Monday 1 February 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - अभिजितच्या मनातून ... !

बरेच महीने झाले 'कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़' या भ्रमंतीवर लिखाण करायचे होते. गेल्या महिन्यात लिखाण पूर्ण केल्यावर आख्या ट्रेक ग्रुपमधून मला प्रतिक्रया आल्या. अभिजितने तर छोटेसे लिखाणच करून त्याच्या मनातल्या आठवणी माझ्यासमोर मांडल्या. त्याचे विचार येथेच ब्लॉगवर पोस्ट करावे असे वाटले म्हणून हां पोस्ट...

"18 यात्री... काही अनुभवी तर काही अगदीच नवखे. मी का गेलो? खरच माहीत नाही. पण ट्रेक संपताना मात्र उत्तर सापडले. कल्याण ते इगतपुरीसाठी ट्रेनमधील तोबा गर्दी. त्यात काकाची बोंबाबोंब. धावपळ आणि धमाल. रोहन, सी.एस.टी.ते इगतपुरी प्रवास डोक्यातून डीलिट झालाय. आठवतच नाही.

राजेश माझ्याच ग्रूप मधे होता आणि तिसरा भिडू, दीप्ती बावा... बाबा.......!


रात्रीचे ते धान्य वाटप तर भयानक. हिमांशू किराणा स्टोर कीपर. वाटणारा राहुल आणि गल्ल्यावर शेफाली. सत्या सूपरवाइज़र. हा हा... झोपेत काय दिले आणि कशात भरले, कोणाचा कोणाला पत्ता नव्हता. नशीब मास्टर लिस्ट होती शेफालीकडे.


ट्रेक सुरू झाला तसे सॅकचे वजन जाणवू लागले. मंदिरापर्यंत पोहचतना धाप लागली. अजुन असेच ५ दिवस... बापरे! आणि चूल पाहून तर ओरडलोच. (अजूनही चुलीशी माझे सख्य नाही). दीप्ती बावा आणि टीमने सर्वात आधी समीट केला. आम्ही पोहचलो तेव्हा ती संतोष आणि अभिषेकबरोबर साखळी खेचण्याची पैज लावण्यात मग्न होती. देवाला नमस्कार केला. एवढ्या दुपारी देखील गार वाटत होते. पहिलाच ट्रेक... तोही सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरावर. इट वॉज अ ग्रेट फीलिंग.


शेंडीपर्यंत ट्रेकदेखील छान होता. काळोखात आम्ही हरवलो की काय म्हणून प्रशांत जाम घाबरला होता. आणि ट्रक राइड तर एकदम झकास. धिंगाणा घातला अगदी. शाळेत उतरलो तेव्हा दमलो होतो पुरे. कवीश आणि प्रवीण इथेच भेटले. ते सी.डी.एस.ची परीक्षा देऊन आले होते. जेवण राहीले बाजूला. झोपून कधी गेलो कळलेच नाही. “काका मात्र झोपला नव्हता. उद्याची स्क्रिप्ट लिहीत बसला होता बहुतेक.”
सकाळीच हिमांशुने लीडरशिप कविशला हॅण्ड ओवर केली. हक्का नुडल्स आणणारी शेफाली किवा राहुलच असणार. खाता खाता पुरेवाट झाली. पार्ले-जी आणि चहा मात्र बेस्ट कॉंबिनेशन. लॉंचमधला प्रवास तर अजूनही आठवतो. हळू-हळू मागे पडणारे कळसुबाई शिखर आणि जवळ येणार रतनगड. स्वप्नवत दुनियेत असल्यासारखे वाटत होते. पण त्यात विरजण पडले. काकाची बाइनाक्युलर गायब. कशी, कुठे, कुणी... सगळे सी.आइ.डी. फंडे वापरुन झाले. शोध मोहिमेत अपयश आले आणि काका आमच्यावर घसरला. सगळयांचे ब्रेन वॉश झाले. रतनगड स्कीप करायचे ठरले.


कात्राबाईच्या खिंडीत मनाली आणि सुमेधाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. हिमांशू ब्लीस्टर पीडीत होता तर शेफालीची पाठ धरली होती. पण काकाला टेंशन वेगळेच होते. रात्रीचे...! रोहनने छान रंगवली आहे ती रात्र. इतक्या गोष्टी घडल्या त्या रात्री... आठवण आली की शहारे येतात. रोहन, राजेशला विचारू, पुन्हा त्या जागी जाता येईल का...? तोच नेऊ शकेल कदाचित...


