जस-जसा ट्रेकचा दिवस जवळ येत होता तशी-तशी माझी उत्सुकता वाढत जात होती. आदल्या रात्री तर मी झोपलीच नाही. क्षणा-क्षणाला मिळणाऱ्या आईच्या सूचनांचे पालन करत सामान भरले. ट्रेकच्या दिवशी दुपारी सर्वजण सी.एस.टी.ला जमले. माझी नजर सर्वांकडे फिरत होती. वयाने ३-४ वर्षे मोठे असणाऱ्या ह्या ग्रुपमध्ये आपण फिट बसू का? असा प्रश्न मानत यायला लागला होता. सर्वांशी ओळख करून घेतली. आम्ही एकुण १८ ट्रेकर्स. राहुल, शेफाली, सत्यजित, हिमांशु, अभिजित, मनाली, रोहन, दीप्ती बावा, सुमेधा, आशिष पालांडे, कवीश, प्रवीण, सुरेश नागवेकर, प्रशांत आचरेकर, अभिषेक डोळस, संतोष मोरया, विवेक आणि मी कविता. शिवाय काका, राजेश आणि विली होतेच.कल्याण येईपर्यंत आम्हा सर्वांची ओळख झालेली होती. इकडून पुढे मात्र आम्हाला दुसरी गाडी पकडून इगतपुरीला जायचे होते. जेंट्स डब्यात इतके गर्दी होती की मुलींनी सर्व सामान घेउन लेडिज डब्यात जावे असा सल्ला मिळाला. "काय...५ मुली आणि २० ब्यागा.. काय वेडे झाले की काय हे.. म्हणजे आम्ही हे सामान चढवायच आणि इगतपुरीला उतरवायचे सुद्धा???" हिच माझी पहिली प्रतिक्रया होती. अखेर त्या सर्व सॅक्स घेउन आम्ही लेडिज डब्यात चढलो. आमच्या ५ जणींकडे इतके सामान बघून इतर बायका डोळे विस्फारून बघत होत्या. कुठे वरती, कुठे सीट खालती अश्या सर्व सॅक्स बसवल्या. चांगली ४५ मिं. ही कवायत सुरू होती. आधी त्रास वाटणारा हां प्रकार नंतर मात्र एक टीम एक्टीव्हिती झाला होता. निवांत बसतो न बसतो तसे समोरची एक बाई बोलली,"पोरींनो, इतके सामान घेउन इगतपुरीला उतरायचे कश्या तुम्ही. गाडी २ मिं. थांबेल फ़क्त तिकड़." खरच आम्हाला हच प्रश्न पडला होता. मग आम्ही ५ जणी मिळून ठरवू लागलो की हा टास्क कंप्लीट कसा करायचा आहे. प्लानिंगचा पहिला धडा हा असा मिळाला. शेवटी असे ठरले की २ आणि ३ चे दोन ग्रुप करून, वेगवेगळ्या २ दरवाज्यामधून सामान बाहेर काढायचे. ट्रेन इगतपुरीला नेमकी कधी पोचणार ते माहिती करून घेतली आणि मग आम्ही सर्वचजणी ज़रा निवांत झालो. बसायला तशी जागा नव्हती पण "बाय.. सरख की बासुदे पोरीना थोडावेळ, दमल्या असतील" असे म्हणुन आजुबाजुच्या बायकांनी सरकून बसायला जागा दिली. गप्पा मारत २ तास गेले. पुन्हा ती बाई बोलली,"बाय सामान काढाय घ्या. स्टेशन येइल आता." मग पुन्हा एकदा कवायत सुरू झाली. सर्व जणींनी 'जमेल ना तूला' म्हणुन विचारायचे आणि 'न जमायला काय झाले तू काळजी नको करू' असे म्हणून म्हणून सर्व सामान दाराजवळ आणून ठेवले. अखेर ती २ मिनिटे आली. आम्ही त्या सर्व २० बाग्स बाहेर काढल्याच पण आतमध्ये जाउन पुन्हा एकदा काही राहिले नाही ना याची खात्री सुद्धा केली. सर्जन इगतपुरी बसस्टैंडकडे चालू लागलो. आज रात्र तिकडेच काढायची आहे असे मला कळले. बसस्टैंडवर रहायचे??? तिकडे पोचल्यावर काही मिनिटात हिमांशू आणि राजेशने सर्व सामान उचाकले आणि ग्रुप्स पाडून त्या-त्या ग्रुपच्या हवाली केले. सर्व आटपून झाल्यावर आम्ही जरा पडलो तर कोणाला तरी बाकडाखाली उंदीर दिसला. नशीब तो लगेच गायब झाला. सकाळ झाली तसे आम्ही निघालो. काकाने राहुलला माझ्या बैगमध्ये अजून सामान भरायला सांगितले कारण माझी बैग खुपच लहान आणि हलकी होती. मला धक्काच बसला. पण मी ती बैग घेतली.
