Friday, 6 March 2009

भाग २ - पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड ... !


दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच उठलो. करपेवाडी काल रात्रीच्या अंधारात नीट पहिलीच नव्हती. छोटी-छोटी कौलारू घरे, आवारात दाणे टिपत फिरणाऱ्या कोंबडया, सगळच कस एकदम मस्त वाटत होत. आम्ही सर्वात महत्त्वाचा असा नाश्ता आटोपला आणि फटाफट सामान आवरले. एकडे आम्ही काही वह्या आणि कपडे वाटप केले. ऐतिहासिक मोहिमेसोबत भरारी संस्था याठिकाणी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपते. आम्ही आता कूच करण्यास तयार झालो होतो. काल खुपच मागे पडल्याने आम्हाला आता सर्वात पुढे राहा असे सांगितले होते. शिवाय साधनाला त्यामुळे इतर काही ट्रेकर्सचे बाइट्स पण घेता येणार होते. आमचा आजचा मार्ग होत करपेवाडी ते पांढरपाणी. एकुण अंतर होते २७ किलोमीटर. करपेवाडी सोडल्यानंतर बराच वेळ ट्रेक रूट जंगलातून जात होता. मध्येच एखादी लागवडी खालची जमिन लागायची. आसपासचे शॉट्स घेण्यात आम्ही पुन्हा मागे पडलो होतो. बाकी सगळे बरेच पुढे निघून गेले होते. रस्ता एकदम मस्त होता. कधी शेतातून, तर कधी जंगलातून, कधी दगडांमधून, तर कधी एकदम मोकळे मैदान. आम्ही वाट चालतच होतो. मध्ये मध्ये छोट्या-छोट्या वाडया आणि पाडे लागत होते. ह्या भागात पाउस अजून म्हणावा तितका झालेला नव्हता. असलेले पाणी अडवून छोट्या-छोट्या खाचरांमध्ये भात शेती सुरु होती. काही ठिकाणी पिक पाण्याअभावी करपले होते तर काही ठिकाणी जमिन सुकून काळीठिक्कर पडली होती. पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा इथल्या लोकांना लांब जावे लागायचे.





त्यावेळेला महाराजांनी मात्र म्हसाईंपठार ते पांढरपाणी ह्या मार्गात लागणारी गावे आणि वाडया सोडून रस्ता पकडला होता. जेणेकरून त्यांचा माग कमीतकमी लोकांना लागो, शिवाय मागून येणाऱ्या सिद्दीमसूदच्या फौजेकरून त्यांना उपद्रव नको म्हणून सुद्धा. त्यावेळेला इतक्या वाडया आणि गावे नव्हती म्हणा. आसपासची झाडी आणि जंगलसुद्धा निश्चितच दाट असेल. सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता. अर्थात घोड़खिंडीच्या अलिकड़े राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल. त्यांच्या थोड़े मागून आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ येत होते. राजांचे पहिले लक्ष्य होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री १० वाजता पन्हाळगड सोडल्या पासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते.