जाम बोर वाटत होते. दोन दिवस नुसतीच तंगडतोड. त्यात ती कालची रात्र. रोहनचे नॉनस्टॉप खाल्लेले पार्ले-जी आणि काकाच्या अधून-मधून कान पिचक्या. काय करत होतो काय पत्ताच नव्हता. सर्वांशी आता बऱ्यापैकी ओळख झाली होती. त्यामुळे बडबडीत वेळ भराभर जात होता. अंतर मात्र काही कमी होत नव्हते. जेवण पुराण तर विचारू नका. रोहन आणि टीमला शिक्षा भारी झाली. पण या ५ बिलंदरानी ती मजेमजेत पूर्ण निभावली. मंदिरातल्या चहाची एक गंमत सांगतो. हिमांशू खूप दमला होता. बूट भिजल्यामुळे गार पडला होता. त्याच्यासमोर चहा ठेवला. हातात पार्ले-जी दिले. पण त्याला ते खाताच आले नाही. तो चहात बिस्किट बुडवून खाईपर्यंत ते खाली पडायचे. असे तीन वेळा झाले. शेवटी कोणीतरी त्याला अक्षरष: भरवले. हा हा...


गड चढताना माझ्यापुढे मनाली होती. तर सत्या मागे. पण टॉर्च मात्र एकच. सत्या अर्धवट झोपेत माझ्या पावलावर पाऊल टाकत चालत होता. मी आणि मनाली काही बाही बडबडत स्वतःला जागे ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. गडावर जेव्हा पोचलो तेव्हा काहीच दिसत नव्हते. जेवण केले की नाही ठाऊक नाही. गाढ झोपलो हे मात्र खरे.

काकाच्या रागाचा धनी व्हायची आज माझी वेळ होती. त्याचे झाले असे... की गुहेबाहेरच्या दगडावर मी आमच्या कॉलेजची नावे मार्करने लिहिली. काकाने ते पहिले. गडाचे सौंदर्य बिघडवले म्हणून माझी शाळा घेतली आणि मग फर्मान काढले की "जो पर्यंत मी ते लिखाण धुवून साफ करत नाही तो पर्यंत मला गड फेरीला जाता येणार नाही" झाले...! मी लागलो कामाला, स्टीलवूल घेऊन. घासत बसलो एकटाच. बाकी सगळे गेले. प्रवीण आणि आशिष मात्र थांबले माझ्यासाठी. पर्मनॅंट मार्कर असल्यामुळे बराच वेळ गेला. नखातून रक्ता येऊ लागले. पण कोकण कडा बोलावत होता. झाले एकदाचे साफ. काकाचे अप्रूवल घेतले आणि धाव मारली तिघानी कोकणकड्याकडे.

'अप्रतिम' असेच वर्णन करता येईल इतका सुंदर आहे हा कडा. रोहन्या डोळ्यासमोर उभा केलास अगदी तुझ्या ब्लॉगमधून आणि हा ग्रूप फोटो... माझ्या आयुष्यातील "वन ऑफ दि बेस्ट मोमेन्ट" आहे.

परत आल्यानंतर सगळ्यात जास्त वैताग मला आला होता काकाचा नवीन निर्णय ऐकून. एकतर प्रथमच दिवाळीचा पहिला दिवस घरी नसणार होतो. त्यात ती पूर्ण केव धुवून काढायची म्हणजे काय??? पण म्हटले... आलिया भोगासी... पण रागाच्या भरात सामान शिफ्ट करताना ३ वेळा माझे डोके गुहेच्या दारावर आपटले. अजुनच वैतगलो. निषेध करायचा म्हणून गुलाबजामचा त्याग केला. डाळ ढोकळी पण पाण्याबरोबर कशीबशी ढकलली. भयानक दिवस गेला. रात्री मात्र मस्त गप्पा रंगल्या. दिवसभरचा गोंधळ विसरून छान मजा केली.



अभ्यंग स्नान राहीले बाजूला, इथे तर आंघोळ करायचे वांदे होते. सर्वात आधी मी उठलो होतो. काकाने कालच दही भात लावून ठेवला होता सकाळच्या न्याहारीसाठी अणि मलाच दिला चवीसाठी. तो पण अगदी मूठभर. त्याला कोण सांगणार की मला दही मुळीच आवडत नाही. पण पुन्हा... आलिया भोगासी म्हणून खाल्ला. वर सांगून टाकले, छान झालाय. हा हा... बाकीच्यानी मात्र खरेच मेजवानी हाणली.


