Monday 25 May 2009

भाग ९ - सप्त शिवपदस्पर्श ... !

दिवस नववा ... 'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !

आज पहाटे-पहाटे वाघ्याच्या भूंकण्याने जाग आली. पहाटेचे ६ सुद्धा वाजले नव्हते. पण त्याने आम्हाला शेवटी उठवलेच. का भुंकत होता ते काही शेवटपर्यंत कळले नाही. आम्ही उठून आवरून घेतले आणि सूर्योदय बघायला होळीच्या माळावर पोचलो. आजचा सूर्योदय आम्ही राजांच्या साक्षीने बघत होतो. गडावर थोडीफार गर्दी होती. आज आमच्या ट्रेकचा शेवटचा दिवस होता. गेल्या ९ दिवसांची भटकंती आज संपणार होती. कसले फटाफाट दिवस गेले. ही भ्रमंती संपूच नये असे वाटत होते. आम्ही झट-झट आवरून घेतले आणि उर्वरित गड बघायला निघालो. आम्ही आता जाणार होतो राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी. पण त्याआधी डावीकडे खालच्या बाजूला उतरुन कृशावर्त तलावाकडे गेलो. त्याच्या डाव्या बाजूला बरीच पडकी घरे आहेत. दररोज राजदरबार किंवा आसपास ज्यांचे काम असायचे त्यांची घरे ह्या भागात असावीत. अशीच घरे गडाच्या खालच्या दक्षिण भागात सुद्धा आहेत. ते पाहून आम्ही पुन्हा वरती आलो आणि राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो. ह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून ह्यावरती सुद्धा जाता येते. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. आम्ही डाव्याबाजूला असणाऱ्या पायऱ्या चढून वर गेलो. संपूर्ण गडाचे इकडून सुंदर दृश्य दिसते. ते बघून पुन्हा खाली उतरून आलो. नगारखान्यामधून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक. हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले. 'मराठा राजा छत्रपती जाहला'. राजदरबारामधून प्रवेश करते झालो की एक दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे श्री जगदिश्वराचे मंदिर जे वास्तुशात्राला अनुसरून आहे. राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे. मागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान. उजव्या बाजुस आहे देवघर आणि त्या पुढे आहे स्वयंपाकघर. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा खलबतखाना किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ अष्टकोनी स्तंभ. आधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे गंगासागर तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे पालखीचा दरवाजा आणि डावीकड़े आहे मेणा दरवाजा. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला 'राणीवसा' असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला? शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. आम्ही पुन्हा मागे येउन स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरुन गंगासागर तलावाकडे गेलो आणि तिकडून पुन्हा पालखीचा दरवाजा चढून वर आलो. मार्गिका पार कडून मेणा दरवाजा उतरून पलीकडच्या बाजूला आलो. ह्या ठिकाणी आता महाराष्ट्र पर्यटनाची निवासस्थाने झाली आहेत.





राजदरबार आणि राजनिवासस्थान बघून आम्ही परत धर्मशाळेत पोचलो. दुपारचे जेवण बनवून आता गड सोडायचा होता. परतीची तयारी करू लागलो. भांडी लख्ख घासली. बॅग्स व्यवस्थित पॅक केल्या आणि पाठीवर मारल्या. १ वाजत आला होता. आता वेगाने गड उतरु लागलो. आल्या मार्गाने महादरवाजा पार केला आणि दणादण उतरत थेट चित्त दरवाजा गाठला. वाघ्या आमच्या मागे होताच. आता आमचे लक्ष्य होते पाचाडला असणारी मासाहेब जिजामातांची समाधी. खाली उतरलो आणि डांबरी रस्त्याने चालत २ की. मी. दूर असणाऱ्या समाधीपाशी पोचलो. समाधीचे दर्शन घेतले आणि मागे फिरून पुन्हा पाचाडला आलो. आता आम्हाला महाड गाठायचे होते. गाड़ीची वाट बघत आम्ही उभे होतो. इतक्यात अभिने प्रश्न केला,"अरे वाघ्याच काय?" हर्षद बोलला,"त्याच काय?" "अरे गेले ७ दिवस हा आपल्या बरोबर आहे. रस्ते काय शोधून दिले आहेत. जीव गुंतलाय ह्याच्यात माझा. ह्याला असे कसे सोडून जायचे?" अभि बोलला. मी म्हणालो,"अरे पण त्याला घेउन कसे जाणार आपण ट्रेन मधून?" हे सगळ बोलणे होत असताना वाघ्या आमच्या बाजूलाच उभा होता. आमच्याकड़े टकमक बघत होता. इतक्यात एक गाड़ी आली. आम्ही आमच्या बॅग्स वरती टाकल्या आणि गाडीत बसलो. अभ्या बोलला,"घेऊ का रे ह्याला बरोबर?" मी म्हटले,"अभि चल. त्याला दुसरे ट्रेकर्स भेटतील, तो जाईल दुसऱ्या वाटेने परत. त्याची काळजी नको करूस." अभि गाड़ीमध्ये बसला. गाड़ी सुरु झाली आणि महाडच्या दिशेने निघाली. वाघ्या तिथल्यातिथे दूर जाणाऱ्या गाड़ीकड़े बघत उभा होता. त्याची भाषा कळत नसली तरी त्याचे डोळे आम्हाला सगळ काही सांगून गेले. आम्ही त्याला टाकुन परतीच्या वाटेवर निघालो ह्याबद्दल आम्हाला खुपच अपराधीपणाची भावना येत होती. तितकी ती आजही आहे. आमची गाडी दिशेनासी होईपर्यंत तो जागचा हलला नाही. त्याची ती स्तब्ध मूर्ति आम्हाला आजही तितकीच लक्ष्यात आहे. गाडीने महाडला आणि तिकडून माणगावला पोचलो. आता ट्रेनने परतीचा प्रवास सुरु झाला. एक अविस्मरणीय अशी दुर्गभ्रमंती पूर्ण करून आम्ही कृतकृत्य झालो होतो.


'सप्त शिवपदस्पर्श' ह्या ९ दिवसांच्या ट्रेकमध्ये अनेक अनुभव आले. त्याबद्दल मी दहाव्या म्हणजेच शेवटच्या भागात लिहणार आहे.

क्रमश:

3 comments:

  1. waaaa raje tumhi ter best.......

    ReplyDelete
  2. 1 peksha warcha number tula rohan...

    ReplyDelete
  3. Atishay sunder ani mojkya pan perfect shabdat kelele he prawas warnan.........sunder likhana barober Apratim presentation.........hats of to u Rohan.......aj tuzya hya likhanamule maharajanchya gadache wegle rup anubhawayla milale......Dhanyawad!

    ReplyDelete