगणवाडी तर कधी कळपवाडी म्हणुन भलतच नाव घ्यायची. ह्या सगळ्या गडबडीत आम्ही चांगलेच मागे पडलो होतो. पुढे गेलेल्या आमच्या पैकी बाकीच्या ट्रेकर्सनी आम्ही रूट चुकू नये म्हणून थोड्या-थोड्या अंतरावर झाडांवर लाल रिबिनी बांधल्या होत्या. त्यामुळे मार्ग काढत काढत आम्ही पुढे जात होतो. पण अखेर एके ठिकाणी चकलोच. लाल रिबिन सुद्धा कुठे दिसेना. आता समोर जायचे की उजवीकड़े खालच्या बाजूला वळायचे ते कळेना. इतक्यात डाव्याबाजुच्या डोंगरावरुन एक हाक आली. 'तुमची माणस उजव्या हाताला गेली हो.' दुरवर डोंगरात एका दगडावर बसुन हाक देणाऱ्या त्या माणसाची फ्रेम घ्यायला उमेश पुढे धावला. कैमरा पूर्ण झूम करून तो टप्यात आला खरा, पण हवी तशी स्टेबल फ्रेम उमेशला मिळत नव्हती. उजव्या बाजूला वाट शोधत पुढे गेलेल्या मंदार कड़े कैमरास्टैंड होता. त्याला मागे बोलवे पर्यंत उशीर झाला असता. म्हणून आता साधना गुढगे टेकून जमिनीवर बसली आणि उमेशने तिच्या डोक्यावर कैमरा धरुन ती फ्रेम स्टेबल केली. तो सिन जबरी होता. मी तो माझ्या 'मेकिंग ऑफ़ डॉक्युमेंटरी' मध्ये कधीच पकडला होता. आता आम्हाला वाट मिळाली होती. पाटेवाडीच्या रस्त्याला लागलो. रस्त्यामध्ये एके ठीकाणी मस्त विहीर लागली. बाजूला छान पैकी सावली. त्यात दुपार होत आलीच होती. थोडावेळ थांबून पेटपूजा करायचे ठरले. विहिरी वरती पंप होता. त्यातून पडणाऱ्या पाण्यात मनसोक्त भिजलो. एकतर २ दिवस पाउस पडला नव्हता. एकदम फ्रेश होउन आम्ही पुन्हा पाटेवाडीच्या मार्गाला लागलो.








हर्षद, अनुजा, मंदार, प्रमोद, मी, उमेश, आणि साधना ...