परतीचा प्रवास. थोडी हूरहुर लागली होती. पण आनंद देखील होत होता. ५ दिवसांच्या सवयीमुळे कोणालाच काही त्रास जाणवत नव्हता. आणि सॅक पण बऱ्यापैकी हलक्या झाल्या होत्या. विहिरीजवळची पॉट पौरी म्हणजे या सगळ्याचा कळस.


"डोंगरात कसल्या सीमा नसतात. मनाला येईल तो वेडेपणा करण्याची मुभा असते."

तिथून निघालो. मनालीशी चांगली मैत्री झाली होती. दोघेच निघालो गप्पा मारत. बराच वेळ बोललो. लंच ते खुबी फाटा. ऑलमोस्ट एक ते दीड तास. खुबी फाट्याला माझा चष्मा गायब. बसमधे कळले, तो मनालीनेच लंपास केला होता. काका एकदम अचंब्यात. त्यात एस.टी.मधे त्याच्या डोक्यावर ठेवलेला स्टोव पडला. तो गार. हा हा... मुरबाड आणि मग कल्याणला पोहचलो. ट्रेनमधे बसल्यानंतर एकदम खिन्न वाटले. ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.....???"

"इथून पुढे काय म्हणतोस... तुझी-माझी दोस्ती आणि आपली सह्यभ्रमंती" ... :)


ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.....???"
अभ्या... इथून पुढे तर सुरू झाली एक कधीही न संपणारी सह्ययात्रा.... :)

खरच रे रोहन, सह्ययात्रा - मनाला वेड लावणारी, ताप कटकटी पासून मुक्त, आयुष्याचे धडे देणारी... अतिशयोक्ती करत नाही. माझ्या आयुष्याचे धडे मी डोंगरातच गिरवले आहेत. ग्रॅजुयेशन पर्यंतच्या १५ वर्षात जे शिकलो नाही ते या एका ट्रेकने शिकवले. ट्रेकच्या आधीचा अभिजीत आणि ट्रेक नंतरचा अभिजीत यात जमीन असमानाचा फरक आहे. ज्या आत्मविश्वासाने आज मी काम करतो तो आत्मविश्वास या ट्रेकनेच आलेला आहे. नेतृत्व तर अगदी अंगात भिनले. जगण्याला खरा अर्थ मिळाला. योग्य आयोजनाचे महत्व पुरे पूर पटले.
नवीन सवंगडी मिळाले. 

जुने सवंगडी अजुन घट्ट झाले. राजेश तर आमचा राजदा ( राजेश दादा ) बनला. मी आणि रोहन... डोंगर वेडे झालो. शेफाली, मनाली, सुमेधा, कविता, हर्षद, प्रशांत, कवीश याना गिर्यारोहनाची गोडी लागली. आशिष, प्रवीण, राहुल, सुरेश तर आज उत्करूष्ट रॉक क्लाइंबर आहेत.

निसर्गाशी बंधिलकी, आपुलकी इथूनच निर्माण झाली. सह्याद्रीची ओळख झाली. नकळत महाराजांशी जवळीक साधता आली. या गड किल्ल्याना पाहून दुर्दम्य इच्छा शक्ति मिळाली. इतिहास फक्त पुस्तकात न रहता आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला.

काकाने जे काही फंडे तिथे शिकवले आहेत ते पदोपदी उपयोगी पडत आहेत. मी तर म्हणेन मॅनेज्मेंटचा एखादा कोर्स करण्यापेक्षा काका बरोबर ट्रेकला जावे. हा हा... काय रोहन? आजही ते मुंबई यूनिवर्सिटी मधून हे काम अविरत करत आहेत. काकाचे आभार मानीत नाही. कारण आपल्यांचे कसले आभार??? पण तरीदेखील "आइ ओ अ लॉट टू धिस मॅन"

बर्‍याच मोहिमा झाल्या कळसुबाई नंतर... अगदी लेह-लडाख देखील. पण या ट्रेकची मजा काही औरच होती. अवीट अशी. एवरग्रीन...
.
.

2 comments:

  1. Abhi ha sahi write up ahe. It took me 30 minutes to read cause every sentence made me laugh. ekdum zhakas... the best

    ReplyDelete
  2. जमतंय की राव तुम्हाला पण लिहायला... :) सुरू कर आता तू पण एक ब्लॉग... :D

    ReplyDelete