Wednesday 5 January 2011

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग ३

मंडणच्या गुहेत झोपलेलो असताना पहाटे कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. टोर्च मारून आसपास पहिले तर काहीच दिसले नाही. अजून उजाडले नव्हते म्हणून दरवाज्यावर बनवून ठेवलेल्या काठ्यांच्या जाळीकडे बघत तसाच पडून राहिलो.



पहाटे-पहाटे अलंगच्या मागून सूर्यनारायणाचे दर्शन होवू लागले. उजाडू लागले तसे उठलो आणि आवरून घेतले. चहा टाकला आणि चक्क नाश्त्याचा प्लान रद्द केला. जे तयार खायचे पदार्थ सोबत होते ते खाल्ले. आज लंबी दौड होती. मंडण बघून, उतरून, त्याला पूर्ण वळसा मारून मग कुलंग गाठायचा होता. किमान ८-९ तास हातात हवे असा आमचा अंदाज होता.







लिंगी बघायला गेलो. गुहेच्या उजव्या बाजूने वरती गेले की लगेचच आहे. मोजून ५ मिनिटे लागतात. इथे काही मस्त फोटो काढले. आकाशातली नक्षी एकदम मस्त. समोरच कुलंग आणि मंडण-कुलंग मध्ये असलेली भिंत दिसत होती. पुन्हा काही टायमर लावून फोटो वगैरे काढणे झाले.


मंडण वरून दिसणारा कुलंग ...


 ऐश्वर्या अजय देवगण पोजमध्ये... :)





 
८ वाजत आले होते. पुन्हा गुहेकडे आलो आणि सॅक पॅक करून पाठीवर मारल्या. ठरल्याप्रमाणे अभि थेट खाली उतरत रोप सेटअप करायला गेला तर मला माझी सॅक नीट पॅक करायची होती. टाक्यावरून पाणी देखील भरून घ्यायचे होतेच. ऐश्वर्या माझ्याबरोबरच होती. माझे काम होत आले तसे मी वाटेकडे बोट दाखवून ऐश्वर्याला हो पुढे. मी आलोच मागून. असे म्हणालो. मिनिटाभरात मी देखील निघालो. बघतो तर ऐश्वर्या काही दिसेना. मनात म्हटले ही पोरगी इतक्या पटकन उतरून गेली सुद्धा? असेल. असेल. मी पायऱ्या आणि दरवाजा पार करून खाली आलो. तरी ऐश्वर्या दिसेना.

इतक्या लवकर ही खाली कशी उतरू शकेल? मी तिच्यामागून निघायला नेमका किती वेळ घेतला? अंदाज लावत विचार केला. विचार करता करता मी माझा उतरायचा वेग वाढवला. वरच्या टप्यामधल्या सर्व पायऱ्या उतरून खाली आलो तरी ही पोरगी दिसेना. हाक दिली तरी प्रत्युत्तर येईना. मी माझा वेग अजून वाढवत पुढे निघालो. धावतच.. अजून जोरात धावत. पण ऐश्वर्या कुठेच दिसेना. ऐश्वर्या इतक्या लवकर हा संपूर्ण टप्पा पार करून जाईल हे माझ्या मनाला पटत नव्हते.


कुठे गेली मग ही? इतक्या लवकर पोचली? शक्य नाही.. मध्ये कुठे वाट चुकणे तर अजिबात शक्य नाही. मग कुठे गेली? पडली? नाही.. नाही.. पडेल कशी? असे कसे शक्य आहे.... का शक्य नाही? मी हाका मारायला सुरवात केली. पण काही प्रत्युत्तर येत नव्हते. आता मला जरा विचित्र विचार यायला सुरवात झालेली. अभिपर्यंत पोचलो.


मी : ऐश्वर्या कुठाय? इथे पोचली का?

अभि : नाही रे. तुझ्या बरोबर तर होती. तू धावत आलास काय? काय झाले ?
मी : काय झाले ते माहित नाही पण ऐश्वर्या हरवली आहे. मला भीती आहे की ती कुठे पडली आहे की काय.
अभि : तू तिला एकटीला कशाला सोडलेस?
मी : अरे. अवघे मिनिट देखील आधी निघाली नाही ती. असो. मी पुन्हा मागे जाऊन बघतो.

मी ज्यावेगाने अभिपर्यंत पोचलो होतो त्याच्या दुप्पट वेगाने परत फिरलो. पाठीवर आता सॅक नव्हती. पुन्हा एकदा पायऱ्या ... दरवाजा ... हाका..  ऐश्वर्या... एओ... ओये... पण काहीच उत्तर नाही. दरवाजाचढून पुन्हा वरपर्यंत पोचलो. बघतो तर ही महामाया गुहेवरच्या भागातून वाट शोधत खाली येत होती.

मी डाफरलो. कुठे गायब झालीस तू? आणि परत वर कशी आलीस?

ऐश्वर्या : तू कुठे गायब झालास? मी पुढे निघाले. कड्यापर्यंत गेले. पुढे वाटच दिसेना म्हणून जरा डावीकडे वर गेले. तिथेही वाट नाही म्हणून परत आले तर तू गायब. किती हाका मारतेय.
मी : तुला ही समोरची वाट, पायऱ्या दिसल्या नाहीत? २ फुट समोरच्या पायऱ्या. धन्य आहेस तू. सकाळी सकाळी माझा घाम काढलास. ओरडून ओरडून मेलोय.
ऐश्वर्या : हो. मी पण ओरडून ओरडून घसा सुकवून घेतलाय. शेवटी अजून वाट शोधायचा निर्णय घेतला. नाहीच सापडला तर पुन्हा टाक्याजवळ येऊन बसायचे ठरवले होते. मला माहित होते तुम्ही मला शोधत इथेच येणार... आलास की नाही!!!
मी : (कपाळावर हात मारत) धन्य आहेस. चल आता. चांगला अर्धा तास वाया गेलाय.