कळसुबाईला पोचलो तेंव्हा तिकडे सुंदर दृश्य पसरले होते. ढगांची सावली डोंगरावर पडल्याने मनोहारी चित्र निर्माण झाले होते. आम्ही पुढे जाउन एका मंदिरात थांबलो. चुल कशी बनवतात, कशी पेटवतात हे बघण्याचा हा माझा अगदी पहिलाच अनुभव होता. नाश्ता केला आणि पुढे निघालो. चालायला सुरवात केल्यावर मला बैगचे वजन चांगलेच जाणवू लागले होते. पण नंतर नंतर एकत्र चालता-चालता बोलता-बोलता सवय होऊ लागली. मध्ये एके ठिकाणी मात्र मी पाय घसरून अशी पडले की काय विचारू नका... त्या उभ्या चढाची भीती मनात बसली एकदम. पण अभिजितने माझा हात पकड़त मला 'काही होत नाही. पुढे चल' असे म्हणून सोबत नेले. काका माझ्या मागेच होता. तो सुद्धा मला शांत रहा. घाबरू नकोस असेच सांगत होता. अभिजित त्या वेळेला इतका बारीक होता की एक क्षण तो मला खेचायच्या ऐवजी मीच त्याला खाली खेचेन की काय असे मला वाटले होते. काकाने मग तिथल्या तिथे डोंगरात चढताना आणि उतरताना वजन कसे सांभाळावे ह्याचे एक छोटेसे प्रत्याक्षिकाच दाखवले. मला घेउन तो चक्क धावत खाली उतरु लागला आणि एके ठिकाणी त्याने थांबायचे कसे हे सुद्धा दाखवले. माझी भीती आता नाहीशी झाली होती. अखेर खुप वेळाने आम्ही वरती पोचलो. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरुन दिसणारे ते दृश्य अप्रतिम होते. नजर हटत नव्हती माझी एका क्षणासाठी. तिकडे आम्ही दुपारचे जेवण घेतले आणि मग कुंकवाच्या करंडयाकडे निघालो. डोंगर चढण्यापेक्षा उतरणे सोपे असेल हा समज सुद्धा इकडे दूर झाला. इतक्या वेळा मी पडले की “The whole group came down climbing and Kavita came tumbling after” असे काहीसे मनात आले होते. आम्ही इतरांच्या बरेच मागे पडलो होतो. मी. शेफाली, हिमांशू आणि हर्षद. सोबत काका होता. पण जरासे पुढे असणारे हिमांशू आणि हर्षद रस्ता चुकल्याने काकाच्या नावाने बोंबा मारत होते. अखेर काकाने त्यांना आवाजावरुन शोधले. अखेर त्या ट्रकपाशी जाउन पोचलो. एका दिवसात किती विचित्र घटना घडू शकतात? त्या ट्रकमध्ये आम्ही इकडून तिकडे घरंगळत होतो. एकमेकांच्या अंगावर पडत “एस्सेलवर्ल्डमे रहूंगा मै.. घर नाही जाऊंगा मै.." असे ओरडत होतो. 'ओ भाऊ, जरा हळू चालवा. माझे लग्न नाही झाला आहे अजून." ह्या प्रशांतच्या वाक्यावर आम्ही सर्व फुटलो. शेंडीला पोचलो आणि जेवल्यानंतर गुडुप झालो. रात्रभर कंबर-पाठ दुखत होतीच. दुसऱ्या दिवशी सकाळी नुडल्स बनवण्याचा प्लान फासला आणि आम्ही चहा-बिस्किट्स खाऊन तसेच पुढे निघालो.
भंडारदरा धरण पार करत रतनवाडीला पोचलो आणि उशीर झाल्याने काकाने रतनगड़ला जाणे रद्द केले. आता आम्ही थेट कात्राबईच्या खिंडीकडे निघालो. आणि तिथे पोहचेपर्यंत देखील उशीर झाल्याने आम्ही जंगलात राहायचा निर्णय घेतला. सही ना...!!! अंधार पड़ता पड़ता चुल आणि कैंप फायर पेटवल्या आणि गप्पा मारत बसलो. तिकडे जेवणाची तयारी सुरू होती. सर्वजण बोलत होते पण मी मात्र गप्प होते. अचानक माझे लक्ष्य वरती आकाशाकडे गेले. संपूर्ण आकाशात अनेक तारे लुकलुकत होते. जणू काही एकमेकांशी बोलत होते ते. तो एक क्षण मला सर्वांसोबत जोडून गेला. मग मी सुद्धा बोलायला लागले सर्वांबरोबर. नंतर तर सर्वांच्या मधोमध असुनही माझे लक्ष्य आकाशाकडेच होते. लहानपणापासून जी गोष्ट कराविशी वाटत होती ते आज मला करायला मिळत होते. झोप कधी लागले ते सुद्धा कळले नाही. नंतर मात्र अंगात अशी थंडी भरली की मला बोलवेना. अखेर काकाने मला ईलेक्त्राल दिल्याने अंगातली थंडी गेली.
.
.