आम्ही आता रिंगवाडीच्या अलिकड़े पोचलो होतो. साधारण ११ वाजत आले होते. वाडीच्या बाहेर एका खाचरात मस्त छोटीशी झोपडी उभी केली होती. उन्हाचे बसायला आणि पाखर उडवायला त्याचा उपयोग करत असावेत. एकडे साधनाचा उत्साह उतू जात होता. त्या खाचरात पाय टाकायला ती जरा आधी कचरत होती. पण मग शेवटी उतरली. अनवाणी पायाने त्या बांधा पलीकड़े गेली. सोबत प्रमोद होता. उमेश एकडून ते सगळ शूट करत होताच. आणि मग ती मस्त पैकी तिच्या त्या छोट्याश्या झोपडी वजा फार्महाउस मध्ये पहूडली. शेताच्या ह्या टोकाला आम्ही तिची वाट बघत खात बसलो होतो. आम्हाला दुसरे काय काम. तिकडून तिने एक टेक दयायला १२ रिटेक घेतले. असली धमाल आली म्हणून सांगू. रिंगवाडीच कधी रिंगणवाडी तर कधी कळपवाडी म्हणुन भलतच नाव घ्यायची. ह्या सगळ्या गडबडीत आम्ही चांगलेच मागे पडलो होतो. पुढे गेलेल्या आमच्या पैकी बाकीच्या ट्रेकर्सनी आम्ही रूट चुकू नये म्हणून थोड्या-थोड्या अंतरावर झाडांवर लाल रिबिनी बांधल्या होत्या. त्यामुळे मार्ग काढत काढत आम्ही पुढे जात होतो. पण अखेर एके ठिकाणी चकलोच. लाल रिबिन सुद्धा कुठे दिसेना. आता समोर जायचे की उजवीकड़े खालच्या बाजूला वळायचे ते कळेना. इतक्यात डाव्याबाजुच्या डोंगरावरुन एक हाक आली. 'तुमची माणस उजव्या हाताला गेली हो.' दुरवर डोंगरात एका दगडावर बसुन हाक देणाऱ्या त्या माणसाची फ्रेम घ्यायला उमेश पुढे धावला. कैमरा पूर्ण झूम करून तो टप्यात आला खरा, पण हवी तशी स्टेबल फ्रेम उमेशला मिळत नव्हती. उजव्या बाजूला वाट शोधत पुढे गेलेल्या मंदार कड़े कैमरास्टैंड होता. त्याला मागे बोलवे पर्यंत उशीर झाला असता. म्हणून आता साधना गुढगे टेकून जमिनीवर बसली आणि उमेशने तिच्या डोक्यावर कैमरा धरुन ती फ्रेम स्टेबल केली. तो सिन जबरी होता. मी तो माझ्या 'मेकिंग ऑफ़ डॉक्युमेंटरी' मध्ये कधीच पकडला होता. आता आम्हाला वाट मिळाली होती. पाटेवाडीच्या रस्त्याला लागलो. रस्त्यामध्ये एके ठीकाणी मस्त विहीर लागली. बाजूला छान पैकी सावली. त्यात दुपार होत आलीच होती. थोडावेळ थांबून पेटपूजा करायचे ठरले. विहिरी वरती पंप होता. त्यातून पडणाऱ्या पाण्यात मनसोक्त भिजलो. एकतर २ दिवस पाउस पडला नव्हता. एकदम फ्रेश होउन आम्ही पुन्हा पाटेवाडीच्या मार्गाला लागलो.








हर्षद, अनुजा, मंदार, प्रमोद, मी, उमेश, आणि साधना ...