आम्ही खाली उतरत असताना अभि सुद्धा रोप घेऊन परत येताना दिसला. आम्ही दोघे येताना बघून तो पुन्हा परत फिरला. ९:३० वाजता रॅपलिंग करून ऐश्वर्या खाली उतरून गेली.


त्या मागून मी. सर्वात शेवटी अभि उतरला. अलंग आणि मंडण या दोन्ही ठिकाणाचे रोप आवश्यक असणारे टप्पे पूर्ण झाले होते. आता होता तो फक्त कुलंग ट्रेक. उरलेल्या पायरया उतरून आम्ही खाली आलो. मध्ये तो छोटासा धोकादायक टप्पा मात्र रोप न लावता पार केला. ते सुद्धा सॅक घेऊन.





१०:१५ च्या आसपास. मंडण वरून कुलंगच्या वाटेने निघालो. पण इथेच पाहिली गडबड झाली. वाट सापडेना. सांगातीच्या माहितीप्रमाणे मंडणच्या पायऱ्या सुरू होतात तिथे आसपास कुलंगवरून येणारी वाट आहे. मी जे फोटो पहिले होते त्यात मात्र अलंग-मंडण यांच्यामध्ये जी घळ आहे त्यातून वाट खाली उतरून मंडणला फेरा मारत कुलंगकडे जाते अशी माहिती  होती. आसपासच्या कारवीमुळे वाट सापडेना. रान माजले असेल तरी वाकून किंवा खाली बसून पहिले तरी वाटेचा अंदाज घेता येतो. कारण मळलेली वाट एकदा तयार झाली की तिकडे गवत, झाडे उगवत नाहीत. फारतर वाटेवर झाडे वाकून वाट बंद झाल्यासारखी वाटते. इथे मात्र अर्धातास अथक प्रयत्न करून शोधाशोध करून देखील वाट काही मिलेला. अखेर आम्ही घळीमधून खाली उतरायचे ठरवले. पहिला टप्पा संपला की बाहेर पडायला कुठेतरी वाट असेल असा आमचा अंदाज होता.





अलंग-मंडणच्या मध्ये असलेल्या खिंडीमधून उतरायला सुरवात केली तेंव्हा ११ वाजले होते. इथून कुलंग म्हणजे संध्याकाळ होणार हे नक्की होते. शक्य तितक्या वेगाने आम्ही उतरायला लागलो. मध्ये -मध्ये घसारा होताच. अशाच एका ठिकाणी मी दणदणीत आपटलो. डावीबाजू सणकून दुखायला लागली. मग जरा वेळ तिथेच बसलो. पुन्हा मार्गक्रमण सुरू. संपूर्ण लक्ष्य डाव्याबाजूला काही क्लू मिळतो का ते बघण्यात. आता पाहिला टप्पा संपला होता पण वाट काही सापडेना. ती घळ आम्हाला कुलंग पासून लांब लांब नेत होती. १२:३० झाले तरी डावीकडे सरकायला जागा मिळेना. लंच रद्द. पुन्हा तयार खादाडी फस्त. थोडी चर्चा. दुपारी ३ पर्यंत वाट नाही मिळाली तर आपण कुलंग गाठायच्या ऐवजी गाव गाठायचे.


पुढे निघालो. आता तर मंडण देखील वरच्या बाजूला दिसणार नाही इतक्या खाली येऊन पोचलो. वाट पूर्णपणे चुकलो आहे ह्याची मला खात्री झालेली. कुलंग तर दिसतच नव्हता. पण डावीकडे सरकायला जागा तर मिळायला हवी... :( उजव्या बाजूला दूरवर मात्र अलंग आणि कळसुबाईला जोडणारे डोंगर दिसत होते. एके ठिकाणी छान ओहोळ लागला. उशीर होत असूनही तिथे बसलो. फ्रेश झालो. इतक्यात अभिला डावीकडे जाणारी मळलेली वाट मिळाली. चला... काहीतरी मिळाले.. बघुया..




त्यावाटेने चालत पश्चिमेच्या दिशेने निघालो. घळीत उतरल्यापासून आम्हाला एकही मानवी अस्तित्वाच्या खुणा दिसल्या नव्हत्या. ना कुठे चिकलेट-चॉकलेटचे व्र्यापर, ना गोवा गुटखा ना काही. ह्या घळीतून कोणी गेलेले नाहीच आहे की काय असे वाटावे इतके. २० एक मिनिटे त्या वाटेने पुढे गेल्यावार लाल मातीची वाट मिळाली. ही वाट नक्की कुलंगवाडीला जाणार याची मला खात्री पटली. ह्या वाटेवर लवकरच पुन्हा डावीकडे जाणारी वाट मिळणे गरजेचे होते. आता कुलंग समोर दिसू लागला होता. मंडणला खालून का होईना वळसा पूर्ण झाला होता. दुपारचे ३ वाजत आले होते. पण अजूनही हवीतशी वाट मिळेना.. :(





अखेर आम्ही ठरवले. ह्यावाटेवर जात राहायचे. योग्य वाट मिळाली तर ठीक नाहीतर कुलंग रद्द करून कुलंगवाडीकडे मोर्चा वळवायचा. कारण कुलंगवाडीवरून कुलंग माथा गाठायला तब्बल ५-६ तास लागतात. इथून सुद्धा आम्हाला ४ एक तास सहज लागले असते. आणि तितका वेळ आमच्याकडे नव्हता. अखेर ४ च्या सुमारास आम्ही अगदीच खाली उतरून आलो. रानात एक माणूस भेटला. त्याच्याकडून नीट वाट विचारून घेतली. इथून किमान ४ तास लागतील हे समजल्यावर कुलंगवाडी- आंबेवाडी रस्ता कसा गाठायचा? हा प्रश्न निमुटपणे विचारला.






अर्ध्यातासात डांबरी रस्ता गाठला. गेल्या २ दिवसात अलंग - मंडण फत्ते झाले पण कुलंग राहून गेला. उद्या करणे तो शक्य असले तरी आम्ही काही कारणाने आजच परत जायचा निर्णय घेतला...


