
१९ जुलै २००८ ला म्हणजेच गेल्या वर्षी गुरूपौर्णिमेला मी, साधना, अनुजा, प्रमोद, हर्षद, मंदार आणि उमेश असे ७ जण
'पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड' मोहीमेवर गेलो होतो. मुंबई मधील 'भरारी' ही संस्था दरवर्षी गुरूपौर्णिमेला हि मोहिम आयोजित करते. गुरूपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. आम्ही हे अंतर पार करायला ३ दिवस घेणार होतो. ह्या मोहिमेत प्रत्येक ठिकाणी थांबत-थांबत आप्पा परब यांच्यासारख्या अनुभवी व जाणकार इतिहासतज्ञांसोबत त्या जागेचा शिवस्पर्श आम्ही ३ दिवस अनुभवणार होतो.
जूनच्या महिन्यात एक दिवस मी आणि साधना बोलत होतो. साधना 'IBN - लोकमत' मध्ये रिपोर्टर आहे. तर उमेश कैमरामैन. साधनाला एखादया 'ट्रेक रूट' वर डॉक्युमेंटरी बनवायची होती. माझ्या डोक्यात त्याच वेळेला पावनखिंडित जायचे सुरु होते. मी म्हटल का नाही त्यावरच डॉक्युमेंटरी बनवावी. साधनाला सुद्धा कल्पना आवडली. नुसता ट्रेक रूट नाही तर एक जाज्वल्य इतिहास आता पुन्हा उभा करायचा होता. तिने आवश्यक हालचाल सुरु केली आणि भरारी ट्रेकर्सना जाउन भेटली. ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावी म्हणून अगदी आप्पांना सुद्धा जाउन भेटली. सगळी तयारी झाली. अखेर तो दिवस आला. आम्ही सगळे मुंबईहून पन्हाळ्याला पोचलो.
पन्हाळगड़ .......... काय वर्णावे ... दिंडी दरवाजे .. महाकाय प्रवेशद्वारे .. अवाढव्य तोफा .. इथल्या मातीच्या कणाकणात शौर्याच्या इतिहासाची गाथा. शुरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड़. रयतेच्या राजासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या नरविरांचा गड़. आमची मोहिम पन्हाळ्यावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करून सुरू झाली. दोन हातात दोन समशेरी घेतलेल्या ह्या पुतळ्याकडे बघून अभिमानाने उर भरून येतो. तेथून आम्ही निघालो ते राजदिंडीमार्गे म्हसाईँ पठाराच्या दिशेने पन्हाळा उतरु लागलो. ज्यावाटेने राजांची पावले धावली, ज्यावाटेने त्यांची पालखी गेली त्या मार्गावरुनच आम्ही जात होतो. आम्ही एकुण १४० जण ह्या मोहिमेवर निघालो होतो. असंख्य प्रश्न मनात होते आणि आप्पा त्या सर्वांची उत्तरे देत होते. आम्हाला भुतकाळात घेउन जात होते.
१० नोवेंबर १६५९ रोजी अफझलखानाचा वध करून शिवरायांनी कोल्हापुर पर्यंत धडक मारली आणि २८ नोवेंबर रोजी पन्हाळा काबीज केला. आदिलशाही हादरली. आदिलशाहाने रुस्तम-इ-झमान च्या हाताखाली ताज्या दमाची फौज पाठवली. त्याच्यासोबत अफझलखानाचा मुलगा फाझल खान आणि इतर सरदार होते. ह्या लढाईमध्ये आदिलशाहीचा पुन्हा धूव्वा उडाला. मराठ्यांनी अथणी-बेळगाव पर्यंत धाडी घालून पुढे मीरझेच्या किल्ल्याला वेढा घातला. आता मात्र आदिलशाहीने सिद्दी जोहरला १५०००-२०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळ देऊन शिवरायांच्या मागावर पाठवले. आपल्या लढण्याच्या पध्द्ती प्रमाणे महाराज स्वराज्याच्या सीमेवर म्हणजेच पन्हाळ्यावर येउन थांबले. सिद्दी जोहरने मार्च मध्ये पन्हाळ्याला वेढा घातला. जो ६ महीने सुरु होता. शिवराय आत अडकून पडले होते. तिकडे शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात येउन बसला होता. स्वराज्य दुहेरी संकटात होते. अखेर राजांनी वेढ्यातून निसटायचा निर्णय घेतला. हिरडस मावळातल्या बांदलांचा जमाव ह्यासाठी राजांनी निवडला. गरज पडल्यास निकराची झुंज देउ शकतील असे ६०० जण निवडले गेले. शिवाय पालखीसाठी भोई सुद्धा खासे निवडले गेले. दूसरीकड़े सिद्दी जोहरला शरणागतीचा खलिता पाठवून आम्ही तह करायला गडाखाली येत आहोत असे राजांनी भासवले. २ पालख्या तयार झाल्या. एकात राजे बसले तर एका पालखीमध्ये राजांसारखा हुबेहुब दिसणारा शिवा काशिद बसला. आता राजांची पालखी राजदिंडीमार्गे म्हसाईं पठाराच्या दिशेने तर शिवा काशिदची पालखी मलकापूरच्या दिशेने पळवली गेली.

पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली. 'शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे' अश्या खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून
शिवा काशिद नावाचा दुसराच कोणी तरी आहे. राजे आपल्या हातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाझल खानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ... शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. 'चला गनीम पाठीवर आहे.' दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता.

शिवराय पन्हाळ्यावरुन निघाले तेंव्हा रात्रीचे १० वाजले होते. आम्ही मात्र सकाळच्या उजेडात म्हसाईं पठाराच्या दिशेने निघालो होतो. पहिल्या दिवशी आमचा टप्पा होता पन्हाळगड़ - म्हसाईं पठार ते करपेवाडी. एकुण अंतर २८ किलोमीटर. सपाट रस्ता असल्याने इतका काही जाणवल नाही. शिवाय जुलै महिना असल्याने पठारावर सर्वत्र लूसलूशित गवत आणि पावसाळी वातावरण होते. उमेश आणि साधना पाउस पडू नये म्हणून प्रार्थना करत होते, नाहीतर उमेशला कैमरा आत ठेवावा लागणार होता. तस मंदार उमेश बरोबर छत्री घेउन सोबत होताच. प्रमोद कधी साधना बरोबर तर कधी उमेश बरोबर कैमराटेप्स आणि ब्याटरिस घेउन पळापळ करत होता. मी आणि अनुजा मात्र हे सगळ निवांतपणे बघत होतो आणि माझ्या कैमरा मध्ये पकडत होतो. मध्येच जोराचा वारा असा सुटायचा की उडून जाऊ की काय असे वाटायचे. साधना आणि उमेशची जास्तीत जास्त आणि परफेक्ट फ्रेम्स घ्यायची कवायत सुरु होती. एक तर स्क्रिप्ट तयार नव्हती. आम्ही सगळे डायलोंग तिथल्यातिथे बनवून तयार करत होतो. त्यामुळे साधना एका टेक साठी सारखे रिटेक्स घेत होती. त्यात मंदार तिला खुपच ऐतिहासिक भाषेत जड़ वाक्य सांगत होता; तर मी आणि हर्षद ती सोपी करायचा पर्यंत करत होतो. सवय नसल्याने ती चूकायची आणि उमेश तिला अजून एकदा टेक .. अजून एकदा टेक .. अस सारख सांगायचा. हे सगळे टेक सुरु असताना अखेर आम्ही जामिनीवर टेका - टेकी करायचो. हा.. हा.. आणि खायला सुरु करायचो. कारण परफेक्ट टेक दिल्याशिवाय साधना काही अखेर पर्यंत हटायची नाही. पण त्यामुळे आम्हाला पुढे जायला मात्र उशीर व्हायचा. शेवटी भरारीचे २ जण आमच्या सोबत मागे थांबले. आम्ही कुठे रास्ता चुकू नये म्हणु