पाटेवाडी मागे टाकत आता आम्ही सुकामाळकड़े निघालो. मध्ये धनगरवाडीच्या आधी शेतात लावणीपूर्वी जो चिखल तूडवला जातो त्याचे काम सुरु होते. साधना पुन्हा एकदा अनवाणी पायाने त्या चिखलात उतरली. आणि चक्क नांगर धरून बैल हाकायला लागली. कधीकाळची तिची हौस बहुदा तिने भागवून घेतली असावी. त्या चिखलाचा मनसोक्त आनंद तिने घेतला हे मात्र नक्की. मला एकदम जवळ आलेल बघून मात्र ते बैल आपल्या मालकाला सुद्धा न जुमानता धूम पळत लांब गेले. तेंव्हापासून बाकीच्यांनी मला वळू बोलायला सुरवात केली. हा.. हा.. धनगरवाडी पार करून पुढे सरकलो आणि एक मस्त ओहोळ लागला. इतका मस्त की राहून राहून त्यात दुबकी मारायच मन करत होत. शेवटी बैग खाली ठेवली, बूट काढले आणि मनसोक्त डुंबलो. ह्या ठिकाणी बराच वेळ धमाल केली. आता सॉलिड भूक लागली होती. एखादी छानशी जागा बघून पथारी पसरायचे ठरवले. एक मस्त मोकळे मैदान लागले. तिकडे बॅग्स टाकल्या आणि खायला सुरुवात केली. आजुबाजुच्या झाडी मध्ये चरत असलेल्या बकऱ्या आमच्या भोवती जमा व्हायला सुरवात झाली. त्या इतक्या जवळ आल्या होत्या की आमच्या डब्यांमध्ये तोंड घालायच्या बाकी होत्या. आम्हा ७ जणांच्या डाव्या उजव्या बाजूने आत घुसायचा प्रयत्न त्या करत होत्या. आम्ही त्यांना हुसकावत होतो, मी तर अगदी कोपराने धक्का मारत होतो तरी पण काही केल्या त्या जात नव्हत्या. शेवटी आमच्या कडचा एक डबा त्यांना दिला. तेंव्हा कुठे त्या मानल्या. मग निवांतपणे आम्ही आमचा डबा संपवला. आम्हाला अजून बरेच लांब जायचे होते. त्यामुळे मासवडे गावच्या वाटेला लागलो. मासवडे पासून पांढरपाणी तसे जवळ आहे. नंतर रस्ता मोठा होत गेला. बाकीचे ट्रेकर्स सुद्धा भेटले. तिकडे पोचता-पोचता आम्हाला पावसाने गाठलेच. थोड़े भिजत-भिजत आम्ही पांढरपाणीला मुक्कामाला पोचलो. वरच्या बाजूने वाहत येणाऱ्या पांढऱ्या फेसाळ पाण्यामुळे ह्या जागेला अस नाव पडले आहे. पांढरपाणी पर्यंत आता गाड़ी रस्ता झाला आहे.






पन्हाळगड ते पावनखिंड एकुण अंतर आहे ६१ किलोमीटर. तर पन्हाळगड पासून ५५ किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडिच्या ६ किलोमीटर अलिकड़े पांढरपाणी आहे. पांढरपाणीच ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येउन पोचलो होते त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते. धोका वाढत जात होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रुला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोड़खिंडीकड़े निघाले. अवघे २५ जण आता त्या २००० घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते. जास्तीत जास्त वेळ शत्रुला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकड़े सरकायला मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले. त्यात त्या सगळ्या २५ जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकड़े जाउन पोचले होते.




आज आम्ही पावनखिंडित जाणार नव्हतो. आम्ही आमचे सामान लावले. मस्त पैकी जेवलो. ह्या जागेचे वातावरण एकदम भारावलेले होते. आम्हाला कधी एकदा खिंडीमध्ये जातोय असे झाले होते. रात्रीच तिकडे जावे असाही मनात विचार येत होता. साधना आणि अनुजा गुडुप झाल्या होत्या पण मला आणि उमेशला काही झोप येत नव्हती, म्हणून मग आम्ही बाहेर येउन पहाटे १ पर्यंत गप्पा मारत बसलो. हर्षद, मंदार आणि प्रमोद सुद्धा येउन बसले. पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र लख्ख चंद्रप्रकाश पसरला होता. ह्याच ठिकाणी ३४८ वर्षांपूर्वी इतिहास घडला होता. आम्ही सगळे जण सकाळची वाट बघत होतो. उदया सकाळी अखेर आम्ही त्या पावनखिंडित पाउल ठेवणार होतो आणि पाहणार होतो बाजीप्रभुंच्या रक्ताने पावन बनलेली गजापुरची घोडखिंड ...


क्रमशः ...

भाग १ - पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड ... !

१९ जुलै २००८ ला म्हणजेच गेल्या वर्षी गुरूपौर्णिमेला मी, साधना, अनुजा, प्रमोद, हर्षद, मंदार आणि उमेश असे ७ जण 'पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड' मोहीमेवर गेलो होतो. मुंबई मधील 'भरारी' ही संस्था दरवर्षी गुरूपौर्णिमेला हि मोहिम आयोजित करते. गुरूपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. आम्ही हे अंतर पार करायला ३ दिवस घेणार होतो. ह्या मोहिमेत प्रत्येक ठिकाणी थांबत-थांबत आप्पा परब यांच्यासारख्या अनुभवी व जाणकार इतिहासतज्ञांसोबत त्या जागेचा शिवस्पर्श आम्ही ३ दिवस अनुभवणार होतो.