कुलंगवाडीला परत येण्याचे सबळ कारण मात्र मिळाले होते.. राहिलेला कुलंग लवकरच फत्ते करायचा होता की...


********************************* समाप्त ************************************

Monday 3 January 2011

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग २

निसर्गाच्या सानिध्यात, गावाकडे मोकळ्या हवेत सकाळी लवकर जाग येते आणि उठल्या-उठल्या एकदम फ्रेश वाटते. शहरात तसे नाही. उठल्यावर पुन्हा झोपावेसे वाटते. एक कंटाळा अंगावर चढलेला असतो. आदल्या दिवशी चांगला ६-७ तास ट्रेक झाल्यानंतरही आज सकाळी लवकरच जाग आली. उठून बसलो तर समोच 'लिंगी' म्हणजे मंडण दिसत होता. पूर्वेकडून सूर्यकिरणांनी हळूहळू त्याला कवेत घ्यायला सुरवात केली होती. सूर्य त्याच्या डोक्यावर चढेपर्यंत आम्हाला त्याच्या पायथ्याशी पोचायचे होते. आम्ही तयारीला लागलो. चहा टाकला, आवरून घेतले आणि निघताना काही फोटो घेतले.








पाण्याच्या टाक्यावर थांबून मी आणि ऐश्वर्याने पाणी भरून घेतले. अभि पुढे रोप सेटअप करायला गेला. आज आम्ही रॅपलिंग करून उतरून जाणार होतो. रॅपलिंगचे तंत्र आता सर्वच जाणतात. ते सांगायची इथे गरज वाटत नाही.





सर्वात आधी मी, मग ऐश्वर्या आणि मग शेवटी अभि असे तिघे जण खाली उतरून आलो. शेवटचा माणूस खाली उतरताना रोप सुद्धा काढून आणायचा असतो तेंव्हा तशी सोय आधीच करणे गरजेचे असते. एकूण चढाईच्या दुप्पट रोप असेल तर 'U' टाकून शेवटच्या व्यक्तीला सहज उतरता येते. आमच्याकडे मात्र तितक्या लांबीचा रोप नसल्याने अभिने आधी U टाकून रॅपलिंग केले आणि मग उरलेला टप्पा एक टेप आणि स्लिंग वापरून वेगळ्या तंत्राने उतरून आला. तीघेपण खाली आल्यावर पुन्हा तो खालचा टप्पा पार केला आणि आम्ही मंडणच्या दिशेने चाल मारली.१० वाजत आले होते.


अलंगवरून मंडणला जाण्यासाठी स्पष्ट वाट आहे. पहिल्या प्रस्तर टप्प्याखाली जे मोठे झाड आहे त्याच्या बाजूने मंडणकडे वाट जाते. उतरताना डावीकडे ही वाट लागते. ह्यावातेवर लागले की वाट चुकायचा प्रशाच येत नाही. कारण आपल्या डावीकडे अलंगाचा अंगावर येणारा सरळसोट कडा असतो आणि उजवीकडे असते दरी. त्यामधून जाणारी वितभर रुंदीची वाट.






संपूर्ण उतारावर कारवीचे साम्राज्य. ७-८ फुट तर कुठे १० फुट उंच वाढलेली.वाटेवर पसरलेली कारवी दूर सारताना पुन्हा अभि आणि ऐश्वर्याला गांधीलमाश्या चावल्या. पुन्हा ते आ.. ओ.. सुरू झाले. मी अजून कसा बचावलोय तेच समजेना. माझ्या टी-शर्टवर असलेले मोठे डोळे बघून गांधीलमाश्या जवळ येत नव्हत्या की काय.. ते नाही का फुलपाखरांच्या पंखांवर मोठे डोळे असतात... तसे..  :D



 तासभर कड्याखालुन चालल्यानंतर खिंडीमध्ये पोचलो. आता मंडण समोर उभा ठाकला होता. उजव्या बाजूनी एक वाट खाली उतरत होती. तर डाव्या बाजूला अलंगच्या बेचक्याकडे जाणारी वाट लागते. आम्ही समोरची वाट घेत मंडणला जवळ केले आणि आता त्याच्या कड्याखालुन चाल सुरू ठेवली. १० मिनिटात मंडणच्या कातळकोरीव पायरया लागल्या.

७० एक पायऱ्या चढलो की वाट डावीकडे वळण घेत अजून वर चढते. पायऱ्या सुरूच. अजून ५० एक पायरया चढलो की हुश्श्श... आपण आता एक टप्पा वरती आलेलो असतो. आता पुन्हा वाट उजवीकडून. इथे आहे मंडणचा पहिला छोटासा प्रस्तर टप्पा. नवखे असाल तर रोप नक्की लावा. अनुभवी असाल तर गरज नाही. तरी रोप लावल्यास हरकत नाही. अगदीच ६-८ फुटाचा ट्रावर्स आहे पण पाय ठेवायला फार जागा नाही. सरकलात तर नक्की खाली जाणार.. :)

आम्ही रोप लावून तो पार करायचे ठरवले. क्रम ठरलेला.. अभि - ऐश्वर्या आणि शेवटी मी. हा टप्पा पार केला की जरासा वळसा मारत अजून पायऱ्या चढत जायचे आणि मग डावीकडे वर बघायचे. इथे अलंग सारखाच पण थोडासा लहान आणि तिरपा प्रस्तर टप्पा चढून जावे लागते. खाली सोपा वाटला तरी मध्ये तो नक्कीच कठीण आहे. विशेष करून आपल्याला प्रस्तरारोहणाची सवय नसेल तर.