न. खर तर आम्हाला लवकरात लवकर पुढे आणन्यासाठी त्यांना नेमल गेल होत. पण कसल काय .. आम्हीच त्यांना मागे थांबवले. ते पण हे सगळ एन्जॉय करत होते. साधना आणि उमेश ह्या सगळया गडबडीत बऱ्याच वेळा मागे रहायचे पण मग फटाफट पुढे पळायचे. उमेशने तर कमालच केली. पाठीवर स्वतःची बैग, पुढे कैमरा बैग आणि हातात कैमरा घेउन हा पठया सर्वात पुढे पळायचा आणि मग ट्रेकर्सचे व आजू बाजूचे शॉट्स घेत मागे मागे यायचा. हे सगळा करताना धाप लागली तरी त्याची कैमराफ्रेम काही हलायची नाही.

म्हसाईं पठार हे ७ पठारांची मालिका आहे. त्यातल्या सहाव्या पठारावर म्हसाईं आईचे मंदिर आहे. आम्ही ९ किलोमीटर अंतर पार करुन मंदिरापाशी पोचलो. आम्हाला पोचायला बराच उशीर झाला होता. म्हसाईं आईचे दर्शन घेतले. थोडी पेटपूजा आटोपली आणि थोड पुढे जाउन ६व्या पठारावरुन खाली उतरायला सूरवात केली. पठार उतरून खाली आलो. तिकडे एक मस्त विहिर लागली. त्याठिकाणी निवांतपणे आमचा लेट लंच उरकला. अंधार पड़ायच्या आत आम्हाला करपेवाडीला पोचायचे होते. मध्ये रस्त्यात खोतवाड़ी लागली. गावाच्या बाहेर शेतीची बारीक-सारिक कामे सुरु होती. अजून पाउस पडला नसल्याने पेरणीची कामे खोळंबली होती. गावामधली शाळा नुकतीच सुटली होती. ती लहान मुले आम्हाला बघून आश्चर्य चकित होत होती. आधी थोड बुजलेल्या मुलांनी नंतर मात्र आम्हाला घोळका घातला. त्यातल्या काही मुलांनी आम्हाला
'पंख मला जर असते तर' ही कविता म्हणून दाखवली. ती ऐकून आम्हाला असे वाटले की इतक्या कठिण परिस्थितीमध्ये राहून सुद्धा लहान लहान गोष्टिंचा आनंद ती कशी बरोबर घेत असतात. आपण खरच त्यांना पंख देऊ शकतो का ??? अस प्रश्न सुद्धा आम्हाला पडला नसता तर नवल. तिकडे काही वेळ आम्ही थांबलो. ग्रामजीवनाचे फोटो काढले. उमेश आणि साधना ला तर मस्तच शॉट्स मिळाले. ते दोघे डॉक्युमेंटरी बनवत होते तर मी 'मेकिंग ऑफ़ डॉक्युमेंटरी' बनवत होतो. अर्थात मी त्या दोघांचे शूटिंग करत होतो आणि फोटो काढत होतो. अखेर संध्याकाळी ६ च्या आसपास आम्ही आमच्या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाला म्हणजेच करपेवाडीला येउन पोचलो. चालून जाम दमलो होतो. साधनाने हातात जरीपटक्याचा झेंडा घेतला आणि दिवसाचा क्लोसिंग शोंट दिला. त्यानंतर आम्हाला कळले की ती करपेवाडी नव्हतीच. करपेवाडी अजून १ तास पुढे होती. मग आम्ही पुन्हा आपले चालायला सुरवात केली. आता पूर्ण अंधार पडला होता. भरारीचे काहीजण आम्हाला शोधत मागे आले होते. अखेर करपे

वाडीला पोचलो. बाकी सगळे कधीच पोचून सामान लावन निवांत बसले होते. आम्ही सुद्धा गावातल्या एका घरात सामान टाकले आणि मस्त गप्पा टाकत बसलो. आप्पांसोबत काही वेळ संवाद साधला. रात्री ८ च्या सुमारास जेवलो आणि घराबाहेर परत गप्पा मारत बसलो. थोडयावेळाने दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकबद्दल विचार करत झोपी गेलो .. आम्ही आता पावनखिंड कधी बघतोय असे झाले होते ...
क्रमशः ...