जूनच्या महिन्यात एक दिवस मी आणि साधना बोलत होतो. साधना 'IBN - लोकमत' मध्ये रिपोर्टर आहे. तर उमेश कैमरामैन. साधनाला एखादया 'ट्रेक रूट' वर डॉक्युमेंटरी बनवायची होती. माझ्या डोक्यात त्याच वेळेला पावनखिंडित जायचे सुरु होते. मी म्हटल का नाही त्यावरच डॉक्युमेंटरी बनवावी. साधनाला सुद्धा कल्पना आवडली. नुसता ट्रेक रूट नाही तर एक जाज्वल्य इतिहास आता पुन्हा उभा करायचा होता. तिने आवश्यक हालचाल सुरु केली आणि भरारी ट्रेकर्सना जाउन भेटली. ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावी म्हणून अगदी आप्पांना सुद्धा जाउन भेटली. सगळी तयारी झाली. अखेर तो दिवस आला. आम्ही सगळे मुंबईहून पन्हाळ्याला पोचलो.



पन्हाळगड़ .......... काय वर्णावे ... दिंडी दरवाजे .. महाकाय प्रवेशद्वारे .. अवाढव्य तोफा .. इथल्या मातीच्या कणाकणात शौर्याच्या इतिहासाची गाथा. शुरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड़. रयतेच्या राजासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या नरविरांचा गड़. आमची मोहिम पन्हाळ्यावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करून सुरू झाली. दोन हातात दोन समशेरी घेतलेल्या ह्या पुतळ्याकडे बघून अभिमानाने उर भरून येतो. तेथून आम्ही निघालो ते राजदिंडीमार्गे म्हसाईँ पठाराच्या दिशेने पन्हाळा उतरु लागलो. ज्यावाटेने राजांची पावले धावली, ज्यावाटेने त्यांची पालखी गेली त्या मार्गावरुनच आम्ही जात होतो. आम्ही एकुण १४० जण ह्या मोहिमेवर निघालो होतो. असंख्य प्रश्न मनात होते आणि आप्पा त्या सर्वांची उत्तरे देत होते. आम्हाला भुतकाळात घेउन जात होते.





१० नोवेंबर १६५९ रोजी अफझलखानाचा वध करून शिवरायांनी कोल्हापुर पर्यंत धडक मारली आणि २८ नोवेंबर रोजी पन्हाळा काबीज केला. आदिलशाही हादरली. आदिलशाहाने रुस्तम-इ-झमान च्या हाताखाली ताज्या दमाची फौज पाठवली. त्याच्यासोबत अफझलखानाचा मुलगा फाझल खान आणि इतर सरदार होते. ह्या लढाईमध्ये आदिलशाहीचा पुन्हा धूव्वा उडाला. मराठ्यांनी अथणी-बेळगाव पर्यंत धाडी घालून पुढे मीरझेच्या किल्ल्याला वेढा घातला. आता मात्र आदिलशाहीने सिद्दी जोहरला १५०००-२०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळ देऊन शिवरायांच्या मागावर पाठवले. आपल्या लढण्याच्या पध्द्ती प्रमाणे महाराज स्वराज्याच्या सीमेवर म्हणजेच पन्हाळ्यावर येउन थांबले. सिद्दी जोहरने मार्च मध्ये पन्हाळ्याला वेढा घातला. जो ६ महीने सुरु होता. शिवराय आत अडकून पडले होते. तिकडे शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात येउन बसला होता. स्वराज्य दुहेरी संकटात होते. अखेर राजांनी वेढ्यातून निसटायचा निर्णय घेतला. हिरडस मावळातल्या बांदलांचा जमाव ह्यासाठी राजांनी निवडला. गरज पडल्यास निकराची झुंज देउ शकतील असे ६०० जण निवडले गेले. शिवाय पालखीसाठी भोई सुद्धा खासे निवडले गेले. दूसरीकड़े सिद्दी जोहरला शरणागतीचा खलिता पाठवून आम्ही तह करायला गडाखाली येत आहोत असे राजांनी भासवले. २ पालख्या तयार झाल्या. एकात राजे बसले तर एका पालखीमध्ये राजांसारखा हुबेहुब दिसणारा शिवा काशिद बसला. आता राजांची पालखी राजदिंडीमार्गे म्हसाईं पठाराच्या दिशेने तर शिवा काशिदची पालखी मलकापूरच्या दिशेने पळवली गेली.



पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली. 'शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे' अश्या खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून शिवा काशिद नावाचा दुसराच कोणी तरी आहे. राजे आपल्या हातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाझल खानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ... शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. 'चला गनीम पाठीवर आहे.' दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता.



शिवराय पन्हाळ्यावरुन निघाले तेंव्हा रात्रीचे १० वाजले होते. आम्ही मात्र सकाळच्या उजेडात म्हसाईं पठाराच्या दिशेने निघालो होतो. पहिल्या दिवशी आमचा टप्पा होता पन्हाळगड़ - म्हसाईं पठार ते करपेवाडी. एकुण अंतर २८ किलोमीटर. सपाट रस्ता असल्याने इतका काही जाणवल नाही. शिवाय जुलै महिना असल्याने पठारावर सर्वत्र लूसलूशित गवत आणि पावसाळी वातावरण होते. उमेश आणि साधना पाउस पडू नये म्हणून प्रार्थना करत होते, नाहीतर उमेशला कैमरा आत ठेवावा लागणार होता. तस मंदार उमेश बरोबर छत्री घेउन सोबत होताच. प्रमोद कधी साधना बरोबर तर कधी उमेश बरोबर कैमराटेप्स आणि ब्याटरिस घेउन पळापळ करत होता. मी आणि अनुजा मात्र हे सगळ निवांतपणे बघत होतो आणि माझ्या कैमरा मध्ये पकडत होतो. मध्येच जोराचा वारा असा सुटायचा की उडून जाऊ की काय असे वाटायचे. साधना आणि उमेशची जास्तीत जास्त आणि परफेक्ट फ्रेम्स घ्यायची कवायत सुरु होती. एक तर स्क्रिप्ट तयार नव्हती. आम्ही सगळे डायलोंग तिथल्यातिथे बनवून तयार करत होतो. त्यामुळे साधना एका टेक साठी सारखे रिटेक्स घेत होती. त्यात मंदार तिला खुपच ऐतिहासिक भाषेत जड़ वाक्य सांगत होता; तर मी आणि हर्षद ती सोपी करायचा पर्यंत करत होतो. सवय नसल्याने ती चूकायची आणि उमेश तिला अजून एकदा टेक .. अजून एकदा टेक .. अस सारख सांगायचा. हे सगळे टेक सुरु असताना अखेर आम्ही जामिनीवर टेका - टेकी करायचो. हा.. हा.. आणि खायला सुरु करायचो. कारण परफेक्ट टेक दिल्याशिवाय साधना काही अखेर पर्यंत हटायची नाही. पण त्यामुळे आम्हाला पुढे जायला मात्र उशीर व्हायचा. शेवटी भरारीचे २ जण आमच्या सोबत मागे थांबले. आम्ही कुठे रास्ता चुकू नये म्हणुन. खर तर आम्हाला लवकरात लवकर पुढे आणन्यासाठी त्यांना नेमल गेल होत. पण कसल काय .. आम्हीच त्यांना मागे थांबवले. ते पण हे सगळ एन्जॉय करत होते. साधना आणि उमेश ह्या सगळया गडबडीत बऱ्याच वेळा मागे रहायचे पण मग फटाफट पुढे पळायचे. उमेशने तर कमालच केली. पाठीवर स्वतःची बैग, पुढे कैमरा बैग आणि हातात कैमरा घेउन हा पठया सर्वात पुढे पळायचा आणि मग ट्रेकर्सचे व आजू बाजूचे शॉट्स घेत मागे मागे यायचा. हे सगळा करताना धाप लागली तरी त्याची कैमराफ्रेम काही हलायची नाही.