शिवाय ह्या  ठिकाणी सुद्धा पाणी ओघळत होतेच. मागे आहे ८००-१००० फुट खोल दरी. अभिने पुन्हा लीड घेतली आणि बेस स्टेशनला सॅक टाकली आणि खालच्या बोल्टवर कॅराबिनर क्लिप करत चढाईला सुरवात केली. उजवीकडे सरकत त्याने दुसरा बोल्ट गाठला आणि रोप बोल्ट थ्रू नेला. आता सरळ चढणे होते. एका मागे एक बोल्ट क्लीप करत ७-८ मिनिटात अभि वर पोचला आणि त्याने रोप खाली टाकला. त्यावरून मग आधी ऐश्वर्या मग सर्वांच्या सॅक वर गेल्या. माझी सॅक वर पाठवताना पाण्याची बाटली फुटली आणि १ लिटर पाणी त्या कड्यावरून ओघळत माझे प्रस्तरारोहण अधिक कठीण करून टाकले. नशीब ती बाटली खाली येता-येता माझ्या हातात गावली. नाहीतर थेट खाली दरीतच गेली असती. अखेर मी वर चढून गेलो.



आता पुढची वाट सोपी आहे.कड्याखालून परत अलंगच्या दिशेने जात वाट वर चढते. इथे अतिशय सुंदर अश्या तिरप्या रेषेत पायऱ्या खोदलेल्या आहेत.



मग पुन्हा उजवीकडे वळून पायऱ्याचा शेवटचा टप्पा. इंग्रजी 'Z' आकाराच्यामार्गाने आपण चढत राहिले की गडाचा उध्वस्त दरवाजा लागतो. त्यापार पुन्हा काही पायरया पार केल्या की आपण गडाच्या माथ्यावर असतो.










ह्या भागातून मागे अलंग अतिशय सुंदर दिसतो. एकदम काजूच्या आकाराचा.. :D काल जिथे राहिलो त्या गुहा देखील एकदम स्पष्ट दिसतात. सर्वात मागे आहे तो संपूर्ण भाग सुद्धा अलंगचाच आहे. म्हणूनच गावातले लोक त्याला 'मोठा' म्हणत असणार.





वर पोचलो की समोरच पाण्याचे टाके आहे. त्या थोडेसे वर राहायला व्यवस्थित गुहा आहे. अलंगप्रमाणेच इथे सुद्धा गुहेत खूप माती आहे. पण राहायला योग्य आहेत. अनेकांनी मला मंडणला राहायची व्यवस्था नीट नाही असे सांगितले होते. पण ते खरे नाही. मोठी प्रशस्त गुहा आहे. राहायची जागा नीट साफ करून घेतली. आम्ही आमचे जेवण बाहेरच बनवायचे ठरवले.






मंडणवर तसे बघायला काही नाही. गडाची लिंगी आम्ही सकाळी बघणार होतो. आत्ता अंधार पडायच्या आधी हातात तास होता मग टाक्यामधल्या गार पाण्याने मस्तपैकी शंभो केली. अंधारू लागले तसे रात्रीच्या जेवणासाठी लागणारे सामान तितके बाहेर ठेवले बाकी सर्व आत.

मी आणि ऐश्वर्या जेवण बनवतोय आणि अभि आमचे फोटो घेतोय..


जरा स्टेडी बसा रे.. हलू नका अजिबात.


शेवटी एक चांगला फोटो मिळाला तेंव्हा आमची सुटका झाली.... :D






ती टोपी मी डोक्याला हेडटोर्चचा पट्टा चावू नये म्हणून घातली होती. थंडी काहीच नव्हती आणि महत्वाचे म्हणजे इतक्या उंचावर असूनही अजिबात वारा देखील नव्हता. जेवायला मसालेभाताबरोबर पापड - लोणचे होते पण त्यानंतर गोड म्हणून डब्बा भरून रसगुल्ले नेले होते.. :D

काल अलंगवरून मंडण दिसत होता तर आज मंडण वरून अलंग... रात्री पुन्हा एकदा त्या अब्ज ताऱ्यांच्या सहवासात बसलो. थोडे स्टार गेझिंग केले. थोडा गारवा जाणवू लागला होता.. अगदी हवाहवासा.. विविध विषयांवर खूप गप्पा मारल्या. नेमकी २७ नोव्हेंबर होती. अधून मधून २६-२७ नोव्हेंबर २००८ च्या आठवणी जाग्या होत होत्या..


सकाळी लवकर निघायचे होते. गड भटकून कुलंगच्या वाटेला लागायचे होते. हा दुसरा दिवशी झोपायला जायच्या आधीचा फोटो.. :)






प्रस्तरचढाई असलेले अलंग - मंडण फत्ते.. आता फक्त कुलंग बाकी राहिला होता... सह्याद्रीमधली सर्वात मोठी चढाई असे ज्याचे वर्णन करतात तो कुलंग उद्या फत्ते करायचा होता...
 

क्रमश: .....

Saturday 1 January 2011

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग १

'आता ह्यावर्षी तरी ह्यापैकी एक ट्रेक झालाच पाहिजे.' मी अभिला संगत होतो.
आमच्या सह्यभ्रमंतीला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक दणदणीत ट्रेक करावा असे आमचे ठरत होते. अलंग रेंज करायची की नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड ह्यावर नेमके शिक्कामोर्तब होत नव्हते. अखेर आम्ही अलंग - मंडण - कुलंग ट्रेक करायचे नक्की केले. २५ ते २८ नोव्हेंबर असे ४ दिवस हातात होते. मोहिमेची खबर बाकी सर्वांना धाडली. पण अगदीच मोजके भटके तयार झाले. जे तयार झाले त्यातून पण अर्धे २ दिवस आधी गळाले. उरलो फक्त मी, अभिजित आणि ऐश्वर्या. शिवाय अभिला काही काम आल्याने ट्रेक १ दिवस पुढे ढकलला. आता २६ ते २९ अश्या तारखा नक्की केल्या.