पाटेवाडी मागे टाकत आता आम्ही सुकामाळकड़े निघालो. मध्ये धनगरवाडीच्या आधी शेतात लावणीपूर्वी जो चिखल तूडवला जातो त्याचे काम सुरु होते. साधना पुन्हा एकदा अनवाणी पायाने त्या चिखलात उतरली. आणि चक्क नांगर धरून बैल हाकायला लागली. कधीकाळची तिची हौस बहुदा तिने भागवून घेतली असावी. त्या चिखलाचा मनसोक्त आनंद तिने घेतला हे मात्र नक्की. मला एकदम जवळ आलेल बघून मात्र ते बैल आपल्या मालकाला सुद्धा न जुमानता धूम पळत लांब गेले. तेंव्हापासून बाकीच्यांनी मला वळू बोलायला सुरवात केली. हा.. हा.. धनगरवाडी पार करून पुढे सरकलो आणि एक मस्त ओहोळ लागला. इतका मस्त की राहून राहून त्यात दुबकी मारायच मन करत होत. शेवटी बैग खाली ठेवली, बूट काढले आणि मनसोक्त डुंबलो. ह्या ठिकाणी बराच वेळ धमाल केली. आता सॉलिड भूक लागली होती. एखादी छानशी जागा बघून पथारी पसरायचे ठरवले. एक मस्त मोकळे मैदान लागले. तिकडे बॅग्स टाकल्या आणि खायला सुरुवात केली. आजुबाजुच्या झाडी मध्ये चरत असलेल्या बकऱ्या आमच्या भोवती जमा व्हायला सुरवात झाली. त्या इतक्या जवळ आल्या होत्या की आमच्या डब्यांमध्ये तोंड घालायच्या बाकी होत्या. आम्हा ७ जणांच्या डाव्या उजव्या बाजूने आत घुसायचा प्रयत्न त्या करत होत्या. आम्ही त्यांना हुसकावत होतो, मी तर अगदी कोपराने धक्का मारत होतो तरी पण काही केल्या त्या जात नव्हत्या. शेवटी आमच्या कडचा एक डबा त्यांना दिला. तेंव्हा कुठे त्या मानल्या. मग निवांतपणे आम्ही आमचा डबा संपवला. आम्हाला अजून बरेच लांब जायचे होते. त्यामुळे मासवडे गावच्या वाटेला लागलो. मासवडे पासून पांढरपाणी तसे जवळ आहे. नंतर रस्ता मोठा होत गेला. बाकीचे ट्रेकर्स सुद्धा भेटले. तिकडे पोचता-पोचता आम्हाला पावसाने गाठलेच. थोड़े भिजत-भिजत आम्ही पांढरपाणीला मुक्कामाला पोचलो. वरच्या बाजूने वाहत येणाऱ्या पांढऱ्या फेसाळ पाण्यामुळे ह्या जागेला अस नाव पडले आहे. पांढरपाणी पर्यंत आता गाड़ी रस्ता झाला आहे.






पन्हाळगड ते पावनखिंड एकुण अंतर आहे ६१ किलोमीटर. तर पन्हाळगड पासून ५५ किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडिच्या ६ किलोमीटर अलिकड़े पांढरपाणी आहे. पांढरपाणीच ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येउन पोचलो होते त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते. धोका वाढत जात होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रुला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोड़खिंडीकड़े निघाले. अवघे २५ जण आता त्या २००० घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते. जास्तीत जास्त वेळ शत्रुला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकड़े सरकायला मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले. त्यात त्या सगळ्या २५ जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकड़े जाउन पोचले होते.




आज आम्ही पावनखिंडित जाणार नव्हतो. आम्ही आमचे सामान लावले. मस्त पैकी जेवलो. ह्या जागेचे वातावरण एकदम भारावलेले होते. आम्हाला कधी एकदा खिंडीमध्ये जातोय असे झाले होते. रात्रीच तिकडे जावे असाही मनात विचार येत होता. साधना आणि अनुजा गुडुप झाल्या होत्या पण मला आणि उमेशला काही झोप येत नव्हती, म्हणून मग आम्ही बाहेर येउन पहाटे १ पर्यंत गप्पा मारत बसलो. हर्षद, मंदार आणि प्रमोद सुद्धा येउन बसले. पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र लख्ख चंद्रप्रकाश पसरला होता. ह्याच ठिकाणी ३४८ वर्षांपूर्वी इतिहास घडला होता. आम्ही सगळे जण सकाळची वाट बघत होतो. उदया सकाळी अखेर आम्ही त्या पावनखिंडित पाउल ठेवणार होतो आणि पाहणार होतो बाजीप्रभुंच्या रक्ताने पावन बनलेली गजापुरची घोडखिंड ...


क्रमशः ...

6 comments:

  1. Apratim !! :) :)
    Pudhche bhag lavkar post kar...mi pan pavankhindit jaychi vaat baghtie :) :P

    ReplyDelete
  2. Apratim! Documentary pahayala milel ka?

    ReplyDelete
  3. i will try to pload it on youtube & link here ... !

    ReplyDelete
  4. रोहन सर मला तुमची लेखनशैली फार आवडली, ह्या दिलेल्या सर्व माहिती बद्दल मी तुमचा खुप आभारी आहे. पण मला ती माहितीपट पहायला मिळेल का?

    ReplyDelete
  5. kharach kupach sundar varnankela sir

    ReplyDelete