म्हसाईं पठार हे ७ पठारांची मालिका आहे. त्यातल्या सहाव्या पठारावर म्हसाईं आईचे मंदिर आहे. आम्ही ९ किलोमीटर अंतर पार करुन मंदिरापाशी पोचलो. आम्हाला पोचायला बराच उशीर झाला होता. म्हसाईं आईचे दर्शन घेतले. थोडी पेटपूजा आटोपली आणि थोड पुढे जाउन ६व्या पठारावरुन खाली उतरायला सूरवात केली. पठार उतरून खाली आलो. तिकडे एक मस्त विहिर लागली. त्याठिकाणी निवांतपणे आमचा लेट लंच उरकला. अंधार पड़ायच्या आत आम्हाला करपेवाडीला पोचायचे होते. मध्ये रस्त्यात खोतवाड़ी लागली. गावाच्या बाहेर शेतीची बारीक-सारिक कामे सुरु होती. अजून पाउस पडला नसल्याने पेरणीची कामे खोळंबली होती. गावामधली शाळा नुकतीच सुटली होती. ती लहान मुले आम्हाला बघून आश्चर्य चकित होत होती. आधी थोड बुजलेल्या मुलांनी नंतर मात्र आम्हाला घोळका घातला. त्यातल्या काही मुलांनी आम्हाला 'पंख मला जर असते तर' ही कविता म्हणून दाखवली. ती ऐकून आम्हाला असे वाटले की इतक्या कठिण परिस्थितीमध्ये राहून सुद्धा लहान लहान गोष्टिंचा आनंद ती कशी बरोबर घेत असतात. आपण खरच त्यांना पंख देऊ शकतो का ??? अस प्रश्न सुद्धा आम्हाला पडला नसता तर नवल. तिकडे काही वेळ आम्ही थांबलो. ग्रामजीवनाचे फोटो काढले. उमेश आणि साधना ला तर मस्तच शॉट्स मिळाले. ते दोघे डॉक्युमेंटरी बनवत होते तर मी 'मेकिंग ऑफ़ डॉक्युमेंटरी' बनवत होतो. अर्थात मी त्या दोघांचे शूटिंग करत होतो आणि फोटो काढत होतो. अखेर संध्याकाळी ६ च्या आसपास आम्ही आमच्या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाला म्हणजेच करपेवाडीला येउन पोचलो. चालून जाम दमलो होतो. साधनाने हातात जरीपटक्याचा झेंडा घेतला आणि दिवसाचा क्लोसिंग शोंट दिला. त्यानंतर आम्हाला कळले की ती करपेवाडी नव्हतीच. करपेवाडी अजून १ तास पुढे होती. मग आम्ही पुन्हा आपले चालायला सुरवात केली. आता पूर्ण अंधार पडला होता. भरारीचे काहीजण आम्हाला शोधत मागे आले होते. अखेर करपेवाडीला पोचलो. बाकी सगळे कधीच पोचून सामान लावन निवांत बसले होते. आम्ही सुद्धा गावातल्या एका घरात सामान टाकले आणि मस्त गप्पा टाकत बसलो. आप्पांसोबत काही वेळ संवाद साधला. रात्री ८ च्या सुमारास जेवलो आणि घराबाहेर परत गप्पा मारत बसलो. थोडयावेळाने दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकबद्दल विचार करत झोपी गेलो .. आम्ही आता पावनखिंड कधी बघतोय असे झाले होते ...



क्रमशः ...