मी, अभि आणि ऐश्वर्या अश्या तिघांनी सॅक पॅक करून २६ ला भल्या पहाटे १ वाजता ठाणे सोडले. जिथून ट्रेकला सुरवात करायची तिथेच संपवायचा असल्याने अभिने स्वतः:ची गाडी घेतली. सॅक आणि ऐश्वर्या मागच्या सीटवर टाकून मी आणि अभि नाशिक हायवेच्या दिशेने सुटलो. रात्र असल्याने हवेत छान गारवा होता आणि थंडीची चाहूल लागायला सुरू झाली होती. रस्त्यावर रात्रीच्या मोठ्या गाड्यांचे ट्राफिक होते पण मुंबईवरून बाहेर जाणाऱ्या गाड्या रात्री तश्या कमी असल्याने इतका त्रास जाणवत नव्हता. कल्याण फाटा - शहापूर आणि मग कसारा घाट करत घोटीला पोचलो. एका पंपवर गाडीला खाऊ दिला. आम्हाला मात्र कुठेही पहाटे २-३ ला साधा चहा सुद्धा मिळेना. शेवटी एकेठिकाणी एक ढाबा उघडा दिसला. एक चहा मारला तशी तरतरी आली. अभिसाठी ती 'टी' महत्वाची होती कारण पठ्या जरा पेंगतोय की काय अशी मला शंका यायला लागली होती. घोटीपासून घोटी - नागपूर हा महादरीर्द्री आणि निकृष्ट अवस्थेतला रस्ता लागला. नाही..नाही.. खड्डे लागले. आपण आपले त्याला उगाच रस्ता म्हणायचे. मध्ये एके ठिकाणी पेंग आल्याने गाडीवरचा ताबा सुटतो की काय असे वाटल्याने अभिने काही वेळ गाडी बाजूला घेतली. पाय मोकळे केले आणि मग उरलेला शेवटचा काही अंतराचा टप्पा पूर्ण केला.

पहाटे ४:३० वाजता टाकेदला जाणाऱ्या फाट्यावरून उजवीकडे वळून आंबेवाडीला पोचलो. गावातून कोणीतरी रूटर घ्यायचा असे आमचे आधीच ठरले होते. कारण एक तर ही वाट मी आधी कुठेही वाचलेली नव्हती आणि त्याबद्दल कुठूनही माहिती मिळालेली नव्हती. आंबेवाडीतून अलंगला जायला एक मुलगा आम्हाला हवा होता. अगदीच पहाटे गावात शिरायला नको म्हणून जरावेळ गावाबाहेरच थांबलो.

 





उजाडताना समोर अलंग - मंडण - कुलंग दिसू लागले आणि ओढ अनिवार झाली. गेली १० वर्षे ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो ते अगदीच जवळ येऊन ठेपला होता. ६ वाजता गावात प्रवेश केला आणि एका मुलाला जुजबी वाट विचारून घेतली. 'देवळापाशी बाळूचे घर आहे तो गडावर येईल' असे त्याने आम्हाला सांगितले. आंबेवाडीमधल्या त्या देवळासमोरच्या प्रशस्त्र अंगणात गाडी टाकल्याबरोबर तिथल्या पोरांनी एकच गलका केला. इतक्या सकाळी-सकाळी काय उत्साह पोराना. २-४ लोक पण त्यांच्या घराबाहेरून आले. देवळातल्या मामाला बाळूचे घर विचारले. त्याच्या घराकडे गेलो तर न्हाणिक उरकून बाळू नुकताच तयार होत असावा असे दिसले.

आम्ही त्याला गडावर येण्याबद्दल विचारल्यावर त्याने आम्हाला तब्बल १५०० रुपये मागितले. मी अवाक... :O

"दादा.. वर जाऊन यायला दिवस जाणार. शिवाय जोखीम कमी नाही. मोठ्या ग्रुपला आम्ही ३-४ हजार रुपये घेतो. लोक पण आनंदाने देतात. तुम्ही तिघेच आहात म्हणून कमी सांगतोय. नाहीतर आम्ही अडून ३-४ हजार घेतोच. बघा काय ते सांगा मला".

मी त्याला म्हणालो,"आम्ही तुला ५०० रुपये देऊ शकतो फारतर. त्यावर नाही. आम्ही इथे वैयक्तिक आलोय. एखादा ग्रुप घेऊन आलो असतो तर तुला ३ काय ५ दिले असते. ५०० जमत असेल तर सांग नाहीतर आम्हाला जुजबी वाट सांग.. आम्ही जाऊ."

बाळू : मोठ्या'वर जायचे म्हणजे दोर हवा. सोपे नाय.

अभि : आमच्याकडे दोर आणि बाकी सर्व सामान आहे.
 

गावातली लोक अलंगला 'मोठा', मंडणला 'लिंगी' तर कुलंगला 'कुरंग' असे संबोधतात.

बाळू : असे काय. थांबा मी गणपतला बोलावतो. तोपर्यंत चहा घ्या.

आम्ही चहा पियेपर्यंत गावाबाहेरच्या झापावरून तो गणपतला घेऊन आला. ह्या सर्वात सकाळचा बहुमुल्य १ तास वाया गेला होता. अखेर गणपत ६०० मध्ये तयार झाला. गावातल्या पाण्याच्या टाकी बाजूने आम्ही पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो आणि अगदीच २०० मीटर अंतरावर पुन्हा डावीकडे माळरानावर घुसत मळलेल्या वाटेला लागलो. ट्रेक खरया अर्थाने सुरू झाला.




डावीकडे दूरवर कळसुबाई, समोर अवाढव्य पसरलेला अलंग आणि उजव्या बाजूला मंडण - कुलंग असे दृश्य डोळ्यात साठवून आता आम्ही पहिल्या चढणीला लागलो. समोर धुक्याची चादर पसरली होती. सूर्याचे साम्राज्य सुरू व्हायला अजून काही क्षण बाकी होते.


भाताची खाचर संपली होती. त्याच्या कडेकडेने उगवलेल्या झाडांवरचे कोळ्याचे जाळे किती मनोवेधक. निसर्गाचे नक्षीकामच...

चढ सुरू झाला तसा गणपत पण सुरू झाला... म्हणजे तो काही जुन्या गोष्टी सांगू लागला.


"गावात २-४ जणच आहेत जे अलंग दोर न घेता वर जाऊ शकतात. मागे पुण्याहून एक ग्रुप आलेला. आर्मीवाली ४ पोर होती. अतिउत्साह करून गेली वर चढून आन एक पडला ना त्यातला वरून खाली डोक्यावर. नशिबाने वाचला. आम्ही ६ जणांनी आणला त्याला खाली उचलून. तोपर्यंत पुण्याहून आर्मीची गाडी आली. डॉक्टरने एक इंजेक्शन दिला आन त्याला शुद्धीवर आणला कसाबसा. तुमच्या इतकाच होता तो."
शेवटच्या वाक्याने ऐश्वर्या आणि अभि हसायला लागले. मी बिचारा गप्प.


"सदाशिव अमरापूरकरचा भाचा आलेला मागल्या वर्षी. या वर्षी पावसाळ्यानंतर अलंगला येणारे तुम्ही पहिलेच. वाट जरा झाडीत दबलेली असेल पण आपण शोधू."






आम्ही ह्यावर्षी आलेले पहिलेच हे त्याच्याकडून कळले. आता वाट पहिल्या डोंगराला उजवीकडे ठेवत अधिक वर चढू लागली होती. समोर दिसणारे २ सुळके म्हणजे वाटेवरची पाहिली खुण. त्याच्या उजव्या दिशेला तिरपे चढत गर्द झाडी मधली वाट वरच्या टप्याला पोचली की लगेच उजवीकडे सरकत त्या डोंगराच्या माथ्यावर येऊन मग रानातून सरकत सरकत डोंगराच्या उजव्या बाजूने निघायचे. आपण ट्रेकचा पहिला टप्पा पार केलेला असतो. पण अलंग - मंडण फार जवळ आलेले नसतात. दूरवर दोघांमधली खिंड मात्र चटकन नजरेत भरते.


वरच्या टप्यावरून चाल मारली. आता वाट अधिकच चढी. उंच ढांगा टाकायच्या आणि जमेल तिथे झाड पकडत नाहीतर दगडाचा आधार घेत वर जात राहायचे.


पाण्याचे १-२ ओहोळ पार करत 'बिबहोळ' येथे पोचलो. या जागेला बिबहोळ का म्हणतात ते कोणालाच माहित नाही. वीरगळीसारखे काहीसे स्मारक आहे. ही बहुदा गडाखालची मेटेची जागा असू शकते. निघून दीडतास होवून गेला होता. आज नाश्ता झाला नव्हता तेंव्हा भुका लागायला सुरवात झालेली.



मग ऐश्वर्याने तिच्याकडचा खजिना उघडला. लाडू, चकल्या असा दिवाळी फराळ बाहेर पडला. १०-१५ मिनिटात पुढे सुटलो आणि उजवी मारत अलंगच्या कड्याखाली पोचलो. आता ह्या कड्याखालुन मंडणच्या दिशेने चाल करत राहायचे. काही मिनिटात पुन्हा वाट वर चढू लागते आणि ७-८ फुट वाढलेल्या कारवीच्या गच्च झाडीतून ५ एक मिनिटे वर जात आपण थेट अलंगच्या कातळकड्याला भिडतो.



इथपासून कड्यात खोदलेल्या पायऱ्या लागतात. आता अधिक सावधान. उशिरापर्यंत पाउस झाल्याने त्यावरून अजूनही पाणी वाहते आहे. कधी उजवीकडे तोल सांभाळत चढायचे तर कधी वळून डावीकडे.




खाली बघत जरा वाट निरखत चालतोय तर अचानक पुढे झाडीच यावी आणि वाटच बंद.. मग गणपत त्या झाडीत शिरे आणि वाट मोकळी करे. अचानक मागे असलेल्या अभि आणि ऐश्वर्याला गांधीलमाश्या चावू लागल्या. कारवीच्या ८ फुट उंची झाडीमध्ये घुसल्यावर गांधीलमाश्या कुठून येत आहेत आणि कधी चावत आहेत ते कळायला मार्ग नसतो. आपण बस आपलं चावून द्यायचं आणि ओरडायच बास... ऊआ.. आआ.. :D
 

बराच वेळ पायऱ्या चढून गेलो. खालून बघताना कोणालाही वाटणार नाही अश्या बेमालूमपणे कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या. इथून वर जायचा रस्ता असेल हा विचार स्वप्नात पण येणे शक्य नाही. भन्नाट...

नगरचा एक ग्रुप आलेला.. गणपत पुन्हा सुरू झाला. त्यांनी रोप कसा वापरायचा वगैरे बरच शिकवले. ३ दिवस कॅम्प केल्यानंतर जाताना एक हार्नेस गिफ्ट दिलाय मला. बाळू पण होता बरोबर. हुशार एकदम पण दारूपायी वाया गेलंय ते. सकाळी पहिले दारू पाहिजे. नाहीतर सुतारकामात एकदम तरबेज हा.

बोलता-बोलता अचानक गणपतने सलमानखान पेक्षा पण फास्ट अंगावरचा शर्ट काढून फेकला. म्हटले ह्याला काय झाले. त्याच्या पाठीवरच गांधीलमाशीने हल्ला केल्यावर तो काय करणार बिचारा.. सलमान झाला त्याचा.. :) आता सर्वांमध्ये मीच एकटा बचावलो होतो. पुढचा नंबर माझा ही मला खात्री होती.



कड्यामधल्या पायऱ्यांची वाट संपली आणि झाडीमधली वाट पुन्हा सुरू झाली होती. ५-१० मिनिटात अखेर ती वाट संपली आणि समोर अनेकांच्या फोटोमध्ये पाहिलेला तो प्रस्तर टप्पा दिसला. ह्याच्यार लगेच दुसरा टप्पा आहे ते ठावूक होते. तो दिसत फक्त नव्हता. चढाईच्या टप्प्यावर अजूनही पाण्याचा ओघळ होता. पण गणपत सराईतपणे तो टप्पा पार करून गेला. त्यामागून अभि प्रयासाने टप्पा पार करून गेला. मग ऐश्वर्या महतप्रयासाने तो टप्पा पार करून गेली. शिरस्त्याप्रमाणे सर्वात शेवटी मी. त्याआधी मी तिघांच्या सॅक वर पाठवून दिल्या.


शेवटी मी सुद्धा प्रयास करून तो टप्पा पार केला आणि आम्ही अलंगच्या मुख्य चढाईकडे सरकलो. अलंगचा सर्वात धोकादायक टप्पा. ८० फुट सरळ कडा.


पण आधी हा असा नव्हता. गड राबता होता तेंव्हा इथे सुंदर कोरीव पायरया होत्या. खडकीच्या लढाईमध्ये पेशवा दुसरा बाजीरावाचा पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी सह्याद्रीमध्ये एक मोठी मोहीम आखून अनेक गड किल्ले, त्यांचे मार्ग, पाण्याच्या टाक्या, कोरीव पायऱ्या आणि निवारे सुरुंग लावून उडवून दिले. पुन्हा ह्या किल्याच्या सहाय्याने कोणी आपल्यावर कुरघोडी करू नये म्हणून ते कुचकामी करून टाकायचा कुटील डाव इंग्रज खेळले. ह्या डोंगरी किल्यांचा तसा त्यांना काही उपयोगही नव्हता. गडाच्या अवती-भवती असणारे क्षेत्र त्यांनी संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केले आणि गड-किल्ल्यांना अगदीच सुने दिवस आले. कोणी तिथे जाईना. फारतर लाकूड-फाटा, दाणा-वैरण जमा करायला गावची लोक कधीतरी जायचे. स्वातंत्र्यानंतर मात्र महाराष्ट्रात गिर्यारोहणाचे वारे वाहू लागले आणि पुन्हा एकदा आपण धाव घेतली ह्या गड-किल्ल्यांवर...


तुटलेल्या पायऱ्यांच्या जागी बसलेल्या सुरुंगाच्या खुणा बघत आम्ही उभे होतो. गणपत एव्हाना कमरेला रोप बांधून तयार झाला होता. पण त्याला थेट वरपर्यंत तसाच चढू द्यायला आम्ही तयार नव्हतो कारण कड्यावरून अजूनही पाणी ओघळत होते. संपूर्ण टप्यावर एकूण ५ बोल्ट मारलेले आहेत. त्यामध्ये कॅराबिनर टाकत आणि त्यातून रोप पास करत वर सरकत जा असे त्याला सांगितले होते.




डावीकडून सुरू करत मग मध्ये आणि मग पुन्हा डावीकडे सरकत, आरोहण करत, कॅराबिनर क्लिप करत गणपतवर पोचला. वरती रोप बांधायला दगडात होल केलेली आहेत. रोप बांधून त्याने खाली फेकला. मग अभि 'झुमारिंग' ह्या तंत्राने ते अंतर पार करून वर पोचला.


 एकामागून एक असे अभिजित, ऐश्वर्या आणि शेवटी मी असे तिघेही वर पोचलो.


ह्या तंत्रात थेट प्रस्तरारोहण न करता रोपला अडकवलेले २ झुमार वापरून वर सरकत राहायचे असते. कमरेला बांधलेल्या सेफ्टी हार्नेसमध्ये एक टेप (फोटोमधील लाल रंगाची) अडकवून ती एका झुमारमध्ये बांधायची आणि दुसरी टेप दुसऱ्या झुमारला बांधून खाली पायात अडकवायची. आता आलटून-पालटून कधी पायावर तर कधी हार्नेसवर जोर टाकत, एक मग दुसरा असे झुमार ने वर सरकत राहायचे. चढून दमलात तर हार्नेसमध्ये बसून राहायचे. पडायची कुठलीही भीती नाहीच. दम खायचा, हवंतर फोटो काढून घ्यायचा आणि मग पुन्हा चढणे सुरू... :)  वाचताना सोपे वाटते तितके ते सोपे नसते. तुमचे वजन जास्त असेल तर स्वतःला वर नेताना तुम्हाला निश्चित कष्ट पडतात आणि हात भरून येतात. आम्ही वर पोचल्यावर जरा दम घेतला. गणपतने त्याचे काम चोख केले होते. हा तिथे काढलेला त्याचा फोटो.



आता इथून पुढे पुन्हा खोदीव पायऱ्याचा रस्ता आहे. मात्र अगदी सांभाळून चढायचे. २ मिनिटात आपण गडाच्या माथ्यावर असतो. वर पोचलो की समोर दूरवर डोंगराच्या पोटात आपल्याला गुहा दिसतात. उगाच इथे-तिथे भटकत न बसता आधी राहती जागा ताब्यात घ्यायची.




जाताना वाटेवरच पाण्याचे टाके लागते. हे पाणी पिण्यासाठी चांगले आहे. गुहेच्या शेजारी असलेले पाणी पिऊ नये. ते फारतर भांडी धुवायला किंवा 'इतर' कामासाठी वापरावे. गुहेत टेकलो तेंव्हा ४ वाजत आले होते. गणपतला अजून संपूर्ण गड उतरून खाली पोचायचे होते. तेंव्हा त्याला लगेच रवाना करणे गरजेचे होते. तो निघायच्या आधी अभिने पटकन चहा टाकला.

मी : चहा घेऊन जा रे. होईल ५ मिनिटात.

आपण घरी आलेल्या पाहुण्याला पण चहा-कॉफी विचारतोच की. सोबत नेलेल्या एम.एस.आर.(MSR) पोर्टेबल स्टोव्हने चुलीचा त्रास आणि महत्वाचा असा वेळ वाचवला होता. चटकन चहा तयार झाला. सोबत खायला टोस्ट.

चहा पिता पिता गणपत पुन्हा सुरू झाला.

गणपत : गावाबाहेर झापात राहतो. तिथेच शेती आहे. २ मुली आहेत. आता ऑपरेशन करून घेतलंय.

आधी चटकन मला समजलेच नाही. पण मग क्षणात कळले की २ मुली झाल्यानंतर शहाणपण दाखवून त्याने स्वतःचे ऑपरेशन करून घेतलंय. चहा झाला तसा तो निघाला. अभि पुन्हा त्याला सोडायला  त्या प्रस्तर टप्यापर्यंत गेला.

गणपत : अरे कशाला मी जाईन की...

अभि : तू काय रोप धरून उतरून जाशील. तसा नको जाऊ. थांब... शिवाय मला रोप काढून आणायचा आहेच. मी येतो चल.

रॅपलिंग करून गणपत खाली उतरून गेला. अभि पुन्हा माघारी परतून गुहेकडे आला.


तोपर्यंत मी आणि ऐश्वर्याने सामान एका कोपऱ्यात लावून गड फिरायला जायची तयारी करून ठेवली होती. हातात फारतर २ तास होते. अंधार पडायच्या आधी गड बघणे आवश्यक होते. गुहेतून बाहेर पडून डाव्याबाजूने जाण्याऱ्या पायऱ्यांच्या वाटेने आम्ही गुहेच्या वरच्या भागाकडे निघालो.


वर जायला पायऱ्या बनवलेला रस्ता आहे. गुहेच्या वरच्या भागात पोचले की दूरवर एक इमारत सदृश्य दिसते. ते आहे गडावरील सर्वात मुख्य सदन. किल्लेदाराचा वाडा असू शकतो. त्या दिशेने चालू लागायचे. मध्ये उध्वस्त वाड्याची अवशेष जागोजागी दिसतात. ह्यावरून इथे पूर्वी मोठ्या प्रमाणावर वस्ती होती हे सहज समजून येते.



अजून थोडे पुढे गेले की अलंगचे वैशिष्ट्य असलेल्या पाण्याच्या टाक्या लागतात. पाणी साठवण्यासाठी उतरत्या क्रमाने १३-१४ टाक बांधलेली आहेत. सर्वात खालच्या लेव्हलला पक्की दगडी भिंत आहे. मला वाटतंय जरी २-३ वर्ष पाउस पडला नाही तरी अख्या गडाला पाणी पुरेल इतका पाणी साठा ह्यात करता येत असेल.



इथून अजून जरासे वर चढत सदनापर्यंत जायचे. आत काहीच नाही. रान माजलंय. सर्व साफ केले तर काय मस्त कॅम्पिंग जागा होईल. करायला हवे एकदा. डोक्यात विचार शिवून गेला. समोर दूरवर अजून गडाचे दक्षिण टोक आणि त्यावरील झेंडा दिसत होता. अजून बरेच अंतर जायचे होते. सूर्य मावळतीला जात होता.





आम्ही आमचा स्पीड अजून वाढविला आणि वेगाने पूर्वेच्या कड्याला लागलो. अप्रतिम नजारा!!! मनुष्य निसर्गापुढे किती खुजा आहे हे निसर्गात गेले की समजते. आपली आत्मप्रौढी वगैरे जर काही असेल तर त्याची परिणीती शून्यात होते. देहभान विसरून आपण त्या दृश्यात विलीन झालेलो असतो. माझ्याकडे ग्लायडर असते तर मी तिथूनच झेप घेतली असती असे वाटून गेले.


चला... अजून स्तंभांपर्यंत जायचंय... अभिच्या आवाजाने मी भानावर आलो.

अजूनही हिरवेगार असलेल्या गवतामधून सप-सप आवाज करत आम्ही सूर्यास्त होता होता स्तंभांजवळ पोचलो. फ्रेम चांगली मिळाली.



इथून अजून वर झेंडा लावलाय तिथे जायला रस्ता होता. तिथे पोचलो आणि टायमरवर फोटो घेणे सुरू केले.




आता अंधारू लागले होते. आम्ही परत फिरलो. नाही म्हटले तरी गुहेपर्यंत जाईस्तोवर मिट्ट अंधार होणार होताच. तशी चिंता नव्हती कारण डोक्यावर हेडटोर्च आधीच लागलेली होती. परतीच्या मार्गात अजूनही न दिसलेले पडके शंकर मंदिर लागले.



नाही म्हणायला कोणीतरी पिंडीवर छत्र उभे केले आहे. शेजारीच एक शिलालेख आहे. तिसऱ्या ओळीत असलेला 'किलेदार' शब्द लक्ष्य वेधून घेतो. त्यासंबंधित हा शिलालेख असणार असा सहज अंदाज बांधता येतो.

समोरच कुलंग आणि मंडण साद घालत होते. इथून पुन्हा सदन आणि पाण्याची टाक पार करून खाली उतरेपर्यंत मिट्ट अंधार पडला. गुहेकडे उतरायचा पायऱ्याचा रस्ता काही सापडेना. मग डावी-उजवीकडे शोधाशोध. समोर मागे बघून अंदाज बांधणे सुरू. अखेर १० मिनिटांनी अभिला त्या पायरया सापडल्या. गुहेत पोचलो तो ७ वाजले. आजचा ट्रेक पूर्ण. धमाल आली. बरेच वर्षे जे बघायचे होते ते मिळवले. हे समाधानच काही निराळे.

जेवणाची तयारी केली. पण त्याआधी पुन्हा एकदा चहा झाला. एम.एस.आर.(MSR) पोर्टेबल स्टोव्हने जेवणाचे सर्व काम फटाफट. इतक्यात लक्ष्यात आले की अरे... आपण काही मसाले आणायला विसरलो... :( मग भातात चव यावी म्हणून थोडी लसून चटणी टाकली. सोबत भाजका पापड आणि लोणचे. अहाहा..!!!






दिवस सार्थकी. ना फोनची रिंग वाजते ना गाड्यांचे आवाज. निरव शांतता. जेवण करून गुहेबाहेर पहुडावे. लुकलुकणाऱ्या अब्ज ताऱ्यांनी भरलेले आकाश डोळे भरून पाहावे. मग डोळे बंद करून ती निरव शांतता अनुभवावी. खरच... असा एक दिवस आपल्याला किती भरभरून देतो नाही!!! ट्रेकचा १ दिवस संपला होता. गुहेतून समोर दिसणाऱ्या मंडणला मनात ठेवत तो दिवस डोळे मिटत संपला...

क्रमश: ....